Top 10 News : प्रभात हा महाराष्ट्रातील आघाडीचा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील ताज्या घडामोडी आणि सखोल विश्लेषण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. चला, जाणून घेऊया आज, 21 एप्रिल 2026 रोजीच्या टॉप 10 महत्त्वाच्या राजकीय घडामोडी… १) मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी, येसूबाई जशा लढल्या तशी लढेन; सुनेत्रा पवारांचा विश्वास सुनेत्रा पवार यांनी बारामतीतील सांगता सभेत भावनिक भाषण करत अजित पवार यांचा विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला. मी संघर्षयोद्ध्याची सहचारिणी आहे. येसूबाई जशा लढल्या तशी लढेन आणि अहिल्याबाई होळकर यांच्यासारखा न्यायी कारभार करेन. दादा नसले तरी त्यांची स्वप्ने जिवंत आहेत. ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, असं म्हणत बारामतीकरांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. बारामती पोटनिवडणुकीची सांगता सभेवेळी अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावूक झाल्याचं दिसून आलं. २) देवेंद्र फडणवीसांचं बारामतीकरांना मतदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतील सभेत भावनिक आवाहन करत सुनेत्रा पवार यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. बारामती येथे झालेल्या सांगता सभेत त्यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. आजची सभा म्हणजे अजित दादांच्या स्मृतीचा यज्ञ आहे. या यज्ञात मतांची आहुती दिली नाही तर आपण करंटे ठरू, असं वक्तव्य करत त्यांनी बारामतीकरांना मतदानाचे आवाहन केले. सुनेत्रा पवार यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून अजित पवार यांच्या कार्याला श्रद्धांजली द्यावी, असंही त्यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभेत भावनिक वातावरण निर्माण झाले. ३) शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर मुंबई ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या त्यांच्यावर विविध वैद्यकीय तपासण्या सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आलीय. याबाबत सुप्रिया सुळे यांनी माहिती दिलीय. नियमित तपासणी आणि चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व अहवाल आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती स्पष्ट होईल. काही दिवसांपूर्वीही त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता पुन्हा तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ४) पालघरमध्ये फटाका कंपनीत स्फोट, ७ जण होरपळले; एकाचा मृत्यू पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भीषण दुर्घटना घडलीय. कोनसई ग्रामपंचायत हद्दीतील फटाका बनवणाऱ्या कंपनीत दुपारी सुमारे १२ वाजता मोठा स्फोट झाला. या स्फोटात २० वर्षीय कामगार भावेश दिलीप वावर याचा जागीच मृत्यू झाला, तर सहा महिला कामगार गंभीर जखमी झाल्यात. जखमींवर वाडा आणि भिवंडी येथील रुग्णालयांत उपचार सुरू असून मोनिका जाधव यांची प्रकृती चिंताजनक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत सुतळी बॉम्ब तयार करण्याचे काम सुरू होते. दारू मिक्स करताना हा स्फोट झाला असून त्याची तीव्रता मोठी होती. स्फोटानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर कंपनीचे मालक आणि व्यवस्थापक फरार झाले आहेत. ५) पंतप्रधान मोदी दहशतवादी आहेत…; मल्लिकार्जुन खरगे यांचं वादग्रस्त वक्तव्य मल्लिकार्जुन खरगे यांनी चेन्नई येथील पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वाद पेटलाय. खरगे यांनी मोदींना उद्देशून वादग्रस्त शब्दप्रयोग केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मोदी एक दहशतवादी आहेत. त्यांचा पक्ष समानता आणि न्यायावर विश्वास ठेवत नाही. तसेच एआयएडीएमकेने आता आपली ओळख गमावलीय, ते पंतप्रधान मोदींचे गुलाम बनलेत, असं खर्गे यांनी म्हटलंय. दरम्यान, वक्तव्यावरून वाद वाढल्यानंतर खरगे यांनी स्पष्टीकरण देत आपला हेतू कोणालाही दहशतवादी म्हणण्याचा नव्हता, तर भीतीचे वातावरण निर्माण करण्याबाबत टीका