गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद Top 10 news: आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षाचा परिणाम आता भारतातील हॉटेल उद्योगावरही दिसू लागला आहे. इराण-इस्रायल-अमेरिका संघर्षामुळे गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून मुंबईतील जवळपास 20 टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती आहार या संघटनेने दिली आहे. हा तुटवडा तुटवडा कायम राहिल्यास येत्या तीन दिवसात 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता वर्तवली जातीय. गॅसचा तुटवडा आणखी काही दिवस कायम राहिल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. पुढील तीन दिवसही गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर मुंबईतील सुमारे 50 टक्के हॉटेल्स बंद करण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा आहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.या समस्येबाबत आहार संघटना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांशी संवाद साधत आहे. तसेच राज्यातील अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची आज संघटनेचे प्रतिनिधी भेट घेणार असून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाणार आहे. गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले महाराष्ट्र विधानसभेत जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक मंजूर करण्यात आलंय. त्यामुळे आता महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक कामांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेत जमीन वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या विधेयकामुळे महापालिका आणि नगरपालिका हद्दीतील गायरान जमिनींच्या वापराबाबत मोठा बदल होणार आहे. हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक जनहिताच्या कामांसाठी वापरण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. नव्या निर्णयानुसार राज्यातील मनपा आणि नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील काही आरक्षण उठवण्यात येणार आहे. युद्धाची भारतातील लघुउद्योगांनाही झळ आखाती देशातील युद्धाची झळ आता भारतातील लघुउद्योग कंपन्यांना बसणार आहे. युद्धामुळं व्यावसायिक गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. परिणामी पिंपरी चिंचवडमधील पंधरा हजारांपैकी साडे सात हजार कंपन्यांना याचा फटका बसणार आहे. यापैकी काही कंपन्यांमधील गॅसचा साठा तर आजचं संपुष्टात आला आहे. तर काही कंपन्यांचा साठा येत्या चार ते पाच दिवसांत संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भोसरीतील श्री इंजिनिअर्स कंपनीतील व्यावसायिक गॅस संपल्यानं प्लाजमा मशीनचा पर्याय अवलंबला आहे. मात्र दिवसाचं उत्पादन थेट निम्म्यावर आलं आहे. एरवी त्यांचं महिन्याला चाळीस लाखांची उलाढाल होते, पण आजची परिस्थिती पाहता महिन्याकाठी वीस लाखांची उलाढाल घटणार हे उघड आहे. याचा विचार करता साडे सात हजार कंपन्याधील व्यावसायिक गॅस संपुष्टात आल्यावर नुकसानीचा आकडा कोट्यवधीत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. लाडक्या बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता अजूनही थकीत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता देण्यात आलेला नाही. फेब्रुवारी महिना संपून गेला आहे त्यानंतर मार्चचे पहिले १० दिवस उलटून गेले आहेत तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. फेब्रुवारीचा हप्ता जवळपास दीड महिना पुढे ढकलला आहे. त्यामुळे पैसे कधी येणार, असा प्रश्न विचारला जात आहे. फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये येऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यानंतर आतादेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. एकीकडे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसरीकडे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही दोन हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळीदेखील महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. याबाबत लवकरच माहिती दिली जाईल. घरगुती गॅस पुरवठ्याबाबत सरकारचा महत्वपूर्ण निर्णय सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यातील व्यत्यय आणि एलपीजी पुरवठ्यातील निर्बंध लक्षात घेता, मंत्रालयाने तेल रिफायनरीजना अधिक एलपीजी उत्पादन करण्याचे आणि त्या अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजीसाठी करण्याचे आदेश जारी केले आहेत. मंत्रालयाने घरगुती एलपीजी पुरवठ्याला घरगुती ग्राहकांना प्राधान्य दिले असून, साठेबाजी आणि काळ्या बाजाराला रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर-बुकिंग कालावधी सुरू केला आहे. दरम्यान, आयातित एलपीजी पासून होणाऱ्या नॉन-डोमेस्टिक पुरवठ्याला रुग्णालये आणि शैक्षणिक संस्थांसारख्या आवश्यक नॉन-डोमेस्टिक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे. अशी माहिती देत पेट्रोलियम मंत्रालयाचे गॅस पुरवठ्याबाबत स्पष्टीकरण दिलंय. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतंय. