Top 10 News : राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा,…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट आणि विद्यार्थी आंदोलनावर सलमानने मौन सोडलं , वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा इशारा;
पालघर-रायगडसह अनेक जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट
Top 10 News : मुंबई, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात पुढील 48 तास मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पालघर, रायगड, नाशिक आणि पुणे घाटमाथ्यास रेड, तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा व कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. रायगड व कोल्हापूरमध्ये नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून काही रस्ते आणि बंधारे पाण्याखाली गेले आहेत. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
…म्हणून शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट
विद्यार्थी आंदोलांविषयीददेखील दिली माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाई तसेच शेतकरी आणि शेतीसंबंधीच्या प्रश्नांवर चर्चा केली. सुप्रिया सुळेही या भेटीत उपस्थित होत्या. भेटीनंतर राजकीय चर्चांना उधाण आले असले तरी पवारांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या, शेती, पाणी व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्रातील मुद्दे मांडल्याचे सांगितले. या प्रश्नांवर सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिल्याचा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही या भेटीचा वेगळा राजकीय अर्थ काढू नये, असे स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांच्या पाठीमागं राहून राजकारण केलं जातंय’;
चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नीट पेपरफुटीप्रकरणी विरोधकांवर टीका करत, काँग्रेसच्या काळात २८ वेळा पेपरफुटी झाल्याचा दावा केला. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकार या प्रकरणात गंभीर असून योग्य कारवाई करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार-नरेंद्र मोदी भेटीला राजकीय रंग देऊ नये, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका करत, २०२९ निवडणुकांऐवजी विकासाच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन बावनकुळे यांनी केले.
जुलैचा हफ्ता कधी मिळणार ?
लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा जुलै महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने लाभार्थी महिलांमध्ये संभ्रम आहे. जूनचा हप्ता १५ जुलैला मिळाला होता. दरम्यान, शेतकरी कर्जमाफीमुळे हप्ता उशिरा मिळणार का, अशी चर्चा सुरू आहे. ई-केवायसीअभावी सुमारे ९२ लाख महिलांचे हप्ते बंद झाल्याची माहिती समोर आली असून सध्या १.६९ कोटी महिलांनाच लाभ मिळत आहे. नव्याने पात्र ठरलेल्या महिलांसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू नसल्याने त्या शासनाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत.
जंतरमंतरवर पुन्हा विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज ;
पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या Top 10 News :
दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटीप्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पुन्हा तणाव निर्माण झाला. काही आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक व बाटल्या फेकल्याचा आरोप असून, त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. टॉलस्टॉय मार्गावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) आणि दिल्ली पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असून सध्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
भाजपचा गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न :
अभिजीत दिपके यांचा गंभीर आरोप
जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. आंदोलनात गोंधळ घालण्यासाठी भाजपकडून बाहेरून गुंड पाठवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. दगडफेक करणारे आंदोलनकर्ते नसून भाजपचे कार्यकर्ते असल्याचेही ते म्हणाले. पोलिस ट्रकमधून दगड आणतात आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांवर खोटा ठपका ठेवून बदनामी केली जाते, असा आरोप त्यांनी केला. या आरोपांवर भाजप किंवा दिल्ली पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.
सिक्कीममध्ये बोगद्यात भूस्खलन
२२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू
सिक्कीमच्या नामची जिल्ह्यातील NHPC बोगद्यात झालेल्या भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सोनम डोल्मा यांनी बुधवारी सकाळपर्यंत २२ मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे विशेष बचाव पथकही मोहिमेत सहभागी झाले आहे. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन आणि विविध यंत्रणा समन्वयाने कार्यरत असून, अडकलेल्यांचा शोध आणि बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.
“जेपी नड्डा यांनी लाज वाटली पाहिजे;
CJP च्या प्रवक्त्याचा संताप
केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी विद्यार्थी आंदोलनाचे राजकारण करू नये, सरकार संसदेत नीट प्रकरणावर चर्चेस तयार असल्याचे सांगितले. त्यावर CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, “जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” असा इशारा दिला. जंतरमंतरवरील आंदोलन शांततेत सुरू राहील, असे सांगताना त्यांनी सोनम वांगचुक यांनीही आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केल्याचे नमूद केले. आंदोलनात घुसखोरी करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असा आरोपही त्यांनी केला.
आजपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात
ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंगकडून मोठ्या अपेक्षा
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे आजपासून राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात होत असून २ ऑगस्टपर्यंत हा क्रीडा महोत्सव रंगणार आहे. ७४ देशांतील सुमारे तीन हजार खेळाडू विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. भारताच्या पदकांच्या आशा प्रामुख्याने ॲथलेटिक्स, वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंगवर केंद्रित आहेत. २००२ पासूनच्या सर्व राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारत अव्वल पाच देशांत राहिला आहे. मूळ यजमान ऑस्ट्रेलियाने वाढत्या खर्चामुळे माघार घेतल्यानंतर ग्लासगोने स्पर्धेचे आयोजन स्वीकारले असून यासाठी सुमारे १६० दशलक्ष पाउंड्स खर्च करण्यात आले आहेत.
“पेपर लीक होणं ही अतिशय गंभीर समस्या”
विद्यार्थी आंदोलनावर सलमानने मौन सोडलं Top 10 News :
दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता देशभरातून पाठिंबा मिळत असून अनेक कलाकारांनीही समर्थन दर्शवले आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खानने सोशल मीडियावर निवेदन जारी करत विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाचे कौतुक केले. पेपरफुटी ही गंभीर समस्या असून विद्यार्थ्यांना चांगली शिक्षण व्यवस्था मिळावी, असे तो म्हणाला. या मुद्द्याचे राजकारण करू नये, सरकारने विद्यार्थ्यांशी संवाद साधून शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम करावी, असे आवाहनही त्याने केले. भारत शिक्षणाचे जागतिक केंद्र बनावे, अशी अपेक्षाही सलमान खानने व्यक्त केली.