करण्याचा असल्याचे सांगितले. ६) डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने चिंता वाढली डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ५ दिवसांसाठी हल्ले थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिलाय. चर्चेला प्रतिसाद न दिल्यास पुन्हा हल्ले सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. ट्रम्प यांच्या मते, दोन्ही देशांमध्ये संवाद सुरू असून तोडग्याच्या दिशेने प्रगती होत आहे. मात्र, इराणने हा दावा फेटाळत कोणतीही अधिकृत चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केलंय. या घडामोडींमुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली असून, तेलाच्या किमती, व्यापार आणि जागतिक स्थैर्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ७) गॅस सिलिंडरसाठी आता नवा नियम; DAC नंबर नसेल तर सिलिंडर मिळणारच नाही भारतामध्ये घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर वितरणासाठी सरकारने नवा नियम लागू केलाय. काळाबाजार आणि फसवणूक रोखण्यासाठी DAC नंबर म्हणजेच डिलिव्हर ऑथेंटिफिकेशन नंबर अनिवार्य करण्यात आलाय. आता गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर DAC नंबर पाठवला जाईल. डिलिव्हरीवेळी हा नंबर डिलिव्हरी बॉयला सांगितल्याशिवाय सिलिंडर मिळणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी आपला मोबाईल नंबर अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे. सध्या देशातील सुमारे ९२ टक्के गॅस डिलिव्हरी या प्रणालीद्वारे केली जात आहे. ऊर्जा संकट आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे गॅस वितरणात विलंब होत असतानाच, हा नवा नियम ग्राहकांची फसवणूक थांबवण्यासाठी महत्त्वाचा ठरतोय. ८) एअरटेलचा 84 दिवसांचा प्लान महाग; ग्राहकांना पुन्हा बसला झटका Airtel ने आपल्या प्रीपेड ग्राहकांना धक्का देत 84 दिवसांच्या लोकप्रिय रिचार्ज प्लानची किंमत वाढवलीय. यापूर्वी 859 रुपयांना मिळणारा हा प्लान आता 899 रुपयांना उपलब्ध झाला आहे. यासोबतच 799 रुपयांचा स्वस्त प्लानही कंपनीने बंद केलाय. दरवाढ होऊनही या प्लानमधील फायदे मात्र पूर्वीसारखेच ठेवण्यात आलेत. ग्राहकांना 84 दिवसांची वैधता, अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 SMS आणि दररोज 1.5GB डेटा मिळणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, येत्या काळात इतर टेलिकॉम प्लान्सच्या किमतीही वाढण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ९) ‘सैयारा’फेम जोडी पुन्हा एकत्र दिसणार! दिग्दर्शकाने केली आगामी चित्रपटाची घोषणा मोहित सुरी यांच्या आगामी चित्रपटाची घोषणा झाली असून ‘सैयारा’फेम जोडी पुन्हा एकत्र दिसणार आहे. अहान पांडे आणि अनित पड्डा यांना घेऊन मोहित सूरी नवा रोमँटिक चित्रपट करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे नाव ‘सतरंग’ ठेवण्याचा विचार सुरू आहे, मात्र अंतिम नाव अद्याप निश्चित झालेले नाही. ‘सैयारा’प्रमाणेच हा चित्रपटही प्रेमकहाणीवर आधारित असणार आहे. या जोडीला पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या चित्रपटाची पटकथा अंतिम टप्प्यात असून, वर्षाअखेरीस चित्रीकरण सुरू होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होऊ शकतो. १०) CSK संघाला सर्वात मोठा धक्का; आयुष म्हात्रे IPL मधून बाहेर चेन्नई सुपर किंग संघाला IPL दरम्यान मोठा धक्का बसलाय. संघाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आयुष म्हात्रे दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडलाय. आधीच खराब सुरुवात झालेल्या चेन्नई संघासाठी ही मोठी चिंता मानली जातेय. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर अपयशी ठरत असताना आयुषची अनुपस्थिती संघाला अधिकच अडचणीत आणणार आहे. आयुषने या मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा करत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे त्याच्या गैरहजेरीचा CSK च्या कामगिरीवर आणि प्लेऑफच्या आशांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.