अधिवेशन सोडून एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला रवाना Top 10 News: राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असून, या दौऱ्यात जागावाटप आणि मित्रपक्षांमधील समन्वयावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल दिल्लीत केंद्रीय अधिवेशनात सहभागी होणाऱ्या शिवसेना खासदारांची तातडीची बैठक घेतली. संसदेत पक्षाची भूमिका नेमकी काय असावी, याबाबत त्यांनी खासदारांना मार्गदर्शन केले. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा आढावा घेण्यासाठी ते वकिलांची भेट घेणार असल्याचेही कळते. मुंबईत महत्त्वाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीला रवाना झाल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जागावाटपाचा तिढा सोडवणे आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणे, हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे. ब्लॅकबॉक्सवरून रोहित पवारांकडून मंत्र्यांची कोंडी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “मंत्र्यांनी दिलेले उत्तर हे ‘थातूरमातूर’ आणि वेळ मारून नेणारे आहे,” अशी टीका करत रोहित पवारांनी थेट मंत्र्यांच्या पारदर्शकतेवरच सवाल उपस्थित केले आहेत. रोहित पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये एक गंभीर विसंगती मांडली आहे. त्यांनी विचारले की, “जर बारामती विमान दुर्घटनेतील ‘ब्लॅकबॉक्स’ सुरक्षित आहे, तर मंत्र्यांनी तो जळाल्याचे का सांगितले?” ब्लॅकबॉक्स हा कोणत्याही विमान अपघातातील सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. तो सुरक्षित असतानाही जळाल्याची खोटी माहिती का दिली गेली, याचे उत्तर मंत्र्यांनी द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. रोहित पवार यांनी मंत्र्यांवर व्यक्तिगत आणि आर्थिक संबंधांचेही आरोप केले आहेत. “ज्या VSR कंपनीचे विमान अपघातात सापडले, त्या कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात मंत्र्यांनी पाहुणचार घेतला होता. त्यामुळे मंत्री आता त्या ‘मिठाला’ जागून चौकशीत पारदर्शकता टाळत आहेत का?” असा बोचरा सवाल त्यांनी विचारला आहे. जालन्यात गोडाऊन फोडून 110 सिलिंडर चोरले जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आनंद भारत गॅस एजन्सीच्या उटवद शिवारातील गोडाऊनचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 110 गॅस सिलिंडर लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. चोरीस गेलेल्या सिलिंडरची अंदाजे किंमत साडेचार लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. विशेष म्हणजे एकीकडे नागरिकांना गॅस टंचाईचा सामना करावा लागत असताना हा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी एजन्सीचे व्यवस्थापक सिद्धार्थ आढाव यांनी मौजपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून या चोरीचा अधिक तपास सुरू आहे. समोर आलेल्या माहितीनुसार रविवारी गॅस एजन्सी बंद असताना मध्यरात्री ही चोरी झाल्याची शक्यता आहे. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत जवळपास 96 घरगुती सिलेंडर तसेच 12 निळ्या रंगाचे व्यावसायिक सिलेंडर आणि 5 किलोचे दोन व्यवसाय सिलेंडर असे एकूण 110 गॅस सिलेंडर चोरीला गेले आहेत, जवळपास 4 लाख 51 रुपये किमतीचा हा मुद्देमाल चोरीला गेला असून पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे. आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले मीरा-भाईंदरमधील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या 89 वर्षीय सुहासिनी माटेकर यांच्या हाताला उंदराने कुरतडल्याची भीषण घटना समोर आली होती. दुर्दैवाने उपचारादरम्यान काल संध्याकाळी सुहासिनी माटेकर यांचा मृत्यू झाला. 