राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ Top 10 News : NEET पेपर फुटीचे प्रकरण ताजे असतानाच महाराष्ट्र पोलीस भरती परीक्षेतही घोळ झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. SRPF च्या परीक्षेत विचारण्यात आलेली प्रश्न एकाच पुस्तकातील प्रश्न घेण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. त्यानंतर राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक 5, दौंड येथील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा रद्द करण्यात आलीय. प्रश्नपत्रिकेतील 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशन संस्थेच्या सराव प्रश्नसंचातून जसेच्या तसे घेतल्याचा आरोप झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामुळे आता 24 मे 2026 रोजी नव्याने लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणामुळे उमेदवारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. भरती प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. विरोधी पक्षांनीही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. मुंबईतील 79 नगरसेवकांचं पद अडचणीत मुंबई महापालिकेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता उलथवून भाजपनं पहिल्यांदाच पालिकेच्या चाव्या आपल्या हातात घेतल्या. परंतु, या निवडणुकांचा धुराळा शांत होतो न होतो, तोच आता महापालिकेत नगरसेवकांच्या विरोधात याचिकांचं वादळ उठलंय. निकालानंतर मुंबई पालिकेच्या विविध प्रभागांमध्ये दाखल झालेल्या निवडणूक याचिकांची अधिकृत माहिती समोर आलीये आणि ही माहिती मुंबईतील अनेक नगरसेवकांची झोप उडवणारी आहे.अशा विविध आरोपांमुळे निवडून आलेल्या नगरसेवकांच्या पदाला थेट ग्रहण लागलंय. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधल्या बड्या चेहऱ्यांचा यात समावेश आहे. निवडणुकीनंतर एकाच वेळी ७९ नगरसेवकांच्या वैधतेवर आक्षेप घेण्याची ही आजवरची सर्वात मोठी आणि दुर्मिळ घटना आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचं सत्तेचं गणित आणि दिग्गजांचं राजकीय भवितव्य आता पूर्णपणे कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे. कांद्याच्या हमीभावासाठी शेतकऱ्यांचा एल्गार कांद्याला किलोला फक्त 50 पैशांचा भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. आता विरोधकही कांद्याच्या दरासाठी रस्त्यावर उतरले आहेत. नाशिकमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद पाडण्यात आले. सरकारनं नाफेड मार्फत 1235 रुपये क्विंटलनं कांदा खरेदीचे जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात कांदा लागवडीला क्विंटलला 2 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो, त्यामुळे अडीच ते तीन हजारांचा दर देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. कष्ट करून पिकवलेला कांदा अक्षरशः रस्त्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आलीये. कांदा दरावरुन बळीराजा अक्षरशा रडकुंडीला आलाय. त्यामुळे कांद्याला हमीभाव देण्यासाठी सरकार पाऊल उचलणार का? हाच खरा सवाल आहे. वऱ्हाडाच्या ट्रकचा भीषण अपघात;13 जणांचा करुण अंत मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरच्या धानीवरी याठिकाणी एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी आनंदाने निघालेल्या 100 हून अधिक वऱ्हाड्यांच्या आयशर ट्रकला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये ट्रकचा पुरता चक्काचूर झाला असून, आतापर्यंत 13 जणांचा करुण अंत झाला आहे. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश असल्याच म्हटल जातय. तर अपघातात 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. नवरीच्या घराच्या अगदी हाकेच्या अंतरावर हा अपघात घडल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीय. पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढल्या Top 10 News : पंतप्रधान नरेंद्र मोदी तमाम देशवासियांना आगामी काळात इंधनाचा वापर जपून करण्याचे कळकळीचे आवाहन केल्यानंतर अनेकांना भविष्यातील आर्थिक अरिष्टाची चाहूल लागली होती. ही भीती आता खरी ठरताना दिसत असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 15 मे रोजी पेट्रोलच्या दरात 3 रुपये आणि डिझेलच्या दरात 3.11 रुपयांची घसघशीत वाढ करण्यात आली होती. त्याला चार दिवस उलटत नाही तोच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. देशातील प्रत्येक शहरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगवेगळी वाढ झाली आहे. त्यानुसार दिल्लीत पेट्रोलच्या दरात 87 पैसे आणि डिझेलच्या दरात 91 पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107 रुपयांच्या पलीकडे जाऊन पोहोचला आहे. तर डिझेल प्रतिलीटर 94 रुपयांच्या टप्प्याजवळ येऊन पोहोचले आहे. मंगळवारी सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. घर बंद असले तरी भरावा