रोहित पवारांचे प्रफुल्ल पटेलांना थेट चॅलेंज Top 10 news: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. यानंतर अजित पवार प्रवास करत असलेल्या व्हीएसआर कंपनीची विमाने सदोष असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार यांनी या कंपनीविरोधात रान उठवले होते. अशातच आता त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सवाल केले आहेत. मिस्टर प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..! असे ट्वीट करत रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केले आहेत. आता रोहित पवार यांच्या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र जागतिक स्तरावर सुरु असणाऱ्या अमिरेका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाकडे सर्वांचे लक्ष लागले असून युद्धाविराम कधी होईल, याचीच वाट सर्वजण पाहात आहेत. त्यासाठीच आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून युद्धजन्य परिस्थितीत भारताने शांततेसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. जगातील वेगवेगळ्या देशात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांमुळे सामान्य नागरिक, महिला आणि मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. भारताची संस्कृती अहिंसा आणि शांततेची असून भारताने जगासमोर संवाद आणि शांततेचा मार्ग पुढे करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. युद्धामुळे विनाश होतो, तर संवादातूनच स्थैर्य आणि समाधानाचा मार्ग निघतो. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केलीय. राज्यात उष्णेतेच्या लाटेचा इशारा मार्च महिन्याला सुरूवात होताच उष्णता वाढू लागली आहे. आतापासूनच उकाडा जाणवू लागला आहे. सूर्य आग ओकण्यास सुरूवात झाली असून विदर्भ तापायला लागला आहे. विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अकोला, अमरावती आणि विदर्भातील तापमान ४० अंशापार गेले आहे. मार्चच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील तापमान चाळीशीपार गेल्यामुळे उष्णतेची लाट आली असे म्हटले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. हवामान खात्याकडून आज विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धामध्ये तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ४०.८ अंश तापमान झाले आहे. अकोला पाठोपाठ अमरावतीमध्ये ४०.६ तर वर्धा जिल्ह्यात ४० अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काही दिवसांत राज्याच्या अनेक जिल्ह्यात पारा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे विदर्भातील नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं, असे आवाहन केले जात आहे. पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं पुणे जिल्ह्यातील वाढती बिबट्यांची संख्या मनुष्यवस्तीसाठी जीवेघेणी ठरत असल्याचं चित्र गेल्या काही महिन्यात दिसून आलं. त्यामुळे, शासनापुढे पुणे जिल्ह्यातील बिबट्यांच्या वाढत्या संख्येचा आणि माणसांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्याच अनुषंगाने पुण्यातील बिबट्यांना गुजरातमधील वनतारा येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून राज्य सरकार आणि वनतार यांच्यात करारही झाला होता. त्यानुसार, आता येथील 50 बिबट्यांना वनतारामध्ये हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार, जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथून 20 बिबटे गुजरातमधील वनतारा येथे हलविण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या जुन्नर वनविभागाच्या हद्दीत मानव-बिबट संघर्षाच्या घटनांमध्ये मागील काही वर्षांत मोठी वाढ झाल्याने पकडण्यात आलेल्या बिबट्यांचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार रोजी पहिल्या टप्प्यात 20 बिबट्यांना गुजरातमधील वनतारा केंद्रात हलविण्यात आले. ममता बॅनर्जींवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी West Bengal देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या