89 वर्षीय सुहासिनी माटेकर यांना 12 मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सुहासिनी माटेकर यांना पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील चौथ्या मजल्यावर असलेल्या अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी जेव्हा रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयात आले आणि त्यांनी महिलेच्या हातांवर जखमांच्या खुणा पाहिल्या. ज्या उंदरांनी चावल्यामुळे झाल्यासारख्या वाटत होत्या. यानंतर सीसीटीव्ही जेव्हा पाहिले, तेव्हा उंदराने सुहासिनी माटेकरांचा हात कुरतडल्याचे समोर आले. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेने रुग्णालयाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. नाशिकमधील तपोवनाच्या झाडांवर जादुटोणाचा प्रकार Top 10 News: नाशिकमध्ये सध्या चर्चेत असलेल्या तपोवनपरिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. आधीच वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून तापलेल्या या परिसरात आता अंधश्रद्धेच्या नावाखाली झाडांवर काळी विद्या केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या घटनेमुळे पर्यावरणप्रेमींसह नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळलीय. तपोवन परिसरातील झाडांवर एका कुटुंबातील व्यक्तींचे फोटो लावून त्यावर खिळे ठोकलेले आढळले आहेत. काही ठिकाणी या फोटोंना बिब्बे आणि काळ्या बाहुल्याही जोडण्यात आल्या आहेत. हा प्रकार जादूटोणा किंवा काळी विद्या करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचा दावा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसर आधीच संवेदनशील बनला आहे. झाडांच्या तोडीविरोधात आंदोलन सुरू असतानाच अशा प्रकारची घटना घडल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. ‘शिवालिक’ नंतर ‘नंदा देवी’ आज भारतात पोहोचणार देशातील वाढत्या एलपीजी संकटाच्या पार्श्वभूमीवर काहीसा दिलासा मिळाला आहे. इराण सरकारकडून विशेष परवानगी मिळाल्यानंतर भारतीय जहाजांच्या मार्गाला मंजुरी मिळालीय. सोमवारी, एलपीजीने भरलेले ‘शिवालिक’ हे जहाज गुजरातमधील मुंद्रा बंदरात दाखल झाले, तर आज ‘नंदा देवी’ आणि कच्चे तेल घेऊन जाणारे ‘जग लाडली’ हे जहाजही भारतीय किनाऱ्यावर दाखल होणार आहे. गॅस विनाविलंब रिफायनरी डेपोमध्ये पाठवता यावा यासाठी प्रशासनाने कागदपत्रांची पूर्तता आधीच केली होती. पश्चिम आशियातील परिस्थितीवर बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मध्यपूर्वेतील सध्याच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अडकलेल्या भारतीय जहाजांसंदर्भात भारताने केलेली राजनैतिक रणनीती यशस्वी ठरली आहे. इराणने विशेष परवानगी देऊन ‘शिवालिक’ला उतरण्याची परवानगी दिली, जे जहाज आता मुंद्रा बंदरात आपला माल उतरवत आहे. आज दाखल झालेले ‘नंदा देवी’ हे एलपीजीने भरलेले दुसरे मोठे जहाज आहे. संयुक्त अरब अमिरातीमधून ८१,००० टन कच्चे तेल घेऊन येणारे ‘जग लाडली’ हे जहाजही आज भारतीय बंदरात दाखल होईल. या तीन जहाजांच्या आगमनामुळे देशातील स्वयंपाकाच्या गॅस आणि इंधनाच्या पुरवठ्यात लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राईक अफगाणिस्तानमधील काबूलवर पाकिस्तानी हवाई दलाने एअरस्ट्राईक केला आहे. पाकिस्तानकडून रहिवाशी परिसर आणि रुग्णालयांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानी हवाई दलाने रुग्णालय आमि रहिवाशी भागांवर बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये आतापर्यंत जवळपास 400 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानी लष्कराने काबूलमधील पाच वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बहल्ला केला. यामध्ये 400 लोकांचा मृत्यू झाला असून 250 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. काबूलमध्ये सध्या बचावकार्य जोरात सुरू असून, निवासी भाग आणि रुग्णालयाच्या ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि जिवंत वाचलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. पाकिस्तानी हवाई दलाने वापरलेल्या अत्यंत शक्तिशाली