राज्यसभा, विधान परिषदेवरून मविआत संघर्षाची ठिणगी Top 10 news: राज्याच्या राजकारणात सध्या आगामी राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीचे वारे वाहात आहेत. सात जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वाट्याला दोन्हीकडे एकेक जागाच संख्याबळानुसार येत आहे. मात्र या एकेक जागेवरून महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची चिन्हं दिसत आहेत. मविआत सध्या सर्वाधिक संख्याबळ ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे दोन्ही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा असल्याचं समजतंय. मात्र शरद पवारांना महाविकास आघाडीकडून राज्यसभेवर पाठवावं यालाही शिवसेना राजी आहे अशी माहिती आहे. विधान परिषदेच्या एका जागेवर उद्धव ठाकरेंना पाठवावं, यासाठी ठाकरेंची शिवसेना आग्रही आहे. मात्र दुसरीकडे नेमक्या याच मुद्द्यावरून काँग्रेस दुसरी भूमिका मांडत आहे. विलिनीकरणाबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आधी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याचं समजतंय. अखेर उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी काल राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. आज आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे एका कार्यक्रमानिमित्त एकत्र आले होते. या भेटींच्या चर्चा सुरु असतानाच उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून कोणाला संधी द्यायची याचा निर्णय घेतला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती आहे.सूत्रांच्या माहितीनुसार राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. जयकुमार गोरे यांच्याविषयी बोलताना भीती वाटते सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती झाल्यानंतर सत्ता नेमकी कोणाची येणार यावरून सस्पेन्स कायम आहे. काहीही झालं तरी भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते. शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यावर खोचक टीका करत ते आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज मंत्री ते आहेत.त्यांच्या वक्तव्यावर बोलताना आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही बोलत नाही कारण लगेच त्यांच्याकडून दुसरा पालकमंत्री नेमला जातो, असं म्हटलं टोला लगावलाय. भिगवणमधील ‘ती’ तरुणी मध्यरात्री पोलीस स्टेशनमध्ये दाखल इंदापूर तालुक्यातील भिगवनमध्ये आई आणि भावासोबत लग्नाची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र संबंधित तरुणीने व्हिडीओ शेअर करत जबरदस्ती नाही तर माझ्या इच्छेने मी निघून गेले असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान, अपहरण झालेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली आहे. मुलगी स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब मुलीने पोलिसांना दिला आहे. तसेच नेमकं काय घडलेलं, याबाबतही तरुणीने माहिती दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी आरोपी जहीर हरून शेख व आयान हरून शेख (रा. शेखवस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात लवकरच येणार पैसे Top 10 news: महायुतीमधील घटकपक्षांना राज्यात पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी गेमचेंजर भूमिका पार पाडणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारी 2026 च्या हप्त्याची प्रतीक्षा लाडक्या बहिणींना आहे. या योजनेच्या लाडक्या बहिणींना लवकरच जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळण्याची शक्यता आहे. कारण, जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागानं निधीची जमवाजमव सुरु केली आहे. सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जानेवारीच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 98. 45 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे. याबाबतचा शासन निर्णय 18 फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात लाडकी बहीणच्या हप्त्याची रक्कम मिळू शकते. ‘सिकंदर शेख’वर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न मुळशीत कुस्तीला गालबोट लागल्याची घटना घडली. सिकंदर शेखवर मैदानातच हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होतोय. या हल्ल्याप्रकरणी संताप व्यक्त केला जातोय. पुणे जिल्ह्यातील मुळशीतल्या पौड गावात कुस्तीचा आखाडा रंगला होता. महाराष्ट्र केसरी राहिलेल्या पैलवान सिकंदर शेखवर आखाड्यात हात उचलण्यात आला. त्याला चक्क मारहाण करण्यात आली. