एकनाथ शिंदे दोन मंत्र्यांवर प्रचंड नाराज Top 10 News : उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे त्यांच्या पक्षाचे आमदार दीपक केसरकर यांच्यासह दोन मंत्र्यांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दीपक केसरकर यांच्यावर होत असलेल्या आरोप आणि 2 मंत्र्यांच्या जिल्ह्यात पक्षाची कमी होत असलेली ताकद पाहता एकनाथ शिंदे त्यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जातंय. एकनाथ शिंदे नाराज असलेल्या दोन्ही मंत्र्यांकडे महत्वाची मंत्रीपद असताना त्यांना राज्यभरात चमकदार कामगिरी करता आली नाही. लोकसभा, विधानसभा आणि जिल्हा परिषद नगरपालिकेच्या निकालानंतर शिंदेकडून आता अकार्यक्षम मंत्र्यांच्या हातात लवकरच नारळ दिला जाण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवसांत शिंदे मंत्रिमंडळात बदल करून नव्या व पक्षवाढीसाठी झटणाऱ्या नेत्यांकडे मंत्रीपदाची धुरा देण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढणार? खरेदी खातामध्ये खाडाखोड करून एकनाथ खडसे यांनी महार वतनाची आपली जमीन त्यांच्या मुलीच्या नावे लाऊन घेतल्याचा आरोप करत चमेली बाई तायडे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केलाय. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील मानपूर गावातील रहिवासी असणाऱ्या तायडे यांनी खडसेंच्या विरोधात फिर्याद दाखल केलीय. त्यानंतर एकनाथ खडसे यांच्यासह त्यांची मुलगी शारदा चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले असून या व्यवहाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे. त्यासोबतच आपल्या मुलीचा हा व्यवहार असून यामधे मुलीने जी जमीन खरेदी केलीय तो तिचा खासगी व्यवहार आहे. एवढंच नाही तर ही जमीन महार वतनाची नसून १०१ वर्गवारीची असल्याचं ही त्यांनी म्हटलंय. अश्विनी भिडे मुंबई महापालिकेच्या महिला आयुक्त Ashwini Bhide राज्याचं लक्ष लागून असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी नाव निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतल्या आणि मेट्रो वूमन अशी ओळख असलेल्या अश्विनी भिडे यांचं नाव मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदसाठी निश्चित झाल्याची माहिती समोर आलीय. अश्विनी भिडे या सध्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत असून आज त्यांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या ठिकाणी आता अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती आहे. अश्विनी भिडे या 1995 बॅचच्या आयएएस अधिकारी असून या आधी त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलंय. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा Top 10 News : ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने’च्या अंमलबजावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. कर्जमाफीसाठी आवश्यक असलेला राज्यस्तरीय बँकर्स कमिटीचा सविस्तर अहवाल तयार झाला आहे. लवकरच हा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला जाईल. त्यामुळे राज्यातील 24 लाख 73 हजार 566 शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात २ लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने जिल्हा मध्यवर्ती आणि राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित केली. केवळ पीक कर्जच नव्हे, तर मध्यम व दीर्घ मुदतीच्या कर्जाचाही यात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. राज्यात आज अनेक जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ ऐन उन्हाळ्यात राज्यावर अवकाळी पावसाचे सावट गडद झाले आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाला सुरुवात झाली आहे. सोमवारी पुणयासह काही ठिकाणी गारपिटीने तडाखा दिला आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी आता ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केलाय. जळगाव, नाशिक,अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूरसह छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांसाठी’ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आलाय. उर्वरित महाराष्ट्रातही वादळी पावसाची शक्यता असल्याने तिथे ‘यलो अलर्ट’ कायम ठेवण्यात आलाय. राज्याच्या काही भागात पावसासोबतच मोठी गारपीट होण्याचा अंदाज असून ज्यामुळ शेतीच नुकसान होऊ शकते. बेस्ट, टाटा, अदानीच्या वीजदरात कपात आता राज्यातील वीज धारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. महावितरणच्या वीज दरात कपात झाल्यानंतर राज्यभरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला असतानाच मुंबईकरांना देखील दिलासा मिळणार आहे. मुंबईत विजेचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या दरात कपात होणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून नवे दर लागू होतील. 2026-27 या नव्या आर्थिक वर्षासाठी बेस्ट, अदानी आणि