मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द Top 10 news: मुस्लीम समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणासंदर्भात महत्वाची बातमी समोर आली आहे. मुस्लीम समाजाला देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द करण्यात आलंय. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने दिलेल्या आरक्षणानंतर प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पण आता राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलाय. आरक्षणाचा शासनादेश आणि परिपत्रक जारी करण्यात आलं असून, त्यात आरक्षण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आलीय. शासन निर्णयात मुस्लिम समाजाला देण्यात आलेले 23 डिसेंबर 2014 रोजीचे आरक्षण रद्द झाल्याचा उल्लेख करण्यात आलाय. आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र तरण आणि वैधता प्रक्रियेला शासनाकडून ब्रेक लावण्यात आलाय . “अजितदादांसह विलिनीकरणाबाबत १४ बैठका झाल्या” २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला. त्यानंतर महाराष्ट्रात दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा रंगू लागल्या, ज्या आजपर्यंत सुरु आहेत. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी या संदर्भात महत्वाचे विधान केले आहे. विलिनीकरणाचा मुद्दा चर्चेत आहे. कुठल्या पक्षाचं कुठल्या पक्षात विलिनीकरण होणार ? असा प्रश्न विचारला जातो आहे. त्यावर हेच उत्तर आहे की पवारांनी स्थापन केलेल्या पक्षाचं पवारांनी स्थापन केलेल्या पक्षात विलिनीकरण होणार होतं. आता कुणाला काय आक्षेप आहेत सांगा? याची कल्पना नव्हती असं कुणी म्हणत असेल तर यावर मी इतकंच सांगेन की ज्यांच्याशी चर्चा सुरु होत्या ते हयात नाहीत. पण या बैठका कुठे कुठे झाल्या? १४ बैठका कुठे झाल्या? मिटिंगचे मिनिट्स काय होतं? दादांच्या व्हाट्सअप वरुन आलेले मेसेज होते, व्हिडीओ फुटेज काय आहेत? जे नेते नाकारत आहेत तेही नेते कुठे होते. जयंत पाटील यांच्या घरी ११ वेळा बैठक झाली ही खरी बाब आहे. त्याबरोबर आणखी तीन बैठका झाल्या. आत्ता जे नकार देत आहेत त्यांचीही बैठक एक ठिकाणी झाली. पण ज्यांच्याशी चर्चा झाली ते अजितदादाच हयात नाहीत. त्यामुळे त्या चर्चांना अर्थ काय उरतो? असा सवाल अमोल कोल्हेंनी केलाय . आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजलं आहे. जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसह, नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग (वॉर्ड) रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित केलाय. यानुसार, येत्या 20 फेब्रुवारी 2026 पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे. असा असेल प्रभाग रचनेचा ‘थ्री-स्टेप’ प्लॅन प्रभाग रचनेचे काम प्रामुख्याने तीन टप्प्यांत पार पडणार आहे. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवर भर देण्यात आलाय . तरीही ब्लॅक बॉक्स कसा जळाला? Top 10 news: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाल्यानंतर ही दुर्घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडली आणि शेवटच्या क्षणांमध्ये काय घडले होते, या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही. या सगळ्याच्यादृष्टीने महत्त्वाचा असलेला विमानातील ब्लॅक बॉक्स जळून गेल्याची माहिती समोर आलीय. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन याबाबत काही सवाल उपस्थित केले आहेत. ब्लॅक बॉक्स हा उच्च तापमानातही वितळत किंवा जळत नाही. मग अजित पवार यांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स कसा जळाला, असा सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये, म्हणजे त्याच्या शेपटीमध्ये असतो. त्याचं कारणच हे असतं की, ज्यावेळी विमानाचा अपघात होतो, त्यावेळी विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही. त्यामुळंच हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो. अपघात झालेल्या त्या विमानाची शेपटी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे. ती अजिबात जळालेली नाहीये. त्यामुळं या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही.असं त्यांनी म्हटलंय. राहुल नार्वेकरांची अलिबागमध्ये शेकडो कोटींची जमीन खरेदी जमीन मोजणी वादाच्या चित्रफितीनंतर विधानसभा अध्यक्ष ॲड्. राहुल नार्वेकर यांच्या अलिबाग तालुक्यातील जमीन खरेदीच्या झपाट्याची चर्चा उघडपणे होऊ लागली. नार्वेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमीन खरेदी केल्याचे निवडणूक प्रतिज्ञापत्रांवरून स्पष्ट होत असून राहुल यांच्या पत्नी सरोजिनी आणि बंधू मकरंद यांनी २०२२ पासून अलिबाग तालुक्यात जवळपास ६० एकर जमीन खरेदी केल्याचे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसते. विशेष म्हणजे, २०२० ते २०२३ या काळात प्राप्तिकर विवरणपत्रात काही हजारांचे उत्पन्न दाखवणार्या नार्वेकर यांच्या पत्नी सरोजिनी यांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मात्र एकदम ९९ लाख उत्पन्नाचे प्राप्तिकर विवरणपत्र सादर केल्याचे आढळते, तर २०१७च्या महापालिका निवडणुकीत सहा कोटींची मालमत्ता ‘दाखवणार्या’ मकरंद नार्वेकर यांची २०२४ साली एकूण मालमत्ता एकदम १२४ कोटींवर पोहोचल्याचे स्पष्ट होते. आई-भावाच्या डोळ्यात तिखट फेकत तरुणीचं अपहरण इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. यात मुलगी, आई आणि भाऊ गाडीवरून जात असताना दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण केलंय. