Top 10 News : “अरे मोदीजींच्या चमचा…” ,संत बाळूमामा देवस्थानात ६० कोटींचा अपहार आणि महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात ,वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News :

मुंबई, पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज
मराठवाड्यातही विजांचा कडकडाट!
Top 10 News : राज्यात आजही पावसाचा विचित्र खेळकायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी तसेच पुणे आणि सातारा घाटमाथ्यासाठी जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणीत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज असून नांदेड, जालना आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात. दरम्यान, मंगळवारी मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाअभावी पिकांवर परिणाम होत असून शेतकरी चिंतेत आहेत.
“अरे मोदीजींच्या चमचा…”
भातखळकरांच्या टीकेला रोहिणी खडसेंच तिखट प्रत्युत्तर
भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सीजेपीच्या आंदोलनावर टीका करताना भातखळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे यांनी,अरे मोदीजींच्या चमचा, पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा बापाचा माल नाही तर देशाची वाट लावायला देश काय तुमच्या बापाची जाहगीर वाटली काय? “पंतप्रधानांचा राजीनामा मागणे हा लोकशाहीतील अधिकार आहे. जनतेने सत्ता देशाच्या विकासासाठी दिली आहे, देशाची वाट लावण्यासाठी नाही.”* तसेच, जनतेला आणि विशेषतः तरुणांना गृहीत धरू नका, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
संत बाळूमामा देवस्थानात ६० कोटींचा अपहार;
बनावट दस्तावेज अन् पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न
कोल्हापूर जिल्ह्यातील बाळूमामा देवस्थानातील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेंढीपालनातून विक्री होणाऱ्या बकऱ्यांमध्ये कमी दराने व्यवहार करून सुमारे ४१ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जमीन खरेदी-विक्रीतील कथित गैरव्यवहारांसह एकूण घोटाळा ६० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला असून कागदपत्रांची छाननी सुरू आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
कॉक्रोच जनता पार्टीचा आजही संसदेवर मोर्चा,
आता माघार नाही; अभिजीत दीपके यांची घोषणा
दिल्लीतील जंतरमंतर ते संसद या कॉकरोच जनता पार्टीच्या मोर्चादरम्यान मोठा हिंसाचार झाला. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, विशेष पोलीस आयुक्तांसह ११८ हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला, तर काही ठिकाणी पोलिसांच्या बसेसची तोडफोड झाल्याचा आरोप आहे. ७० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आंदोलन मागे घेणार नसून मंगळवारीही संसदेकडे मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त केला. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दिल्ली पोलिसांनी अमानुष मारहाण केली
अभिजित दीपकेंचा आरोप Top 10 News :
दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनादरम्यान सोमवारी संसदेकडे निघालेल्या आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी आणि शीघ्र कृती दलाने लाठीचार्ज केला. या कारवाईत अनेक आंदोलक जखमी झाले असून एका तरुणीची प्रकृती गंभीर असल्याचा दावा पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी केला आहे. तिच्यावर राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मंगळवारी आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर जमले असून आंदोलन नव्याने सुरू केले आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी उच्चस्तरीय बैठकही घेतली.
मोदी हे युवकविरोधी पंतप्रधान: राहुल गांधींची टीका;
विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्यासाठी बळाचा वापर
दिल्लीतील ‘चलो संसद’ मोर्चादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. परीक्षांतील गैरव्यवहारांवर आवाज उठवणाऱ्या युवकांना दडपण्यासाठी सरकार बळाचा वापर करत असून, मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वांत युवकविरोधी पंतप्रधान असल्याचा आरोप त्यांनी केला. नीटसह विविध पेपरफुटी प्रकरणांमुळे कोट्यवधी विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, तरी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई होत नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. विद्यार्थ्यांना न्यायाऐवजी लाठीमार आणि अटकेला सामोरे जावे लागत असल्याचाही त्यांनी आरोप केला.
बोगद्यात मिथेन गॅसचा भीषण स्फोट;
दरड कोसळून ७ जणांचा दुर्दैवी अंत
सिक्कीमच्या नामची जिल्ह्यातील ‘तिस्ता स्टेज-६’ या निर्माणाधीन जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात मिथेन गॅसचा स्फोट होऊन त्यानंतर दरड कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात २७ कामगार अडकले असून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. काही अभियंतेही अडकलेल्यांमध्ये असल्याची माहिती आहे. घटनेनंतर NDRF, SDRF, पोलीस, अग्निशामक दल आणि आरोग्य विभागाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. बोगद्यात ऑक्सिजनचा पुरवठा सुरू ठेवत अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले असून बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
रशिया-युक्रेन युद्धात४ भारतीय खलाशांचा मृत्यू
रशियन क्षेपणास्त्रांचा युक्रेनच्या समुद्रात मारा
रशिया-युक्रेन युद्धात आणखी एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. युक्रेनच्या समुद्रकिनाऱ्यालगत रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात एका व्यापारी मालवाहू जहाजाला फटका बसला. या हल्ल्यात जहाजावरील चार भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यानंतर जहाजाचे मोठे नुकसान झाले असून काही खलाशी जखमी झाल्याचेही वृत्त आहे. घटनेनंतर बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त केली जात असून मृत भारतीयांच्या ओळखीची पडताळणी आणि त्यांच्या पार्थिवांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
इंग्लंडमध्ये टी 20 नंतर वनडे मालिका गमावली,
‘या’ तीन खेळाडूंच्या निवडीवर प्रश्नचिन्ह
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडेत भारताचा २७ धावांनी पराभव झाला आणि टी-२०नंतर वनडे मालिकाही २-१ ने गमवावी लागली. लॉर्ड्सवर रोहित शर्मा, विराट कोहली आणि कर्णधार शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी केली, मात्र गोलंदाजांना इंग्लंडला रोखता आले नाही. इंग्लंडने ३८७ धावांचा डोंगर उभारला. या पराभवानंतर शिवम दुबे, ईशान किशन आणि प्रिन्स यादव यांच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मिळालेल्या संधीचा फायदा त्यांना घेता न आल्याने आगामी मालिकांसाठी त्यांच्या निवडीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात
रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा Top 10 News :
नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी पाठिंबा दर्शवला आहे. रितेश देशमुख यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे, “आम्ही देशातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. त्यांचा आवाज स्पष्ट आणि निर्भयपणे ऐकला गेला पाहिजे. हेच तरुण आपल्या लोकशाहीचे स्पंदन आणि देशाच्या भविष्याचे शिल्पकार आहेत,” असे म्हटले. त्यांच्या या भूमिकेची सोशल मीडियावर मोठी चर्चा होत असून अनेकांनी त्याचे स्वागत केले आहे.





