आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार Top 10 News : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी ४ वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचं पार्थिव सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. रविवारी त्यांचं ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं होतं…वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांना हिंदी सिनेसृष्टीची वर्सटाईल गायिका म्हणून ओळखलं जायचं. तब्बल ६ दशकं त्यांनी इंडस्ट्रीत आपल्या गाण्यांना आवाज दिलाय. दरम्यान , आशाताईंचे पार्थिव आज सकाळी त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संगीत क्षेत्र, चित्रपटसृष्टी, राजकारण आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो चाहते ‘आशाताईं’ना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून शिवाजी पार्क परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. लाडक्या बहिणींसाठी आदिती तटकरेंचे खास ट्वीट जळगावमध्ये ईकेवायसीच्या नावाखाली महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. यावर महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी संताप व्यक्त केलाय. त्याशिवाय राज्यातील लाडक्या बहिणींना खास मेसेजही दिला. महिलांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, असं आवाहन त्यांनी केलंय. त्याशिवाय नव्यानं लाडकी बहीण योजनेची नोंदणी सुरू नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, ईकेवायसी करताना काही त्रुटी राहिल्यास त्या दुरुस्त करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आलीय. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही. महिला मोबाईलवरून स्वतः ईकेवायसी करू शकतात किंवा जवळील अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलीय. बॅक वॉटरमध्ये बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू पुण्यातील गुंजवणी धरण बॅक वॉटर परिसरात पाण्यात बुडून दोन सख्ख्या शेतकरी भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विद्युत शेतीपंपास पाणी कमी पडल्याने शेती पंप गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटर परिसरामध्ये टाकताना मोठ्या भावाचा तोल गेला. भाऊ बुडत असल्याचे दिसल्यानंतर छोट्या भावाने पाण्यात उडी मारली. पण दोन्ही सख्या भावांचा पाण्यामध्ये बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. दामाजी भाऊ गायकवाड आणि दत्तू भाऊ गायकवाड अशी मृत भावांची नावे आहेत. या दोन्ही शेतकरी कुटुंबातील सख्ख्या भावांचा मृत्यू झाला. गुंजवणी धरणाच्या बॅक वॉटर परिसरात असलेल्या घेवंडे गावात ही दुर्दैवी घटना घडल्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय . ईडीकडून खरातच्या प्रॉपर्टीची सखोल चौकशी सुरू मागील काही दिवसांपासून SIT कडून या प्रकरणाची कसून चौकशी सुरूय. खरातने केलेले अनेक काळे कारनामे रोज उघड होतायेत. दरम्यान,अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. तर खरात विरोधात दाखल महिला लैंगिक अत्याचाराच्या चौथ्या गुन्ह्यात SIT कडून आज पुन्हा खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय. खरातच्या ईशानेश्वर मंदिर, नाशिकचे कार्यालय आणि वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडी अधिकाऱ्यांनी पाहणी केल्याचही म्हटलं जातंय. यासाठी SIT अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू झाल्याची माहिती आहे. खरातच्या प्रॉपर्टीची मोजणी आणि सध्याच्या बाजारमूल्याचा तपास सुरु असून प्रॉपर्टी जमा करण्यामागील उद्देश काय? याचा शोध सुरू करण्यात आलाय. काही प्रॉपर्टीजमध्ये पार्टनर का लावले? याचाही तपास करण्यात यात असून सील केलेल्या बँक खात्यांवरील व्यवहारांचं देखील विश्लेषण सुरू असल्याचं म्हटलं जातंय. पंढरपुरात तरूणीवर ऍसिड हल्ला Top 10 News : अहिल्यानगरमध्ये नुकतंच अॅसिड हल्ला प्रकरण समोर आलं होतं. त्यातील आरोपीला अटक करण्यात अजूनही पोलिसांना यश आलं नाही, त्यातच आता आणखी एका ऍसिड हल्ल्याची एक मुलगीवर बळी ठरलीय. याप्रकरणी, पीडित मुलीला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा असताना ही धक्कादायक घटना घडल्यानं एकच खळबळ उडालीय. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमाकडून पीडित मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड सदृश्य पदार्थ टाकला. ज्यामुळं तिच्या चेहऱ्याला गंभीर इजा झालीय. दरम्यान,माझ्या मुलीवर टाकला तसा कुणावरही अॅसिड टाकू नका, असं भावनिक आवाहन पीडित मुलीच्या आईन केलंय. पोलिसांनी या प्रकारात अज्ञात तरुणाचा शोध सुरू केला असून या परिसरातील सीसीटीव्ही चेक करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, या प्रकाराने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप? गेल्या काही महिन्यांपासून कर्नाटकात मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमधील वाद काही दिवसांपूर्वी चव्हाट्यावर आला होता. कर्नाटक सरकारमधील काही आमदारांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस हायकमांडची भेट घेत उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती. मात्र, काँग्रेस हायकमांडन या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आलाय. कर्नाटक सरकारमधील जवळपास ३० काँग्रेस आमदार बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. ३० आमदार एकत्र मिळून तातडीने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती समोर येतीय. हे ३० आमदार एकत्र मिळून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे येत्या काही दिवसात कर्नाटकात मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सरकारी कर्मचारी अनेक दिवसांपासून आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून लागू झाला आहे मात्र प्रत्यक्ष पगारवाढ येण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात किती पगारवाढ होणार, याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. फिटमेंट फॅक्टर किती असणार असाही प्रश्न विचारला जात आहे. कारण फिटमेंट फॅक्टरवरच पगावाढ अवलंबून असते. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ किती असणार हे फिटमेंट फॅक्टरवर ठरणार आहे. जर फिटमेंट फॅक्टर २.५७ झाला तर बेसिक सॅलरी ३०-३५ टक्के वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळं आठवा वेतन आयोग लागू होण्यास जेवढा वेळ लागणार तेवढ्या महिन्याचा एरियर मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना ३ ते ९ लाखांपर्यंतचा एरियर मिळू शकतो, असं सांगण्यात येत आहे. वऱ्हाडाची बस ट्रकला धडकली उत्तर प्रदेशमधील हापुडमध्ये हायवेवर भयंकर अपघात झालाय. मध्यरात्री वऱ्हाडाची बस आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झालाय . या अपघातात अनेकजण गंभीर जखमी झालेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. पलिसांनी आणि गावकऱ्यांनी तात्काळ बसमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. जवळच्या रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. अपघातानंतरचे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेत. अमेरिकेचा इराणवर समुद्री वेढा इस्लामाबाद येथे झालेल्या अयशस्वी चर्चेनंतर आता अमेरिकेने कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आजपासून इराणच्या बंदरांची नाकेबंदी करण्यास सुरुवात होणार असल्याचं युएस सेंट्रल कमांडने म्हटलं आहे. इराणची बंदरे, किनारी भागात प्रवेश करणाऱ्या किंवा तिथून बाहेर पडणाऱ्या सर्व देशांच्या जहाजांविरोधात ही नाकेबंदी असेल असंही सेंटकॉमकडून स्पष्ट करण्यात आलंय. तसेच राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेनुसार त्यांचे सैन्य १३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता इराणच्या बंदरांमध्ये प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या सर्व सागरी वाहतुकीची नाकेबंदी करण्यास सुरुवात करेल.असं म्हटलंय. मात्र, जे जहाजे इराण सोडून इतर देशांच्या बंदरांकडे जाण्यासाठी ‘होर्मुझच्या सामुद्रधुनी’चा वापर करत आहेत, त्यांच्या नौकानयन स्वातंत्र्यात सेंटकॉमचे सैन्य कोणताही अडथळा आणणार नाही.असेही सांगण्यात येतंय. मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक Top 10 News : आयपीएलच्या १९ व्या हंगामातील २० वा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला गेला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या मुंबईला आपल्या घरच्या मैदानात पराभूत व्हावे लागले. आरसीबीला प्रथम फलंदाजीला आंमत्रित केल्यानंतर बेंगरुळुच्या संघाने तडाखेबाज फलंदाजी करत २० षटकांत ४ गडी गमावून २४० धावा केल्या. आरसीबीच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची भांबेरी उडाली. निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावत मुंबईचा संघ फक्त २२२ धावा करू शकला. याप्रकारे मुंबईचा संघ आपल्याच घरच्या मैदानात १८ धावांनी पराभूत झाला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा पराभव आहे. आधी दिल्ली कॅपिटल्स, नंतर राजस्थान रॉयल्स आणि आता आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबईचा पराभव झाला.