टाटा या तिन्ही कंपन्याच्या वीज दरात कपात होणार आहे. मे महिन्याच्या येणाऱ्या बिलात ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. एमईआरसीच्या मार्च 2025 च्या आदेशानुसार नवे दर लागू होतील. महावितरणने पाच वर्षात वीजदर कपातीसाठी मांडलेला प्रस्ताव मान्य करण्यात आलाय. घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांसाठीचे वीजदर 2030 पर्यंत टप्प्याटप्प्याने दरवर्षी कमी होणार आहेत. दरम्यान, महावितरणच्या याचिकेवर आयोगान गेल्या वर्षी मार्च अखेरीस एक आदेश दिला होता. त्या आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. महावितरणच्या वीज दरात कपात झाल्यानंतर राज्यभरातील वीज ग्राहकांना दिलासा मिळाला असतानाच मुंबईकरांना देखील दिलासा मिळणार आहे. लघू बचत योजनांवरील व्याज दर जाहीर केंद्र सरकारनं 1 एप्रिलपासून सुरु होणाऱ्या एप्रिल ते जून या तिमाहीसाठी लघू बचत योजनांवरील व्याज दर जाहीर केलेत. वित्त मंत्रालयानं 1 एप्रिल 2026 पासून सुरु होणाऱ्या तिमाहीसाठी लघू बचत योजनांच्या व्याज दरात कोणताही बदल केला नाही. त्यामुळं सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आता जुन्याच व्याज दरानं परतावा मिळेलं.वेगवेगळ्या योजनांसाठी केंद्राकडून वेगवेगळं व्याज दिलं जातं. सुकन्या समृद्धी योजनेच्या गुंतवणूकदारांना 8.2 टक्के व्याज दर मिळतो. त्याचवेळी तीन वर्षांच्या मुदत ठेव योजनेवर 7.1 टक्के परतावा दिला जातो. ही योजना सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. तर दुसरीकडं पब्लिक प्रॉविडंट फंड व्याज दर 7.1 टक्के ठेवण्यात आलाय. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4 टक्के व्याज मिळेल. तर, किसान विकास पत्र यावर 7.5 टक्के व्याज दर मिळेल.सरकारच्या या निर्णयामुळं हे स्पष्ट झालंय की व्याज दरात कोणत्याही प्रकारची वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळं जस्त्र परताव्याची अपेक्षा करणाऱ्यांना आणखी वाट पाहावी लागेल. स्पेनचा अमेरिकेविरोधात ऐतिहासिक निर्णय स्पेनने अमेरिकेच्या इराणविरोधी मोहिमेसाठी आपले आकाशक्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्पेनने केवळ आपल्या भूमीवरील लष्करी तळांचा (रोटा आणि मोरोन) वापर नाकारला नाही, तर अमेरिकन लष्करी विमानांना स्पेनच्या आकाशातून उड्डाण करण्यासही बंदी घातली आहे. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांचे म्हणणे आहे की, अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले हे ‘एकतर्फी’ आहेत. नाटो, संयुक्त राष्ट्र किंवा युरोपियन युनियनच्या अधिकृत संमतीशिवाय हे युद्ध सुरू असल्याने स्पेनने याला पाठिंबा यापूर्वीच नाकारला आहे. हा नियम इराणवरील हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व लढाऊ विमानांना, बॉम्बर्सना आणि हवेत इंधन भरणाऱ्या विमानांना लागू असणार असल्याचं स्पेननं म्हटलंय. राजस्थानचा पहिल्याच सामन्यात चेन्नईवर ‘रॉयल’ विजय! वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीने चेन्नईचा केला पालापाचोळा बरसापारा स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सला ८ गडी राखून पराभूत केले. १२८ धावांचे छोटे लक्ष्य राजस्थानने केवळ १२.१ षटकात गाठले. यासह सर्वाधिक ४७ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवण्याच्या बाबतीत राजस्थानचा हा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी २०१४ मध्ये आरसीबीविरुद्ध त्यांनी ४२ चेंडू राखून विजय मिळवला होता, तो विक्रम मोडीत निघालाय. या विजयासह राजस्थान रॉयल्सने आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. चेन्नईला आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा हरवणाऱ्या संघांच्या यादीत राजस्थान आता पंजाब किंग्ससह (१६ विजय) संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत मुंबई इंडियन्स २१ विजयांसह अव्वल स्थानी आहे. सलमानच्या आणखी एका चित्रपटाची घोषणा बॉलिवूडचा भाईजान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘मातृभूमी’मुळ चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. अशात सलमान खानने आता एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केलीय. त्याने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केलीय. सलमान खान ॲक्शन-थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगू दिग्दर्शन वामशी पेडिपल्लीसोबत सलमान काम करणार आहे. सलमान खाननं नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली ज्याने सर्वांचे लक्ष वेधू घेतलंय. सलमानने दिग्दर्शकासोबतचा एक फोटो शेअर करत नवीन चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटाचे नाव अजून जाहीर केलं नसलं तरी त्याचा हा नवीन चित्रपट ईद २०२७ च्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याची योजना असल्याचं म्हटलं जातंय. तर या चित्रपटाचं चित्रीकरण एप्रिल २०२६ मध्ये सुरू होणार आहे.