त्यांच्या नियोजित आंतरराष्ट्रीय संथाल सम्मेलनात सहभागी झाल्या होत्या. मात्र, राज्य सरकारने या कार्यक्रमाचे ठिकाण बदलले आणि कोणताही मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित नव्हते, ज्यामुळे प्रोटोकॉलचे उल्लंघन झाले आहे. पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग येथ आयोजित कार्यक्रमासाठी राष्ट्रपती राज्यात आल्यानंतरही त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री ममता बनर्जी किंवा त्यांच्या सरकारकडून कोणीही मंत्री आला नसल्याने हि वागणूक खटकणारी आणि देशाच्या राष्ट्रपतींच अवमान असल्याची भावना आता सर्वस्थरातून व्यक्त केली जात आहे. याबाबत आता स्वत: द्रौपदी मुर्मू यांनी खंत बोलून दाखवली आहे. “कदाचित त्या (ममता बॅनर्जी) माझ्यावर नाराज आहेत,” वादाची पार्श्वभूमी आणि घटनाकार्यक्रमाचे ठिकाण बदलणे: मूलतः हे सम्मेलन गोसाईनपूर येथे आयोजित करण्यात आले होते, पण राज्य सरकारने ते बिधाननगर येथे हलवले. राष्ट्रपतींना अतिरिक्त 30 किलोमीटर प्रवास करावा लागला, अव्यवस्था झाली. यामुळे कमी लोक उपस्थित राहिले आणि राष्ट्रपतींनी याबाबत दुःख व्यक्त केले. राष्ट्रपतींच्या पदाला अपेक्षित सन्मान आणि प्रोटोकॉल दिला गेला नाही. याबाबत राष्ट्रपतींनी स्वतः भाषणात उल्लेख केला आणि राज्य सरकारच्या अनुपस्थितीवर प्रश्न उपस्थित केला. तसेच हा कार्यक्रम अशा ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे, जिथे संताल समाजाचे लोक सहज पोहचू शकणार नाहीत, अशी नाराजी राष्ट्रपतींनी बोलून दाखवली. तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या -मोदी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रातील मोदी सरकारमधील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दार्जिलिंग दौऱ्यात ममता बॅनर्जी यांच्याकडून राष्ट्रपतींचा अवमान करण्यात आल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. त्यासोबतच लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या तसेच आदिवासी समाजाच्या सक्षमीकरणावर श्रद्धा असलेल्या सर्व नागरिकांसाठी ही घटना लज्जास्पद आणि अभूतपूर्व असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केली. आदिवासी समाजातून आलेल्या राष्ट्रपतींनी स्वतः व्यक्त केलेल्या वेदना आणि संतापामुळे देशातील जनतेच्या मनात मोठी खंत असून दुःख झालं आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने सर्व मर्यादा ओलांडल्या, राष्ट्रपतींचा झालेला हा अपमान राज्यातील प्रशासनामुळेच घडल्याचे मोदींनी ट्विटरवरुन म्हटलं आहे. संताल संस्कृतीसारख्या महत्त्वाच्या विषयाकडे पश्चिम बंगाल सरकारने अत्यंत हलगर्जीपणे पाहिले. राष्ट्रपती हे पद राजकारणापलिकडचे असून त्या पदाची प्रतिष्ठा आणि पावित्र्य कायम राखले गेले पाहिजे. पश्चिम बंगाल सरकार आणि तृणमूल काँग्रेसला यापुढे तरी सुबुद्धी येईल, अशा संतप्त आणि उपरोधात्मक भावना पंतप्रधानांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांसमोर १३० माओवाद्यांचे आत्मसमर्पण Top 10 news: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्यासमोर 130 माओवाद्यांनी आत्मसर्पण केले. माओवाद्यांची सर्वात घातक तुकडी मानल्या जाणाऱ्या पीएलजीए बटालियन क्रमांक 1 सह तेलंगाना स्टेट कमिटी आणि दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीच्या तब्बल 130 माओवाद्यांनी तेलंगणा पोलिसांसमोर आज आत्मसमर्पण केलं. या 130 माओवाद्यांनी एके 47, एलएमजी, एसएलआर, इंसास सारख्या 124 घातक शस्त्रांसह तब्बल 5205 जिवंत गोळ्या तसेच अनेक ग्रेनेड आणि यूबीजीएल हे रॉकेट लाँचरसारखे शस्त्र देखील पोलिसांच्या स्वाधीन केले. काही दिवसांपूर्वीच माओवाद्यांचा विद्यमान जनरल सेक्रेटरी देवजीने तेलंगाना पोलिसांसमोर आत्मसर्पण केले होते, त्याच देवजीच्या सुरक्षा तुकडीतील 10 माओवाद्यांनी सुद्धा आज तेलंगणा पोलिसांसमोर शस्त्र खाली ठेवले. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये PLGA बटालियन-1 व बटालियन-2 चे कमांडर एंड्री कलिथराम उर्फ उइके कल्लू, कोरसा लक्कू तसेच डीके एसझेडसी सदस्य चलसानी नवथा उर्फ चंद्रा यांसारखे वरिष्ठ माओवादी नेतेही आहेत. माओवादी संघटनेच्या तीन प्रमुख घटकांपैकी PLGA ही महत्त्वाची संघटना होती. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करल्याचे तेलंगणा सरकारने म्हटलंय. ट्रम्प यांच्या’त्या’ प्रस्तावाला इराणकडून केराची टोपली डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या ‘बिनशर्त शरणागती’च्या इशाऱ्यानंतर इराणच्या नेतृत्वाने ट्रम्प यांचा हा प्रस्ताव केवळ धुडकावून लावला नाही, तर अत्यंत आक्रमक शब्दांत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. स्वप्न थडग्यात घेऊन जाल, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पलटवार केला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी देशवासियांना संबोधित करताना ट्रम्प यांच्या मागणीची खिल्ली उडवली. त्यांनी, जे लोक इराणच्या बिनशर्त शरणागतीचे स्वप्न पाहत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की ते हे स्वप्न आपल्या थडग्यात घेऊन जातील असे म्हटले. त्यांनी कबूल केले की काही देश मध्यस्थीसाठी प्रयत्न करत आहेत, परंतु अशी कोणतीही चर्चा ‘देशाचा स्वाभिमान आणि सार्वभौमत्व’ गहाण ठेवून केली जाणार नाही. शेजारी राष्ट्रांबाबत त्यांनी मवाळ भूमिका घेतली असून, ज्या देशांनी इराणवर हल्ला करण्यासाठी आपली जमीन वापरू दिली नाही, त्यांच्यावर इराण हल्ला करणार नाही, असे स्पष्ट केले. दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्प यांच्या जमीन मार्ग हल्ल्याच्या शक्यतेवर कडक भाषेत प्रत्युत्तर दिले.जर अमेरिकन सैन्य इराणच्या भूमीवर उतरणार असेल तर आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. त्यांच्यासाठी हे मोठे संकट ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. त्यांनी स्पष्ट केले की इराणची लष्करी शक्ती अशा कोणत्याही आक्रमणाला चोख उत्तर देण्यास समर्थ आहे. भारताला तिसऱ्यांदा ट्रॉफी उचलण्याची संधी टी२० विश्वचषकाचा रोमांचकारी अंतिम सामना आज अहमदाबादमध्ये रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हा लढा इतिहास घडवणारा ठरणार आहे. आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे. दोन्ही संघांचे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मिशेल सँटनर यांच्यातील टॉस साडेसहा वाजता होईल. या सामन्यात कोणताही संघ विजय मिळवला तरी क्रिकेट विश्वात एक नवा अध्याय लिहिला जाईल, यात शंका नाही. या अंतिम लढ्यात भारताला तिसऱ्यांदा ट्रॉफी उचलण्याची संधी आहे. दुसरीकडे, न्यूझीलंडने अद्याप टी२० विश्वचषक जिंकला नाही. यापूर्वी कोणत्याही संघाने सलग दोन विश्वचषक जिंकलेले नाहीत आणि मायदेशात ट्रॉफी उचलण्याचा बहुमानही कोणत्याही टीमला मिळालेला नाही. त्यामुळे आजचा दिवस क्रिकेट इतिहासासाठी खास ठरणार आहे. भारतीय चाहत्यांच्या मनात उत्साहाचे वातावरण आहे, तर किवी खेळाडू आपला पहिला विश्वविजय साजरा करण्यासाठी सज्ज आहेत. बादशाहच्या ‘टिटिरी’ गाण्यावरून वाद Top 10 news: Badshah Song Controversy: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशहा याच्या नव्या हरियाणवी गाण्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘टिटिरी’ (Titiri) या गाण्यामुळे हरियाणा सरकारने कठोर भूमिका घेतली असून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बादशहाविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. या गाण्यात हरियाणा रोडवेज बस आणि शाळेचा गणवेश घातलेल्या मुली दाखवल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने गाण्याच्या शूटिंगमध्ये वापरलेल्या सरकारी साधनसामग्रीची चौकशी सुरू केली आहे. यानंतर . त्याने व्हिडिओ हटवला असून एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे. तर दुसरीकडे या गाण्याच्या शूटिंगसाठी रोडवेज बस आणि शाळेचा परिसर कसा वापरला गेला, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.