लागेल ठरलेला शुल्क पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या वाढत्या दरांमुळे आधीच सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं असताना आता वीज बिलाबाबतही मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने वीज बिलातील फिक्स्ड चार्ज वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास वीज वापर कमी असला किंवा घर पूर्णपणे बंद असले तरी ग्राहकांना दर महिन्याला ठराविक रक्कम भरावी लागू शकते. सध्या वीज बिलामध्ये दोन प्रकारचं शुल्क आकारलं जातं. पहिले म्हणजे प्रत्यक्ष वापरलेल्या वीज युनिट्सचे शुल्क आणि दुसरे म्हणजे फिक्स्ड चार्ज. हा फिक्स्ड चार्ज वीज वापर कमी-जास्त असला तरी प्रत्येक महिन्याला निश्चित स्वरूपात आकारला जातो. आता हा निश्चित शुल्काचा हिस्सा वाढवण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. हा प्रस्ताव लागू झाल्यास कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाही मोठा फिक्स्ड चार्ज भरावा लागू शकतो. त्यामुळे वीज वापरली नाही तरी बिल भरावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला पश्चिम आशियातील तणाव आणि वाढत्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सरकारी विमा कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांसाठी काटकसरीचे कठोर निर्देश जारी केले आहेत. अनावश्यक खर्च टाळणे, प्रवासावर नियंत्रण ठेवणे आणि शक्य तितक्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे.इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आणि कार्यालयीन कामकाजात ऊर्जा बचतीला प्राधान्य देण्यासही सांगण्यात आलंय. देशांतर्गत आणि परदेश दौऱ्यांवरही खर्च नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परदेश दौरे अत्यावश्यक असल्यासच मंजूर केले जातील आणि शक्य तितक्या कमी खर्चात ते पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सॅमसंगचे तब्बल 45 हजार कर्मचारी संपावर जाणार जगातील सर्वात मोठ्या चिप उत्पादकांपैकी एक असलेल्या सॅमसंगमध्ये एक मोठे संकट निर्माण झाले आहे. वृत्तानुसार, सॅमसंगचे सुमारे 45 हजार कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. हा कंपनीच्या इतिहासातील सर्वात मोठा संप असल्याचे मानले जात आहे. विशेष म्हणजे, हे कर्मचारी कंपनीच्या मेमरी चिप प्लांटमध्ये काम करत आहेत, जिथे AI, स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सर्व्हरसाठी आवश्यक असलेल्या चिप्सचे उत्पादन केले जाते.या संपामागे केवळ एकच कारण नाही. कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की त्यांना चांगले पगार, बोनस आणि कामाची परिस्थिती हवी आहे. AI च्या तेजीमुळे कंपनीचा नफा वाढला आहे, पण कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा मिळालेला नाही. ही नाराजी आता एका मोठ्या चळवळीत बदलताना दिसतीय. MS धोनीने निवृत्तीचे दिले संकेत चेन्नईने काल एमए चिंदबरम स्टेडियमवर या हंगामातील शेवटचा सामना खेळला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सच्या सर्व खेळाडूंनी मैदानात एक टीम फोटो काढला. यासाठी जेव्हा एमएस धोनी मैदानात आला, तेव्हा चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. मात्र फोटो काढल्यानंतर जेव्हा एमएस धोनी ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला, तेव्हा मैदानाची सीमारेषा ओलांडताना त्याने मान वर करुन आकाशाच्या दिशेने पाहिले. एमएस धोनीच्या याच कृतीमुळे एमएस धोनी आता खेळाडू म्हणून आयपीएलच्या पुढील हंगमात खेळताना दिसणार नाही. धोनीने निवृत्तीचे संकेत दिले. धोनीची ही शेवटची झलक होती, अशी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. गोविंदाच्या इव्हेंटमध्ये राडा Top 10 News : बॉलिवूडचा सुपस्टार गोविंदा कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. त्याच्या स्टाइलचे आणि अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. तो अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतो. त्याला पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. अशाच एका कायक्रमात काल रात्री गोविंदा दिसला. ज्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गोविंदाने कार्यक्रमात सुंदर डान्स केला देखील केला. सर्वजण कार्यक्रमाचा आनंद घेत असताना गोंधळ उडाला. ज्याचा व्हिडीओ समोर आलाय. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये एका बाउन्सर आणि पापाराझीमध्ये झटापट झालेली दिसत आहे. अभिनेत्याच्या बाउन्सरने पापाराझींना थांबवले आणि त्यांना धक्काबुक्की केली. यामुळे पापाराझी संतापले आणि त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्यानंतर गोविंदाने तिथे येऊन परिस्थिती शांत केली.आणि गोविंदा तेथून निघून गेला. गोविंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकरी गोविंदाच्या या शांत आणि संयमी कृतीचे कौतुक करत आहेत.