महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय Top 10 News Top 10 News: राज्यात तब्बल २३ वर्षांनंतर महिला व बाल विकास विभागात ८,६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. शासन निर्णयानुसार, विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे रद्द करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आलीय. त्यामुळे विभागासाठी एकूण ८,६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आलीयेत. याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २,८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आलीय. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत १,१०,६६४ अंगणवाडी सेविका व तेवढ्याच अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २,२१,३२८ मानधन आधारित पदे देखील मंजूर करण्यात आलीत. मंत्री तटकरे यांनी, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमल बजावणी अधिक प्रभावीपणे होईल असा विश्वास व्यक्त केलाय. महिला अधिकारी नको म्हणत मंत्र्याने डावलले राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. 2023 मध्ये स्थापन झालेल्या महायुती सरकारमधील एका नेत्याने ‘माझा विभाग चालवायला मला महिला नको’ असं सांगत आपल्याला डावलल्याचा दावा त्यांनी केला आहे. दिल्ली येथे होणाऱ्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संमेलनाच्या स्मरणिकेत प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत मनीषा म्हैसकर यांनी हा अनुभव मांडला.मनिषा म्हैसकर यांनी त्यांच्या लेखात म्हटलंय की, “माझ्या 33 वर्षांच्या कारकिर्दीत केवळ एकदाच असा अनुभव आला. 2023 मध्ये मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अधिकारी नियुक्तीच्या प्रक्रियेदरम्यान एका नेत्याने ‘माझा विभाग चालवायला मला महिला सचिव नको’ असं सांगितलं आणि ते धक्कादायक.” होत असं त्यांनी म्हटलंय. Top 10 News मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही अशोक खरात याची सध्या एसआयटीकडून दररोज आठ ते दहा तास चौकशी सुरु आहे. यामुळे अशोक खरात हा मानसिकरित्या खचला असून आता मरणाची भाषा बोलू लागलाय. याच अशोक खरातने आपण दैवी अवतार असल्याचं सांगत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते. मात्र आता चौकशीच्या फेऱ्याने अशोक खरात याची मानसिक स्थिती सध्या खालावली असल्याचं सांगण्यात येतंय. ‘मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे’, असं तो चौकशीदरम्यान बोलल्याचं समोर येतंय. अशोक खरात याच्यावर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या यापैकी तिसऱ्या गुन्ह्याप्रकरणी त्याची एसआयटीकडून चौकशी सुरु आहे. त्याने चौकशीत फसवणुकीचा गुन्ह्याची कबूली दिल्याचं म्हटलं जातंय. मुंबईत भीषण आगीत ३ जणांचा मृत्यू Top 10 News भाईंदरमध्ये अनधिकृत झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीमध्ये ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. भाईंदर पूर्वेच्या इंद्रलोक लोधा कॉम्प्लेक्सच्या मागील मोकळ्या जागेत असलेल्या झोपड्यांना शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीमध्ये अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आगीमध्ये परिरात धुराचे लोट पसरले होते त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. दरम्यान, या आगीत अनेक वाहने देखील जळून खाक झाली असून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडर साठवून ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढल्याचे सांगितले जात आहे. आगीमध्ये जखमी झालेल्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समोर आले नाही. पोलिस सध्या तपास करत आहेत. राज्यात सूर्य आग ओकतोय गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने राज्यभरात चांगलातच धुमाकूळ घातला. मात्र आता तापमानात वाढ होत असून उकाडा जाणवू लागला आहे.आज कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. तसेच मुंबईतही पुढील ५ दिवस तापमान वाढीचा इशारा दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे.आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.