पुन्हा ईकेवायसी सुरू होणार?; बहिणींसाठी शिंदेंचा शब्द Top 10 News : राज्यातील पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे ३ हजार रूपये एकत्र आले. पण अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेच नाहीत. ७० लाख अपात्र लाडक्या बहिणींना या योजनेतून वगळण्यात आले. पण काही महिला पात्र असतानाही खात्यत पैसे जमा झालेच नाहीत. त्यामुळे पुन्हा ईकेवायसी करता येणार का? पात्र असतानाही पैसे का मिळाले नाहीत? असा सवाल राज्यभरातील लाडक्या बहिणींच्या मनात होता. यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. ई केवायसी होत राहील, पण एकही पात्र लाडकी बहिण ओवाळणीपासून वंचित राहणार नाही, असा शब्द एकनाथ शिंदेंनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील महिलांना ईकेवायसी करण्याची संधी मिळणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. अंधेरी येथील लाडक्या बहिणींच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लाडक्या बहिणींना शब्द दिलाय. दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटनाचा दर्जा पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्य सरकारने या संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वरून अधिकृतपणे या निर्णयाची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे दगडूशेठ गणपती संस्थानाला राज्यातील प्रमुख आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळांच्या यादीत विशेष आणि मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. या निर्णयाचे पुणेकरांकडून आणि जगभरातील गणेशभक्तांकडून स्वागत केले जात आहे. राज्याला पाऊस अन् उष्णतेचा एकत्र तडाखा राज्यात सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. एका बाजूला उष्णतेच्या लाटेने हैराण झाले असतानात दुसरीकडे काही भांगात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आजसाठी महत्त्वाचा इशारा जारी केलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दक्षिण कोकण-गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मराठवाड्यातील काही भागात उष्णतेची लाटही जाणवू शकते, त्यामुळे दुहेरी हवामानाचा अनुभव मिळणार आहे.तर दुसरीकडे विदर्भातील नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. भाजप नगरसेवकांच्या घरावर बुलडोझर फिरणार? छत्रपती संभाजीनगरमधील भाजप नगरसेवकांना मनपाच्या कारवाईची भीती वाटू लागली आहे. भाजच्या नगरसेवकांच्या घरावर थेट बुलडोझर फिरणार असल्याची शक्यता आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अतिक्रमणाविषयी तक्रार देण्यात आली आहे. माजी खासदार यांच्या तक्रारीनंतर मनपाकडून नगरसेवकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. दरम्यान महानगरपालिकेच्या तक्रारीनंतर भाजप नगरसेवक गणेश नावंदर आणि विश्वनाथ स्वामी यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले आहे. दुसरीकडे महानगरपालिकेने आजपर्यंत स्वतःहून अतिक्रमण काढण्याचा वेळ दिला होता. आता उर्वरित नगरसेवकांच्या घरावर कारवाई कधी होणार हे पाहावं लागेल. रायगडावरील त्या दृश्याने शिवप्रेमी संतप्त Top 10 News : गेल्या काही दिवसांपासून किल्ले रायगडावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र, काही हुल्लडबाजांनी गडाच्या पवित्र्याला गालबोट लावले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर एक अत्यंत संतापजनक आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावणारा प्रकार समोर आला आहे. गडावर काही बेजबाबदार पर्यटकांकडून मद्यधुंद पार्ट्या केल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, गडाच्या परिसरात तब्बल 50 पेक्षा जास्त दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. या प्रकारामुळे गडप्रेमी, स्थानिक नागरिक आणि शिवभक्तांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भारत हा १४० कोटी जनतेच्या स्वप्नांचा देश “आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारत एका नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. भारत हा १४० कोटी जनतेच्या आकांक्षांचा आणि स्वप्नांचा देश