Top 10 News : महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया पूर्ण, 1 सप्टेंबरपासून ओला-उबर-रॅपिडोसाठी नवे नियम आणि आयशा खानच्या साखरपुड्याची चर्चा, वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : Top 10 News : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीची (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

महाराष्ट्रातील SIR प्रक्रिया पूर्ण;
2.07 कोटी मतदारांचे फॉर्म संकलित नाहीत
Top 10 News : महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणीची (SIR) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील 9.78 कोटी मतदारांपैकी 7.71 कोटी मतदारांचे गणनापत्रे संकलित करण्यात आली आहेत, तर 2.07 कोटी मतदारांचे फॉर्म विविध कारणांनी जमा झाले नाहीत. यामध्ये 75.52 लाख मतदार अनुपस्थित किंवा सापडले नाहीत, तर 17 लाख नावे दुबार असल्याचे आढळले. 24 ऑगस्टला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार असून, त्यानंतर महिनाभर दावे-हरकती नोंदवता येतील. पात्र नवमतदारांना फॉर्म 6 द्वारे नाव नोंदवता येणार आहे. अंतिम मतदार यादी ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
1 सप्टेंबरपासून ओला-उबर-रॅपिडोसाठी नवे नियम
आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबर, रॅपिडोसह अॅप-आधारित प्रवासी सेवांसाठी परिवहन विभागाने नवी नियमावली लागू केली आहे. 1 सप्टेंबरपासून ॲग्रीगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाचा परवाना बंधनकारक असेल. चालकांकडे वैध परवाना, बॅच, पोलिस पडताळणी आणि व्यवहारिक मराठीचे ज्ञान आवश्यक राहणार आहे. चालकांना सलग 12 तासांपेक्षा अधिक वाहन चालवता येणार नाही, तर एकूण भाड्याच्या किमान 80 टक्के रक्कम चालकांना देण्याची तरतूद आहे. वाहनांचे GPS ट्रॅकिंग, चालक पडताळणी आणि ऑनलाइन देखरेख केली जाणार आहे. ॲप आणि वेबसाइट मराठी, हिंदी व इंग्रजीत असणेही बंधनकारक राहणार आहे.
महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा;
सात जिल्ह्यांना येलो अलर्ट
राज्यात काही भागांत पावसाची उघडीप असली तरी आज, 19 ऑगस्टला मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने बीड, जालना, धाराशिव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यांना विजांसह पावसाचा अंदाज देत येलो अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील गोंदिया जिल्ह्यातही जोरदार सरींची शक्यता आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम पाऊस, तर मुंबईत अंशतः ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरी पडण्याचा अंदाज आहे. पुढील काही दिवसांत पावसाचे वितरण असमान राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
‘ओबीसी एकत्र आले नाहीत म्हणून तुम्ही …’
लक्ष्मण हाकेंचा जरांगेंवर घणाघात
ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बीडमधील पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकार आणि राजकीय पक्षांवर जोरदार टीका केली. ओबीसी एकत्र आले नाहीत, त्यामुळे त्यांचे हक्क धोक्यात आले असून सत्ताधाऱ्यांना समाजाची फिकीर नसल्याचा आरोप त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवरही हाके यांनी टीका करत, मराठा समाजाला कुणबी मानून ओबीसी आरक्षण देण्यास विरोध दर्शवला. ओबीसी नेत्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी 1 सप्टेंबरच्या मोर्चात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हाके यांनी केले.
मुंबई विद्यापीठाचा मोठा निर्णय
परीक्षांसाठी 30 मिनिटे आधी उपस्थिती अनिवार्य
मुंबई विद्यापीठाने परीक्षा पद्धतीत शिस्त आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या निर्धारित वेळेच्या 30 मिनिटे आधी परीक्षा कक्षात उपस्थित राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. ओळखपत्र तपासणी, आसनव्यवस्था आणि आवश्यक पडताळणीसाठी पुरेसा वेळ मिळावा, तसेच पेपरफुटीसारख्या प्रकारांना आळा घालण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. उदाहरणार्थ, परीक्षा सकाळी 10.30 वाजता असल्यास विद्यार्थ्यांनी 10 वाजेपर्यंत जागेवर उपस्थित राहणे आवश्यक असेल. उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाऊ शकतो.