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीच वातावरण आहे. तर या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपहरण करणाऱ्या नराधमास त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाकही देण्यात आली आहे. दरम्यान, आरोपीच्या आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथके रवाना केली आहेत. मात्र अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेलं नसल्याने नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपहरण झालेल्या मुलीचे 22 फेब्रुवारीला म्हणजेच अवघ्या 4 दिवसांवर लग्न असताना हि घटना घडली आहे. परिणामी आज भिगवण बंदची हाक देण्यात आलीय. चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात लवकरच निवडणुका देशात या वर्षी चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू आणि केरळ या चार राज्यांसह पुदुच्चेरी या एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक मार्च महिन्याच्या मध्यावर जाहीर होण्याची शक्यता आहे. या राज्यांमध्ये एप्रिल महिन्यात विविध टप्प्यांत मतदान पार पडू शकते, अशी माहिती समोर आलीय. निवडणूक आयोग या पाचही विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यांत एकत्रितपणे करण्याची शक्यता आहे. या विधानसभांचा कार्यकाळ मे आणि जून महिन्यात संपत आहे. पुदुच्चेरी विधानसभेची मुदत १५ जूनला, आसामची २० मे, केरळची २३ मे, तमिळनाडूची १० मे आणि पश्चिम बंगाल विधानसभेची मुदत ७ मे रोजी संपत आहे. निवडणूक आयोगाने आधीच या राज्यांचा दौरा सुरू केला आहे. शेतकरी मुलाशी विवाह करणाऱ्या मुलींच्या नावावर १० लाख ठेवा कर्नाटक राज्य शेतकरी संघाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे शेतकरी मुलाशी विवाह करणाऱ्या मुलींच्या नावावर किमान १० लाखांची ठेव ठेवण्याची मागणी केली आहे. तसेच शेती किंवा शेतीपूरक लघुउद्योग सुरू करण्यासाठी सरकारने हमी देऊन व्याजमुक्त कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशीही विनंती केली आहे. विधानसौध याठिकाणी झालेल्या शेतकरी संघटनांसोबतच्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ही मागणी केली. शेतकरी वरांना वधू मिळत नसणे, ही सामाजिक समस्या बनली आहे. यामागील कारणांचा शोध घेऊन उपाययोजना कराव्यात, असे संघटनांनी नमूद केले. काँग्रेस पक्षाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनानुसार भू-सुधारणा दुरुस्ती कायदा मागे घ्यावा. मागील भाजप सरकारने आणलेला जनावरांची कत्तल बंदी आणि संरक्षण दुरुस्ती कायदा रद्द करावा, अशी मागणी देखील संघटनेनं केलीय. जगभरातील व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद Top 10 news: जगभरात लोकप्रिय असलेल्या व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube सेवा अचानक आज सकाळपासून बंद पडली. यु-ट्युब बंद झाल्याने कोट्यावधी युजर्सना याचा मोठा फटका बसला. सर्वात पहिल्यांदा मोबाईलवर युट्युबला तक्रारी होत्या नंतर लॅपटॉप आणि संगणकावरही याचा फटका जाणवू लागला. काही कालावधीनंतर लॅपटॉपवरी सुविधा सुरू झाली. तसेच YouTube TV संदर्भातही अडचणींच्या तक्रारी समोर आल्या. युट्यूबकडून या सेवेतील अडथळ्याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सेवा का बंद पडली याचे कारणही स्पष्ट झालेले नाही. मात्र ही अडचण जागतिक पातळीवर भासल्याचे दिसून आले असून विविध देशांतील वापरकर्त्यांनी तक्रारी नोंदवल्या. सिद्धार्थ मल्होत्राच्या वडिलांचे निधन! बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांचे निधन झाले आहे. ते बऱ्याच काळापासून आजारी होते. सध्या कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे त्यांच्या कुटुंबासह दिल्लीतच आहेत. वडिलांच्या निधानामुळे भावूक झालेल्या सिद्धार्थने स्वतः इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आणि सोबतच त्याच्या वडिलांसोबतचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. फोटो शेअर करत सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये, “मर्चंट नेव्ही कॅप्टन म्हणून समुद्रात नेतृत्व करण्यापासून ते आजारपणाला शांत धैर्याने तोंड देण्यापर्यंत, त्यांनी कधीही तडजोड केली नाही, कधीही आपला सन्मान गमावला नाही. तुमची प्रामाणिकता हा माझा वारसा आहे. तुमची शक्ती मला दररोज मार्गदर्शन करते. तुमची सकारात्मकता आपल्या कुटुंबाला एकत्र बांधून ठेवत आहे.”असं म्हणत आपलं दुःख व्यक्त केलंय.