आहे,” असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. स्वीडनमधील ‘युरोपियन राउंड टेबल फॉर इंडस्ट्री’ या नामांकित उद्योग परिषदेत ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून, नेदरलँड्सचा दौरा आटोपून ते स्वीडन मधील गॉथनबर्ग येथे पोहोचले आहेत. त्यांच्या या दौऱ्यात भारताच्या वाढत्या जागतिक प्रभावाची झलक पुन्हा एकदा पाहायला मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी ५५८ कोटींचं बक्षीस अमेरिका आणि इराणमधील तणाव आता एका धोकादायक वळणावर पोहोचला आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येसाठी कट रचला जात आहे. इराण सरकार ५० दशलक्ष युरोंचे म्हणजे सुमारे ५५८ कोटींहून अधिक रुपये बक्षीस जाहीर करण्याचा प्रस्ताव आपल्या संसदेत आणण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त इराणी प्रसारमाध्यमांनी दिले आहे. या दाव्यामुळे जागतिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि अमेरिकन सेंट्रल कमांडचे कमांडर यांनाही या मोहिमेअंतर्गत लक्ष्य केलं जातंय. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येच्या कटात या नेत्यांची भूमिका असल्याचा आरोप करत ही कारवाई केली जाणार असल्याचे इब्राहिम अजीजी यांनी सांगितले आहे. आता आणखी एका देशाकडे अमेरिकेनं मोर्चा वळवला सीआयए प्रमुख जॉन रॅटक्लिफ यांच्या हवाना भेटीनंतर, अमेरिकेकडून क्युबावर आक्रमण होण्याची भीती वाढली आहे. संभाव्य लष्करी संघर्षाच्या शक्यतेने क्युबन सरकारने युद्धसदृश तयारी तीव्र केली आहे. देशभरातील लोकांना गनिमी युद्धतंत्राचे प्रशिक्षण दिले जात आहे आणि त्यांना आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, हवानामधील अनेक सरकारी इमारतींना अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्यासाठी तयार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. क्युबा अमेरिकेच्या दीर्घकाळ चाललेल्या तेल नाकेबंदी आणि आर्थिक दबावाचा सामना करत आहे. परिस्थिती अशी आहे की अनेक भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे, इंधनाचा तुटवडा आहे आणि जीवनावश्यक वस्तूंची टंचाई जाणवत आहे. 52व्या हिंद केसरीचा मानकरी ठरला महेंद्र गायकवाड साताऱ्यातील ऐतिहासिक छत्रपती शाहू स्टेडियमवर पुरुष गटाची अंतिम लढत महाराष्ट्राच्याच दोन तगड्या मल्लांमध्ये रंगली. सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड आणि पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ यांच्यात प्रतिष्ठेची ‘हिंदकेसरी गदा’ पटकावण्यासाठी लढत झाली. मात्र, कुस्तीच्या सुरुवातीलाच एक दुर्दैवी आणि नाट्यमय घडामोड घडली. डाव प्रतिडाव टाकत असताना महेंद्र गायकवाड याने पृथ्वीराज मोहोळचा हात पिळला. याच वेळी पृथ्वीराजच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हाताची वेदना असह्य झाल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने पृथ्वीराज मोहोळ याने मैदानातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. प्रतिस्पर्ध्याने माघार घेतल्यामुळे पंचानी महेंद्र गायकवाड याला 52 व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता म्हणून घोषित केले. प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह Top 10 News : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून एक दुखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक के. राजन यांनी आत्महत्या केली आहे. दिग्दर्शक के. राजन हे ८५ वर्षाचे होते, ते बेधडक वक्तव्यांसाठी आणि सिनेसृष्टीतील अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी ओळखले जात. के. राजन यांनी चेन्नईतील प्रसिद्ध अड्यार नदीत उडी मारून आपलं आयुष्य संपवलं. ते बेपत्ता असल्याचं समजताच पोलीस आणि बचाव पथकाने तातडीने शोधमोहीम सुरू केली होती. यानंतर नदीतून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यांनी वयाच्या या टप्प्यावर असं टोकाचं पाऊल का उचललं? यामागचं नेमकं कारण काय? याचा तपास सध्या चेन्नई पोलीस करत आहेत. दरम्यान हाती आलेल्या माहितीनुसार के. राजन यांनी नैराश्यातून जीवन संपवलं असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने सोशल मीडिया आणि फिल्म इंडस्ट्रीत एकच खळबळ उडाली आहे.