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. १७ फेब्रुवारीला महाशिवरात्री उत्सव आणि मुळशीतील पौड गावात भरलेली भव्य कुस्ती स्पर्धा चांगलीच चर्चेत राहिली. या स्पर्धेत महाराष्ट्राचा आघाडीचा मल्ल सिकंदर शेख आणि तगडा प्रतिस्पर्धी माऊली कोकाटे यांच्यात तब्बल ११ लाखांची कुस्ती रंगली होती. कुस्तीचे पंच होते आंतरराष्ट्रीय दर्जाचे रोहिदास आप्पा. तासभर दोन्ही मल्लांनी दमदार झुंज दिली पण निकाल लागत नव्हता. तर आयोजकांकडून कुस्ती निकाली लागल्याशिवाय थांबवली जाणार नाही अशा घोषणा केल्या जात होत्या. दरम्यान मानेवर मारण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही मल्लांमध्ये वाद निर्माण झाला. दोन्ही मल्लं आमने-सामने आले. इतक्यात मैदानाबाहेरून अचानक आलेल्या माऊली कोकाटेच्या समर्थकाने सिकंदर शेखला मारहाण केली. मारहाणीचा हा प्रकार कुस्ती पाहणाऱ्यांनी मोबाइल कॅमेऱ्यामध्ये कैद केले आणि त्यानंतर मैदानात एकच गोंधळ उडाला. शिट्ट्या…आरडाओरडा आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. लेकीचा मृतदेह गादीत गुंडाळला अन् कारमधून निघाले छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा किंवा तो लपवून नेण्याचा प्रयत्न सावत्र आई-वडील करत होते. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना यात यश आले नाही. पोलिसांनी आई-बापाला ताब्यात घेतले आहे. मुलीचे प्रेमसंबंध असल्याने हत्याचा केल्याचा संशय़ पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाची नोंद केली असून चौकशी केली जात आहे. मेघालयच्या ज्येष्ठ खासदाराचे दुर्दैवी निधन Top 10 news: मेघालयातील शलाँग मतदारसंघाचे खासदार आणि व्हीपीपी पार्टीचे जेष्ठ नेते रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन यांचं दु:खद निधन झालेय. ते ५४ वर्षांचे होते. फुटबॉल खेळताना अचानक कोसळले अन् त्यानंतर काही वेळातच त्यांचं निधन झाल्याची माहिती व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (व्हीपीपी) च्या एका नेत्यानं दिली आहे. रिकी अँड्र्यू यांच्या निधनानंतर मेघालय आणि देशावर शोककळा पसरली आहे. रिकी अँड्र्यू जे. सिंगकॉन हे गुरूवारी सायंकाळी शिलाँगमधील मावलाई मविओंग भागात मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते. सामना सुरू असतानाच अचानकच ते मैदानातच कोसळले अन् बेशुद्ध पडले. सिंगकॉन यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी भाजप आणि करणी सेनेच्या एका कार्यकर्त्याने आज एका व्हिडिओद्वारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना शिवीगाळ करणाऱ्या काँग्रेसच्या २५ खासदारांची गोळ्या घालून हत्या करण्याची धमकी दिली. या धमकीसाठी संसदीय कामकाजमंत्री किरण रिजीजू यांना जबाबदार ठरवून काँग्रेसच्या नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.‘भारताच्या सुरक्षेसाठी राहुल गांधी सर्वांत धोकादायक व्यक्ती असल्याचे विधान करून रिजीजू यांनी जनभावना भडकवल्या असल्याचा आरोप काँग्रेसने केला. राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांना गोळ्या घालून जिवे मारण्याची व्हिडिओवर धमकी देणाऱ्याचे नाव राज आमेरा असून तो राजस्थानच्या कोटा येथील रहिवासी आहे. ‘रिजीजू यांचे वक्तव्य ऐकून आणि संसदेत राहुल गांधी यांच्या इशाऱ्यावरून काँग्रेसच्या २५ खासदारांनी ओम बिर्ला यांना शिवीगाळ केल्यामुळे आम्ही भाजप आणि करणी सेनेचे कार्यकर्ते संतप्त झालो आहोत. या घटनेची पुनरावृत्ती झाल्यास राहुल गांधी यांना घरात घुसून गोळ्या घालू. पुढील घटनांची जबाबदारी प्रशासनावर असून या विधानामुळे तुरुंगात जावे लागले तरी बेहत्तर, असेही त्याने म्हटले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अल्टिमेटम अमेरिका आणि इराणमधील तणाव वाढला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आता इराणला १० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे, ज्यामध्ये या दहा दिवसांत अणुकरार करण्याची मागणी केली आहे. त्यांनी अशी धमकीही दिली आहे की दहा दिवसांत इराणसोबत अणुकरार होईल, अन्यथा इराणसाठी दुर्दैवाचा काळ सुरू होईल.असे म्हटले आहे. विचारविनिमय आणि वाटाघाटीसाठी दहा दिवस पुरेसा वेळ असेल. त्यानंतर जे घडेल ते खूप वाईट आणि दुर्दैवी असेल.असेही डोनाल्ड तपं यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर स्वित्झर्लंडमधील जिनेव्हा येथे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांच्याशी मोठे युद्ध रोखण्यासाठी अणुकरार करण्यासाठी वाटाघाटी करत आहेत.