तसेच सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे Top 10 News सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्याबाबत सरकारची अपडेट महागाई भत्त्याबाबत केंद्रीय कर्मचारी मागील काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे, पण महागाई भत्त्याबाबत केंद्राकडून कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आली नाही. पण केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून विशिष्ट भत्त्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने बाल शिक्षण भत्त्याची घोषणा केली. या भत्त्यामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर केलेला खर्च, तसेच ‘हॉस्टेल सब्सिडी’चा समावेश असतो. सरकारी कर्मचारी आपल्या मुलांच्या शिक्षणावर झालेल्या खर्चाची परतफेड मिळवण्यास पात्र आहे. सरकारने बाल शिक्षण भत्त्याची परतफेड रक्कम दरमहा ₹२,८१२.५ निश्चित केली आहे. ‘हॉस्टेल सब्सिडी’ देखील दरमहा ₹८,४३७.५ निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रति महिना ₹११,२५० इतके रूपयांचा प्रतिपूर्ती मिळेल. कारगिल युद्धाचे महानायक कर्नल सोनम वांगचुक यांचे निधन कारगिल युद्धाचे महानायक आणि ‘महावीर चक्र’ विजेते कर्नल सोनम वांगचुक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय लष्कराचे माजी कमांडर कर्नल वाय. के. जोशी यांनी सोशल मीडियावरून ही दुःखद माहिती दिली.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती त्यांनी दिली. संरक्षण मंत्री आणि भारतीय लष्कराकडून वांगचुक यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. १९९९ च्या कारगिल युद्धादरम्यान कर्नल सोनम वांगचुक यांनी आपल्या पराक्रमाने पाकिस्तानच्या सैन्याला धूळ चारली होती. त्यांनी लडाख स्काउट्सच्या चौथ्या बटालियनचे नेतृत्व केले होते. युद्धाच्या काळात अत्यंत कठीण परिस्थितीत बर्फाच्छादित डोंगररांगांवर धैर्याने शत्रूचा सामना केला. त्यामुळे वांगचुक यांना लडाखमध्ये ‘असली शेर’ या नावाने ओळखले जाते. वांगचुक यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण देशात शोककळा पसरलीय. वीर पुत्राला गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे. Top 10 News ऐतिहासिक ‘आर्टेमिस २’ मोहीम फत्ते चंद्राभोवतीचा ऐतिहासिक प्रवास पूर्ण करून नासाच्या (NASA) ‘आर्टेमिस २’ मोहिमेवरील चार अंतराळवीर आज सकाळी पृथ्वीवर परतले. रीड वाईझमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सन या अंतराळवीरांना घेऊन जाणारे ‘ओरियन’ अंतराळयान शनिवारी भारतीय वेळेनुसार पहाटे ५ वाजून ३७ मिनिटांनी दक्षिण कॅलिफोर्नियाच्या किनारपट्टीवर प्रशांत महासागरात उतरले. यानंतर नासा आणि अमेरिकन लष्कराच्या तुकड्यांनी अंतराळवीरांना सुरक्षितपणे बाहेर काढून जवळच असलेल्या जहाजावर नेले. गेल्या पाच दशकांहून अधिक काळात चंद्राच्या इतक्या जवळ जाणारे हे पहिलेच चार अंतराळवीर ठरले आहेत.आर्टेमिस २ मोहिमेच्या यशामुळे पाच दशकांहून अधिक काळानंतर पहिल्यांदाच मानवाच्या चंद्रावर उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी पाकिस्तानमध्ये इराण आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्लामाबादमध्ये सुरु असलेली अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यास अमेरिका हल्ला करण्यास पूर्ण तयार असल्याचं म्हटलंय. अमेरिकन युद्धनौकांमध्ये सर्वात अत्याधुनिक शस्त्र भरली जात आहेत. गरज पडल्यास इराणवर हवाई हल्ले केले जातील, असंही ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हॅन्स चर्चा करण्यासाठी इस्लामाबादला रवाना झालेत. ट्रम्प यांनी चर्चेसाठी कमी वेळ राहिला आहे. ट्रम्प मुलाखतीत म्हणाले की पुढील 24 तासात स्थिती स्पष्ट होईल, आम्हाला लगेचच माहिती मिळेल असं म्हणत पुन्हा एकदा सूचक विधान केलंय. बंगळुरूचा पहिला पराभव Top 10 News आयपीएल 2026 मधील 16 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दमदार खेळ करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला. गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात वैभव सूर्यवंशीने खेळलेली तुफानी खेळी सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरली. सूर्यवंशीने अर्धशतक झळकावले आणि बंगळुरूच्या गोलंदाजांचा अक्षरशः समाचार घेतला. त्याच्या या वादळी खेळीमुळे राजस्थानने आव्हानाचा पाठलाग सहज पार केला. या विजयासह राजस्थान रॉयल्सने स्पर्धेत चौथा विजय नोंदवत 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, गतविजेत्या बंगळुरू संघाला या हंगामातील पहिल्याच पराभवाचा धक्का बसला, ज्यामुळे त्यांच्या विजयाच्या मालिकेला ब्रेक लागला.