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस इतके केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्यापासून 24 दिवसांनी दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे. असं असताना घरगुती गॅस वापरला सरकारने प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडोनेशिया भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार Top 10 news: आग्नेय आशियातील संरक्षण मदतीसाठी एका नवीन दिशेने इंडोनेशियाने भारताकडून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय. या कराराची किंमत जवळपास ३ हजर कोटी असण्याची अपेक्षा आहे. इंडोनेशियाच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने या कराराच्या बातमीच दुजोरा दिलाय. त्यांनी देशाने ब्रह्मोस क्षेपणास्त्र प्रणाली मिळविण्यासाठी भारतासोबत करार केला आहे. हे पाऊल इंडोनेशियाच्या लष्करी क्षमतांचे आधुनिकीकरण आणि सागरी सुरक्षा, विशेषतः सागरी सुरक्षा मजबूत करण्याच्या धोरणाचा एक भाग म्हणून पाहिले जाते असे म्हटले. प्रगत क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याचा निर्णय इंडोनेशियाच्या संरक्षण धोरणाचा एक महत्त्वाचा भाग मानला जात आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र किनारी संरक्षण, जहाजे आणि इतर प्लॅटफॉर्मवरून सोडले जाऊ शकते, ज्यामुळे समुद्रात शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करणे सोपे होते. अहवालानुसार, हा करार इंडोनेशियाच्या लष्करी आधुनिकीकरण कार्यक्रमाचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश प्रादेशिक सुरक्षा आव्हानांना चांगल्या प्रकारे तोंड देणे आहे. तर अमेरिका इराणवर अत्यंत कठोर कारवाई करेल अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील तीव्र संघर्षाचे परिणाम जगभरात पाहायला मिळत आहेत. या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिला आहे. जागतिक तेल पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या होर्मुझची सामुद्रधुनी या समुद्र मार्गातून होणारी तेलाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न जर केला तर अमेरिका इराणवर अत्यंत कठोर कारवाई करेल असे ट्रम्प म्हणाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंबंधी पोस्ट केली आहे.ज्यात त्यांनी “जर इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी तेलाची वाहतूक रोखण्यासाठी काहीही कृत्य केले, तर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका त्यांच्यावर आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांच्या तुलनेत वीस पटीने अधिक जोरदार हल्ला करेल,” म्हटलंय. युद्ध आता “जवळपास पूर्णपणे” संपुष्टात आले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केलंय. इराणविरुद्ध सध्या सुरू असलेले युद्ध आता “जवळपास पूर्णपणे” संपुष्टात आले आहे, अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलीय. “इराणकडे नौदल नाही, दळणवळण व्यवस्था नाही, हवाई दलही नाही. त्यांच्याकडे आता फारच कमी क्षेपणास्त्रे शिल्लक राहिली आहेत. त्यांचे ड्रोन सर्वत्र पाडले जात आहेत. इराणकडे आता लष्करी सामर्थ्यासारखे काहीही उरलेले नाही.” असं म्हटलंय. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा या संघर्षामुळे केवळ पश्चिम आशियामध्येच नव्हे, तर संपूर्ण जगभरातच मोठी खळबळ उडाली आहे. ऊर्जा पुरवठ्याबाबत चे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चालले आहे. मात्र, इराणने ट्रम्प यांचे हे दावे पुन्हा एकदा फेटाळून लावले आहेत. हे युद्ध कधी संपवायचे, हे अमेरिका नव्हे, तर इराणच ठरवेल, असे इराणने ठामपणे नमूद केलंय. आयसीसीकडून टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा टी-20 विश्वचषकाच्या स्पर्धेनंतर आता आयसीसीकडून टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा करण्यात आली आहे. आयसीसीने स्पर्धेतील सर्वोत्तम म्हणजेच टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. या संघात भारताचे सर्वाधिक चार खेळाडू आहेत. यामध्ये संजू सॅमसन, जसप्रीत बुमराह, इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे. न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघातून कोणालाही निवडण्यात आलेले नाही. तर दक्षिण आफ्रिकेचे प्रत्येकी दोन, इंग्लंडचे दोन आणि वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि पाकिस्तानचा प्रत्येकी एका खेळाडूचा टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये समावेश आहे.टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानचा या संघात समावेश करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा एडन मार्करम याला कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. त्याने तीन अर्धशतकांसह 286 धावा केल्या. हार्दिक व्यतिरिक्त, इंग्लंडचा विल जॅक्स आणि वेस्ट इंडिजचा जेसन होल्डर यांना अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलाय. विशाखा सुभेदारांचा मुलगा अखेर मायदेशी Top 10 news: काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी एक व्हिडीओ शेअर करुन आपलाही मुलगा कुवेतमध्ये अडकल्याची माहिती दिली होती. तसेच, आपल्या मुलाला सुखरुप परत आणावं यासाठी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडं घातलं होतं. विशाखा सुभेदार यांनी रडत रडतच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः विशाखा सुभेदारांना फोन करुन मुलाला सुखरुप परत आणू असं आश्वासन दिलेलं. अशातच आता मराठी अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचा मुलगा मुंबईला परत आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पाठपुराव्यानंतर अभिनेत्रीचा मुलगा सुखरुप भारतात परतला असल्याची माहिती समोर आलीय.