सुनेत्रा पवारांकडून तटकरे-पटेलांना साईडलाईन? Top 10 News : अजित पवार यांच्या निधनांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचं दिसतंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे राजकीय खळबळ उडालीय. या पत्रात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांचा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती समोर आलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी या पत्राद्वारे पटेल-तटकरे जोडीला ‘साईडलाईन’ करण्याचे संकेत दिले आहेत का? अशा चर्चांना आता उधाण आलाय. तर याच दरम्यान, आता सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. बुधवारी रात्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. सुनेत्रा पवार आज अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात येतंय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेले अंतर्गत वाद आणि निवडणूक आयोगाशी सुरू असलेला पत्रव्यवहार या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये महाराष्ट्र हा पुरोगामी आणि विकसित राज्य म्हणून ओळखला जातो. अशोक खरात प्रकरण हे निंदनीय आहे, त्यामध्ये कोणीही त्याची बाजू घेण्याचे किंवा समर्थन करण्याचे कारण नाही. राज्यातील कोणत्याही राजकीय नेत्याने अशोक खरात प्रकरणाचे समर्थन केलेले नाही. किंबहुना हे प्रकरण सगळ्या राजकीय मंडळींसाठी एक धडा आहे. असे वक्तव्य राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलं. त्यासोबतच अशोक खरातसोबत वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे फोटो आहे. कुठल्याही पक्षाच्या नेत्याने खरातचे समर्थन केलेले नाही. तसेच आपापसात एकमेकांची बदनामी करण्यापेक्षा महाराष्ट्राची एक विचारधारा आपण जपली पाहिजे. अशोक खरातबाबत माहिती असती तर महाराष्ट्रातील कोणताही राजकारणी त्याला भेटला नसता, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केलं. महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच भारतीय हवामान विभागानं राज्यात विविध ठिकाणी पुढील तीन दिवसात पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार राज्यात विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. बीड, जालना, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, धुळे, वाशिम, सिंधुदुर्गमध्ये पावसानं हजेरी लावली. रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीचा हंगाम सुरु असताना अवकाळी पाऊस हजेरी लावतत असल्यानं शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहे. काही ठिकाणी फळबागांना फटका बसला आहे. दरम्यान, पुढील २४ तासासाठी पुणे वेधशाळेने पावसाचा यलो अलर्ट दिला असून, पुढील दोन दिवस दुपारनंतर किंवा सायंकाळी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.तर अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात आला आहे. हातातोंडाशी आलेलं पिक गेल्यामुळे शेतकरी राजा हताश झाला. मावळातील शेतकऱ्याने सोनाली बेंद्रेला कोर्टात खेचलं Top 10 News : मावळ तालुक्यातील उकसान येथील एका जमिनीच्या व्यवहारामुळे बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. संबंधित जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असून ती बेकायदेशीरपणे विकत घेतल्याचा दावा स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी केला आहे. या प्रकरणी आता वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. सध्या या जागेवर मनाई आदेश अर्थात स्टे ऑर्डर मिळवण्यासाठी मागणी करण्यात आली असून, प्रकरणाची पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान, सोनाली बेंद्रे यांचे वकील राजू शिंदे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जन्मदात्याकडूनच तीन लेकरांना मारण्याचा प्रयत्न जन्मदात्या पित्याने तीन मुलींना विष पाजून स्वतःही आयुष्य संपवल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना उत्तर सोलापूर तालुक्यात घडली आहे. यामध्ये भीमा अण्णा वाघमारे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तिन्ही मुलींची प्रकृती गंभीर आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. भीमा वाघमारे हे एका सिमेंटच्या कंपनीत सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते. भीमा आणि त्यांच्या पत्नीत गेल्या अनेक दिवसापासून घरगुती कारणावरून वाद सुरू होते. याच वादातून पत्नीने माहेरी निघून गेली होती. भीमा वाघमारे यांनी आणि नातेवाईकांनी पत्नीचे समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण पत्नीने सासरी येण्यास नकार दिला. याच निराशातून भीमा वाघमारे यांनी हे कृत्य