VSR च्या मालकाला अटक करा – जय पवार Top 10 news: राज्याचे दिवंगत उमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताच्या घटनेला 1 महिना झाल्यानंतर विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला. विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. दरम्यान, अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले असल्याचा दावा जय पवार यांनी केला आहे. माझ्या वडिलांना आपण गमावले. ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडीओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, असं जय पवार म्हणाले. मी DGCA ला ठामपणे मागणी करतो की, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी…ही एका मुलाची आर्तहाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी…असं एका पोस्टमधून जय पवार यांनी म्हटलंय. कमी पटाच्या शाळांचे दुसऱ्या शाळेत होणार समायोजन राज्यातील तीन ते पाच किमी अंतरातील कमी पटाची शाळा जास्त पटाच्या शाळेत समाविष्ठ करण्यात येणार आहेत. त्यामागे कमी पटामुळे त्या शाळांमध्ये शिक्षक मंजूर होत नसल्याचे कारण आहे. माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार राज्यात अशा २५० शाळा आहेत. सर्व शिक्षणाधिकाऱ्यांकडून अशा शाळांची माहिती मागविण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी संचमान्यतेचा नवा निर्णय घेतला. त्यानुसार शिक्षक पदाच्या मान्यतेसाठी किमान पटसंख्या निश्चित झाली. इयत्ता नववी व दहावीच्या वर्गात प्रत्येकी किमान २० पटाची अट आहे. या वर्गांसाठीची अट आता शिथिल होणार आहे, पण बाकीच्या वर्ग तथा तुकडीसाठी प्रतिशिक्षक विद्यार्थ्यांची संख्या निश्चित आहे. या निकषांमुळे अनेक शाळांना कुलूप लागणार असून अतिरिक्त शिक्षक देखील वाढणार आहेत. दरम्यान, आता २०२४-२५ व २०२५-२६ या दोन्ही वर्षांची संचमान्यता एकत्रित होत आहे. त्यानुसार पटसंख्येअभावी राज्यातील १७ हजार माध्यमिक शाळांमधील सुमारे सात हजार शिक्षक व एक हजार शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरत आहेत. त्यांचे समायोजन करत असताना कमी पटाच्या शाळांचे देखील जवळच्या दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन होऊ शकते, असंही सांगण्यात येतंय. नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अग्नितांडव महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मोठी दुर्घटना घडलीय. रविवारी एसबीएल कंपनीमध्ये विस्फोटामुळे आगीचा भडका उडाला होता. त्या दुर्दैवी घटनेत १७ जणांना आपले प्राण गमावावे लागले होते. या दुर्घटनेमुळे शहरात शोककळा असतानाच आज पुन्हा एकदा भयंकर आगीची घटना घडली. नरसाळा येथील चाणक्यापूरमध्ये सिंथेटिक पाईपला अचानक आग लागली. यामध्ये ५०० पाईप जळून खाक झाले. सुदैवाने आजूबाजूच्या घरात पोहचण्याआधी आग नियंत्रणात आणली गेली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळलीय. पाण्याच्या टाकीखाली साठवून ठेवलेल्या तब्बल १,७०० सिंथेटिक पाईप्सपैकी ७०० पाईप्स या आगीत जळून खाक झाले. या घटनेमुळे परिसरात सुमारे अर्धा ते एक तास धुराचे लोट होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. Top 10 news: अकोल्यात ठाकरे गटाच्या शहर प्रमुखावर प्राणघातक हल्ला अकोला शहराच्या राजकीय वर्तुळातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. अकोल्यात उद्धव ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. तीन अज्ञातांनी शहर प्रमुखाच्या बुलोरो वाहनाच्या काचा फोडल्याची प्राथमिक माहिती आहे. सोबतच हातात तलवार आणि लोखंडी पाईपाने ही तोडफोड केलीय. शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख राहुल कराळे हे मोठ्या उमरीतील आपल्या घराजवळ आल्यानंतर आपल्या बुलोरो वाहणात बसले असतांना हि खळबळजनक घटना घडलीय. कराळे यांच्या बुलोरो वाहनावर तिघांनी तलवार आणि पाईपाने हल्ला चढवत वाहनाच्या काचा फोडल्याय. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेरात कैद झाला आहे. सध्या CCTV फुटेज वरून हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी विशेष मोहीम Top 10 news: सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रशासकीय व सेवाविषयक तक्रारी असतात. या तक्रारी प्रलंबित राहिल्याने कर्मचाऱ्यांच्या निवृत्तवेतन लाभाला फटका बसतो. तसेच सद्य:स्थितीत कर्मचाऱ्यांच्या तक्रारी प्रलंबित राहिल्याने त्यांच्या कामावर परिणाम होतो. यामुळे आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाने कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होऊन त्यांच्या सेवेचा दर्जा सुधारण्यास मदत होईल, अशी आरोग्य विभागाची अपेक्षा आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय तक्रारींचे निवारण करण्यासाठी आरोग्य अदालत मोहीम सुरू करण्यात आली आहे. यात प्रशासकीय पंचसूत्री कार्यप्रणाली राबवून तक्रारी निकाली काढण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ.भगवान पवार यांनी ही मोहीम सुरू केली आहे. शत्रुत्व लवकर थांबवा- पंतप्रधान मोदी मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून संवाद साधलाय. या संभाषणादरम्यान त्यांनी या प्रदेशात लवकर युद्धबंदीची गरज असल्याचे अधोरेखित केलं. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे,तसेच भारत लवकर शांतता प्रस्थापित करण्याचे आणि हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केल्याचं सांगितलंय. दरम्यान, पंतप्रधान मोदींनी संयुक्त अरब अमिराती (UAE) चे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांच्याशीही संवाद साधला. त्यांनी UAE वरील हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आणि जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानाबद्दल शोक व्यक्त केला. या कठीण काळात भारत UAE सोबत उभा आहे आणि तेथे राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षिततेची खात्री केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो असंही त्यांनी म्हटलंय. भारतासह अनेक देशांना ओपेक देशांकडून दिलासा मध्य पूर्वेतील युद्धसदृश परिस्थिती असताना, तेलाच्या किमतींबद्दल मोठी चिंता होती. मात्र, पुरवठा टंचाई टाळण्यासाठी आणि किंमती नियंत्रणाबाहेर जाऊ नयेत म्हणून, सौदी अरेबिया आणि रशियासह OPEC+ देशांनी दररोज अतिरिक्त 206,000 बॅरल तेल बाजारात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. भारतासारख्या देशासाठी ही एक दिलासादायक बातमी आहे, जो त्याच्या कच्च्या तेलाच्या गरजांपैकी सुमारे 80 टक्के तेल आयात करतो. सर्वात मोठा धोका होर्मुझच्या सामुद्रधुनीशी संबंधित आहे. जर हा समुद्री मार्ग बंद झाला तर त्याचा जागतिक तेल पुरवठ्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. मध्य पूर्वेतील परिस्थिती वेगाने बदलत आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांनंतर, या प्रदेशात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. या तणावादरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. या घटनांमुळे जगभरात, विशेषतः तेल बाजारपेठेत चिंता निर्माण झाली आहे. इराणचे ४८ नेते एकाच वेळी ठार Top 10 news: अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे 48 नेते मारले गेल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय. आम्ही योग्य तेच करतोय असेही यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. इराण अणुबॉम्ब विकसित करत होता, त्यामुळे इराणच्या तळावर हल्ला करणं आवश्यक होतं असंही यावेळी ट्रम्प यांनी म्हटलंय. इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या दाव्याने खळबळ उडालीय. इराणविरुद्ध सुरू असलेल्या ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’अंतर्गत अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यांमध्ये इराणचे तब्बल ४८ नेते मारले गेल्याचे ट्रम्प यांनी सांगितलं. या मोहिमेत आम्हाला अनपेक्षित यश मिळत असून एकाच झटक्यात इराणचे ४८ नेते संपले आहेत. हे ऑपरेशन अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने पुढे जातय, असंही ट्रम्प म्हणाले. दरम्यान, इराणचे सर्वोच्च नेते आयतोलला अली खामेनी यांचाही या हल्ल्यात मृत्यू झाला असून, यामुळे इराणमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. अखेर खामेनींच्या मृत्यूचा बदला घेत इराणचा 9 देशांवर हल्ला अमेरिकेनं केलेल्या खामेनींच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या इऱाणनं इस्रायलसह आता मध्य-पूर्वेतील देशांवर हल्ले सुरु केलेत. इराणनं आतापर्यंत अमेरिकेची मदत करणाऱ्या 9 देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनचा मारा केलाय..त्यात इराणने युएईवर तब्बल 137 क्षेपणास्त्रे आणि 2029 ड्रोन हल्ले केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. खामेनींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणनं दुबई शहराला लक्ष्य करत लक्झरी हॉटेल बुर्ज अल अरबवर हल्ला केला.सौदी अरेबियातील रियाद, कतारमधील दोहा, कुवैतमधील कुवैत सिटी या ठिकाणीही इराणने हल्ला केला. त्यासोबत जॉर्डनमधील मुवाफ्फाक सल्ती एअर बेस आणि बहरीनमधील मनामा या ठिकाणी इराणनं क्षेपणास्त्र डागली. इस्रायल याच्या तेल अवीवमध्ये तर इराकमधील बगदाद आणि सीरियातील स्वेदामध्येही इराणनं हल्ला केलाय. बिग बॉसच्या घरात wild card एन्ट्रीचा तिहेरी धमाका! ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला सुरू होऊन आता जवळपास 50 दिवस पूर्ण होण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत या खेळात मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. दरम्यान, यावेळी शनिवारीच एलिमिनेशन करून बिग बॉसने सर्वांनाच धक्का दिलाय. त्यातच आता घरातील सदस्यांना आणि प्रेक्षकांना बिग बॉस देणार आहेत. शोमध्ये तब्बल तीन वाइल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री होणार असल्याची चर्चा रंगलीय. या तिघांची नावं सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतायेत. अभिनेत्री रेवा कौरसे हिचं नाव वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून समोर येत आहे. हिंदी मालिकांमधून ओळख मिळवलेल्या रेवाचा प्रवेश घरात होणार आहे.याशिवाय स्टार प्रवाहवरील मालिकांमुळे लोकप्रिय झालेला संकेत पाठक हाही घरात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यासोबत संस्कृती साळुंकेदेखील बिगबॉसच्या घरात एंट्री करणार असल्याचं म्हटलं जातंय.