एनटीएची सर्वात मोठी कारवाई,
600 तज्ज्ञांची उचलबांगडी
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व वाढवण्यासाठी मोठे फेरबदल केले आहेत. परीक्षा विभागाची पुनर्रचना करत 600 तज्ज्ञांच्या जागी नव्या तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकांची तपासणी अधिक मजबूत करण्यासाठी चार-स्तरीय पडताळणी प्रणाली लागू केली जाणार आहे. पुढील दोन-तीन आठवड्यांत 20 ते 25 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार असून, NTAचे कार्यालय नवीन ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी NTAच्या कामकाजाचा आढावा घेत परीक्षा प्रक्रियेचे सर्वसमावेशक ऑडिट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सायबर सुरक्षा, सायकोमेट्रिक्स आणि प्रश्नपत्रिका निर्मितीसाठी खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
आप नेते सत्येंद्र जैन अटकेत;
केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना कथित दिल्ली जल बोर्ड भ्रष्टाचार प्रकरणात एसीबीने अटक केली आहे. या कारवाईनंतर अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर निशाणा साधत, जैन यांच्याविरोधातील प्रकरणे खोटी असल्याचा दावा केला. मोदी सरकारचा अंत निश्चित असल्याचेही त्यांनी म्हटले. मनीष सिसोदिया यांनीही जैन यांची अटक राजकीय हेतूने झाल्याचा आरोप केला. दरम्यान, दिल्ली भाजपचे माजी अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी आपवर पलटवार करत दिल्ली जल बोर्डाच्या एसटीपी टेंडरमधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी ही कारवाई झाल्याचे म्हटले. आरोपांवरून दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे.
बांगलादेशात वीज संकट;
भारताकडे अतिरिक्त डिझेलची मागणी
बांगलादेश सध्या गंभीर ऊर्जा संकटाचा सामना करत असून, अनेक भागांत दररोज 8 ते 10 तास भारनियमन केले जात आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी मोहम्मद युनूस सरकारने भारताकडे अतिरिक्त डिझेल पुरवठ्याची मागणी केली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेशच्या मागणीवर देशांतर्गत गरजा, रिफायनिंग क्षमता आणि इंधन उपलब्धतेचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, वीज बचतीसाठी रात्री 8 नंतर दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सततच्या भारनियमनामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, काही ठिकाणी आंदोलनांच्या घटनाही घडल्या आहेत.
भारत-पाकिस्तान हॉकी सामना आज;
पुढील फेरीसाठी भारताला विजयाची गरज
बेल्जियम आणि नेदरलँड्समध्ये सुरू असलेल्या हॉकी वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताचा सामना आज, 19 ऑगस्टला पाकिस्तानशी होणार आहे. पूल डीमध्ये भारताने वेल्सला 3-1 ने हरवले, तर इंग्लंडकडून 2-4 असा पराभव झाला. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धचा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. भारत-पाकिस्तान सामना आज संध्याकाळी 6.30 वाजता आम्स्टेलव्हीनच्या वॅगनर स्टेडियमवर होणार आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, पूल डी तील अव्वल संघ थेट पुढील फेरीत जाणार असून इतर संघ क्रॉसओव्हर फेरीत प्रवेश करतील.
आयशा खानच्या साखरपुड्याची चर्चा;
मिस्ट्री मॅनसोबत फोटो व्हायरल Top 10 News :
मनोरंजन विश्वात अभिनेत्री आयशा खानच्या साखरपुड्याची चर्चा रंगली आहे. आयशाने सोशल मीडियावर एका मिस्ट्री मॅनसोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले असून, त्यात ती हिऱ्याची अंगठी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. “एखाद्या स्वप्नासारखं…” असे कॅप्शन देत तिने अंगठी आणि पांढऱ्या हार्टचा इमोजीही वापरला आहे. त्यामुळे चाहत्यांनी तिला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. मात्र, ही पोस्ट ज्वेलरी ब्रँडच्या प्रमोशनचा भाग असल्याचीही चर्चा आहे. आयशाने साखरपुडा किंवा लग्नाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘धुरंधर’ आणि ‘बिग बॉस 17’मुळे आयशाला मोठी लोकप्रियता मिळाली आहे.





