भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर Top 10 News: भाजपकडून आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये सुनिल कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार यांचा समावेश आहे. भाजप यंदा विधान परिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना संधी देणार, अशी चर्चा सुरुवातीपासून होती. त्यासाठी भाजपने आधी 30 आणि नंतर 14 नावांची यादी दिल्लीला पाठवली होती. त्यापैकी पाच जणांच्या नावावर दिल्लीतील भाजप (BJP) नेतृत्त्वाने संमतीची मोहोर उमटवली. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी संधी मिळणार, हे आधीच निश्चित होते. मात्र, उर्वरित पाच जणांची निवड करताना भाजपने जातनिहाय समीकरणाचे भान ठेवत सोशल इंजिनिअरिंग साधताना पक्ष संघटनेतील निष्ठावंत आणि जुन्या नेत्यांनाही संधी दिल्याचे बोलले जात आहे. पार्थ पवारांचा व्हीएसआर कंपनीने प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार पार्थ पवार यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवास केल्याची पावती समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमासाठी पार्थ पवार व्हीएसआर विमानाने पोहोचले.याविषयी स्वतः पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत मोदी बाग, पुणे येथे पवार साहेबांना भेटण्यासाठी तातडीने पोहोचायचे असल्याने मी माझ्या कार्यालयाला विमानाची व्यवस्था करण्यास सांगितले होते. शेवटच्या क्षणी झालेल्या व्यवस्थेमुळे नकळतपणे VSR Aviation चे विमान माझ्यासाठी बुक करण्यात आले. विमानतळावर पोहोचेपर्यंत आणि विमानापर्यंत जाईपर्यंत हे विमान VSR Aviation चे असल्याची मला कोणतीही कल्पना नव्हती. ही केवळ प्रशासकीय पातळीवरील चूक होती. याची मी गंभीर दखल घेतली असून संबंधित विमान बुक करणाऱ्या एजंटशी असलेला करार आम्ही तत्काळ रद्द करत आहोत.तसेच VSR Aviation बाबत यापूर्वीची आमची भूमिका आजही कायम आहे. आमचा स्पष्ट विरोध आहे आणि पुढेही तशीच राहणार आहे. यावरून निर्माण केला जाणारा वाद पूर्णपणे निराधार, दिशाभूल करणारा आणि दुर्दैवी आहे. सत्य परिस्थिती समजून न घेता यावर राजकारण करण्याचा प्रयत्न योग्य नाही, असं स्पष्टीकरण पार्थ पवारांनी दिलं. उडक्यापासून मिळणार थोडा दिलासा राज्यात उकाड्याने अंगाची लाहीलाही होत असताना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार गेले काही दिवस उन्हाच्या चटक्यामुळे होरपळणाऱ्या विदर्भात पूर्वमोसमी पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून यलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. मात्र इतर ठिकाणी उकाडा कायम राहणार असून मुंबई, ठाणेसह अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा ४० अंशावर असणार आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, आज बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहू शकतात. या बदलत्या हवामानामुळे तापमानात किंचित घट होऊन उष्णतेपासून तात्पुरता दिलासा मिळू शकतो. दरम्यान, राज्यातील उर्वरित भागात मात्र उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर व्हिडिओ प्रकरण शाहिदच्या मित्राला कराडमधून अटक नाशिक आणि अमरावतीच्या परतवाड्याच्या घटनेनंतर राज्यात अशाच प्रकारची आणखी एक घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडालीय.युवतींचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पुलाची शिरोली येथील शाहिद सनदे या युवकाला अटक करण्यात आली, न्यायलयाने आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, त्याच्या फरार मित्रालाही पोलिसांनी कराडमधून अटक केल्याची माहिती आहे. याप्रकरणात, आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. शाहिदीने तरुणीवर अत्याचार करुन, त्याचे व्हिडीओ बनवत ते मित्राला शेअर केल्याचं उघड झालं आहे. तर आरोपी शाहिद सनदे याच्याकडे आणखी 8 ते 9 तरुणींचे व्हिडीओ असल्याचा पोलिसांना संशय आहे. शाहिदचा मित्र शाहरुख देसाई या कारवाईनंतर फरार झाला होता. मात्र, स्थानिक संघटनांच्या दबावानंतर पोलिसांनी त्याला शोधून काढले, शाहरुखला कराडमधून अटक करण्यात आली आहे. तर, पोलीस तपासात दोघांचेही आणखी काही प्रकरणे समोर आल्याच सांगण्यात येतंय. नदीवर कपडे धुवायला गेलेल्या तिघांचा मृत्यू Top 10 News: कपडे धुण्यासाठी वर्धा नदी नदीवर गेलेल्या तिघांचा वर्धा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ असलेल्या वर्धा नदीच्या घाटावरील ही घटना असून या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. दुपारच्या दरम्यान 6 ते 7 जण कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी, मृतकांपैकी दोन मुली आंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे अचानक त्या बुडू लागल्या, त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात वडिल राजू कोडापे यांनीही नदीपात्रात उडी घेतली, मात्र त्यांचाही मृत्यू झाला. मृतकांमध्ये राजू कोडापे , त्यांची मुलगी अर्पिता कोडापे आणि भाची प्रियांका मडावी यांचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी नदी पात्राकडे धाव घेतली. त्यानंतर, पोलीस आणि प्रशासनाला माहिती देण्यात आली असून बुडालेल्यांसाठी शोधमोहिम राबवण्यात येत आहे. पश्चिम बंगालमध्ये दुसर्या टप्प्यासाठी मतदानाला सुरुवात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी आज सकाळपासूनच उत्साह पाहायला मिळत आहे. या टप्प्यात राज्यातील १४२ विधानसभा जागांवर मतदान होत असून, मतदारांनी सकाळपासूनच केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. मतदानांच्या पार्श्वभूमीवर कडेकोटब बंदोबस्त ठेवण्यात आलाय…आज मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह अनेक दिग्गज नेत्यांचं भवितव्य EVMमध्ये बंद होणार आहे… पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये विक्रमी ९२ टक्के मतदान झाले होते, तोच कल याही टप्प्यात कायम राहील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, जास्तीत जास्त मतदारांनी आपला हक्क बजावावा असे आवाहन करण्यात आले आहे. या टप्प्यातील निकालांवरून राज्याच्या राजकीय भविष्याची दिशा ठरणार असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या मतदानाकडे लागले आहे. ‘या’ राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? दिल्लीमधील आम आदमी पक्षाच्या खासदारानंतर एक अख्खा राजकीय पक्षच भाजपमध्ये विलीन होणार असल्याची बातमी समोर आलीय. राजकारणात खळबळ उडवून देणारी ही बातमी आहे. नितीश कुमार यांच्या राज्यातील. RLM भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चेमुळे बिहार राज्यातील राजकारणासह देशातील राजकारणात खळबळ उडालीय. उपेंद्र कुशवाहा आणि त्यांचा पक्ष राष्ट्रीय लोक मोर्चा (आरएलएम) यांचे भारतीय जनता पक्षात (भाजप) विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. बिहारमधील नवीन सरकारच्या संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, उपेंद्र कुशवाहा यांच्यासमोर आपल्या पक्षाच्या भवितव्याबाबत एक मोठा निर्णय घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. सूत्रांनुसार, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर बिहारमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्याआधी उपेंद्र कुशवाहा यांना त्यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याचे म्हटले जातंय. विमान अपघातात पायलटसह १४ प्रवाशांचा मृत्यू दक्षिण सुदानची राजधानी जुबाजवळ विमानाचा अपघात झाला. या दुर्घटनेत १४ जणांचा जागीच मृत्यू झालाय. विमान छोटे असल्याने त्यात पायलटसह १४ जण प्रवास करत होते. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर क्षणात आगीचा भडका होऊन सर्व जण होरपळले. या आगीत होरपळल्यामुळे प्रवाशांच्या मृतदेहाची ओळख पटवणे देखील अवघड झालंय.दक्षिण सुदानच्या नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने सांगितलं की, ‘तेथील स्थानिक वेळेनुसार सकाळी ७.१५ वाजता दुर्घटना घडली. विमानाने जुबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उड्डाण घेतलं. त्यानंतर २० किलोमीटरवर जाऊन प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं. सैसना असे विमानाचे नाव आहे. विमानात पायलट आणि प्रवासी असे एकूण १४ जण होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, खराब वातावरण आणि दृश्यमानता कमी असल्याने विमान अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. रियान पराग अडचणीत आयपीएल 2026 च्या हंगामात (IPL 2026) काल राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स (RR vs PBKS) यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 6 विकेट्सने विजय मिळवला. पंजाब किंग्सचा या हंगामातील हा पहिला पराभव ठरला. राजस्थान आणि पंजाबच्या या सामन्यापेक्षा सध्या राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार रियान परागची चर्चा रंगली आहे. सामना सुरु असताना रियान परागचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये रिआन पराग ‘व्हेपिंग’ (ई-सिगारेटचा वापर) करताना दिसून येत आहे. या घटनेचे दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, बीसीसीआय आणि क्रीडा क्षेत्रात एकच खळबळ उडालीय. नियमांनुसार, स्टेडियमच्या आवारात आणि ड्रेसिंग रूमच्या आत धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. शिवाय, भारताच्या ‘इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायद्या’अंतर्गत, व्हेपचे उत्पादन, विक्री आणि वापर पूर्णपणे बेकायदेशीर मानला जातो, या कायद्याचे उल्लंघन केल्यास मोठा दंड आणि अगदी तुरुंगवासाच्या शिक्षेचीही तरतूद आहे.त्यामुळं घटनेची बीसीसीआयकडून अत्यंत गांभीर्याने दखल घेतली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. ‘द फॅमिली मॅन’च्या नव्या सीझनबद्दल मनोज वाजपेयींचा खुलासा Top 10 News: ओटीटी विश्वात प्रचंड लोकप्रिय ठरलेली ‘द फॅमिली मॅन ही वेब सिरीज पुन्हा चर्चेत आली आहे. या सिरिजच्या चौथ्या सीझनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सिरिजमध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता मनोज बाजपेयीने स्वतः ‘द फॅमिली मॅन 4’बाबत मोठा खुलासा केला आहे. अलीकडेच सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना मनोज बाजपेयी यांनी सांगितले, चौथा सीझन केवळ येणारच नाही, तर तो आतापर्यंतच्या कथेत उरलेल्या सर्व प्रश्नांची उकल करणार आहे. तो म्हणाला, ‘सर्व ॲक्शन आणि सर्व उत्तरं आता चौथ्या सीझनमध्येच मिळतील.’ यामुळे त्याच्या स्टेटमेंटमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढलीय. या सिरिजचे दिग्दर्शक राज आणि डीके सध्या सीझन ४च्या तयारीत व्यस्त असून पटकथा लेखन आणि नियोजनाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा सीझन अधिक भव्य आणि ॲक्शनने भरलेला असेल, अशी चर्चा रंगलीय.