केल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. प्रीमियम पेट्रोल 11 रुपयांनी महागलं इराण-अमेरिका आणि इस्रायल युद्धाचा फटका आता भारतीय वाहनधारकांना बसू लागलाय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसह इतर प्रमुख तेल कंपन्यांनी प्रीमियम इंधनाच्या किमतीत लक्षणीय वाढ केलीय. विशेषतः हाय-परफॉर्मन्स गाड्यांसाठी वापरले जाणारे XP100 पेट्रोल आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलंय. तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचे मूल्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय. दिल्लीत याची किंमत 149 रुपयांवरून थेट 160 रुपये प्रति लिटर झाली. एक्स्ट्रा ग्रीन डिझेल 91.49 रुपयांवरून वाढून आता जवळपास 93 रु . प्रति लिटर झालय. बीपीसीएल आणि एचपीसीएलने देखील आपल्या \=मियम इंधनाचे दर सुधारित केले आहेत. त्यामुळं या युद्धाचा परिणाम सर्वसामानयांच्या खिशावर पडल्याचं दिसतंय. इरणचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज अमेरिकेला संबोधित केले. यावेळी इराणचे नौदल संपले, सर्व मोठे नेते मारले गेले. इरणाचे सैन्य आता अमेरिकेच्या नित्रंयणाखाली आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला. तसेच आखाती युद्धात अमेरिकेचा विजय झाला अशी घोषणाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. आम्ही युद्ध संपवण्याच्या अगदी नजीक आहोत. आम्ही कधीही मिळवला नाही असा विजय मिळवलाय. आमची सामरिक उद्दीष्ट आम्ही पूर्ण केली. आम्ही इराणला अण्वस्त्रसज्ज देश होण्यापासून रोखलं, त्याचा मला अभिमान आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकेला होर्मुझची गरज नाही, अमेरिकेकडे मुबलक तेल साठा, गॅससाठा आहे, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आम्ही नाटोतूनही बाहेर पडू, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे बुधवारी केनेडी स्पेस सेंटरमधून नासाने आपल्या महत्त्वाकांक्षी आर्टेमिस २ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. जवळपास ५० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर मानवजातीला चंद्राकडे परतण्याची संधी मिळाली आहे. या मोहिमेत चार अनुभवी अंतराळवीरांचा समावेश आहे. रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन या सर्वानी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. नियोजित वेळेनुसार झालेल्या या उड्डाणानंतर हे अंतराळवीर सुमारे दहा दिवसांच्या चंद्रप्रदक्षिणा प्रवासानंतर पृथ्वीवर परतणार आहेत. ही मोहीम चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याची नाही, तर भविष्यातील मोहिमांसाठी आवश्यक चाचण्या करण्याची आहे. अंतराळवीर चंद्राच्या सर्वात जवळच्या बिंदूपासूनही हजारो मैल दूर राहतील. तरीही, ही मोहीम भविष्यातील चंद्र मोहिमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. दिल्ली कॅपिटल्सची विजयी सलामी आयपीएल 2026 मधील पाचवा सामना एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेल याने प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय अचूक ठरला. दिल्लीच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी करत लखनौ सुपर जायंट्सला अवघ्या 18.4 षटकांत 141 धावांवर रोखले. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना समीर रिझवी याने शानदार अर्धशतक झळकावले. त्याच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने हा सामना 6 विकेट्सने जिंकत लखनऊवर दणदणीत विजय मिळवला. ‘छावा’चा सीक्वेल येणार? Top 10 News : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विक्की कौशल स्टारर ‘छावा’ छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनगाथेवर आधारित असणारा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला. 2025 मधील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरलेल्या ‘छावा’च्या ऐतिहासिक यशानंतर ही जोडी पुन्हा एकदा इतिहास घडवण्यासाठी एकत्र येणार असल्याची चर्चा आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ‘छावा’ सिनेमानं वर्ल्डवाईड बॉक्स ऑफिसवर तब्बल 807 कोटींची विक्रमी कमाई केली. या यशानंतर आता निर्माते या कथेला आणखी पुढे नेण्याच्या तयारीत आहेत. मराठा साम्राज्यातील आणखी एका महान व्यक्तिमत्त्वाची कथा पुढील भागात दाखवली जाणार असल्याच्या चर्चांना सध्या बी-वर्ल्डमध्ये उधाण आलंय. छावा’मध्ये संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा दाखवण्यात आली होती, तर या सिनेमाच्या सीक्वेलमध्ये त्यांचे सुपुत्र शाहू महाराज यांच्या जीवनावर आणि त्यांच्या संघर्षांवर आधारित कथा मांडली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.