स्फोटकांमुळे, संरक्षण मंत्रालय आणि GDI मुख्यालयाजवळील संपूर्ण आकाश आगीच्या ज्वाळांनी व्यापून गेले होते. तसेच राष्ट्रपती भवनालगतच्या निवासी भागांतूनही आगीचे प्रचंड लोळ उठत होते. श्रीलंकेलाही युद्धाचा फटका मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि गंभीर ऊर्जा संकटामुळे दक्षिण आशियाई देश हतबल झाले आहेत. पाकिस्ताननंतर आता श्रीलंकेलाही तीव्र इंधन तुटवड्याचा सामना करावा लागत आहे. देशातील तेलाचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी सरकारने एक कठोर आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. श्रीलंकेच्या सरकारने अधिकृतपणे चार दिवसांच्या कामकाजाच्या आठवड्याची अंमलबजावणी जाहीर केली. सरकारी संस्था, शाळा आणि विद्यापीठे आता आठवड्यातून फक्त चार दिवसच कार्यरत राहतील. इंधनाची बचत करण्यासाठी, सरकारी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था प्रत्येक बुधवारी पूर्णपणे बंद राहतील. कोलंबोत आयोजित पत्रकार परिषदेत, अत्यावश्यक सेवांच्या आयुक्त-जनरल यांनी वाहतुकीत वापरल्या जाणाऱ्या इंधनाचा वापर कमी करण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अभिषेक शर्मा बनणार सनरायजर्सचा नवा कर्णधार? आयपीएलच्या 19 व्या पर्वाला 28 मार्चला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या 2026 व्या पर्वाची पहिली मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. सनरायजर्स हैदरबादला सुरुवातीच्या काही सामन्यांसाठी नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स काही सामन्यांमध्ये दुखापतीमुळं खेळू शकणार नाही. यामुळं सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार निवडावा लागणार आहे. सनरायजर्स हैदराबादकडून अभिषेक शर्माला कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं. मीडिया रिपोर्टनुसार सनरायजर्स हैदराबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स आयपीएल 2026 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये शकणार नाही. पॅट कमिन्स डिसेंबर 2025 मध्ये ॲशेस मालिकेत खेळला होता. त्यानंतर दुखापतीनंतर पॅट कमिन्स ॲशेस मालिकेत खेळू शकला नाही. पॅट कमिन्स दुखापतीतून बरा झालेला नाही. त्यामुळं आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादकडून पॅट कमिन्स सुरुवातीच्या सामन्यात खेळू शकणार नाही. पॅट कमिन्सच्या गैरहजेरीत अभिषेक शर्मा सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार म्हणून नेतृत्त्व करु शकतो. मात्र, अद्याप सनरायजर्स हैदराबादकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. थलपती विजय-तृषा विवाहबंधांत अडकणार ? Top 10 News: सुपरस्टार अभिनेता थलपती विजय याच्या आयुष्यात सध्या वादळ आलंय. अभिनेत्याचा संसार सध्या मोडण्याच्या उंबरठ्यावर असून पत्नीनं त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे गंभीर आरोप लावलेत. अभिनेत्याचे त्याच्याच को-स्टारसोबत अफेअर सुरू असल्याचे गंभीर आरोप करत त्याच्या पत्नीनं घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. तर, दुसरीकडे पत्नीनं ज्या अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप लावले आहेत, तिच्यासोबत सुपरस्टार अनेकदा दिसून आलाय. अशातच आता सुपरस्टार पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर को-स्टारसोबत आपली लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. सुपरस्टार थलपती विजय आणि तृषा कृष्णन हे दोघे त्यांच्या रिलेशनशिपमुळे गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. सध्या हे दोघे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत, असं बोललं जातंय. आता, तृषाच्या आईच्या एका कृतीमुळे चर्चांना आणखी उधाण आलं आहे. विशेषतः, तृषाची आई उमा कृष्णन यांनी दिलेल्या एका प्रतिक्रियेमुळे चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. तसेच, विजय थलपती आणि तृषा कृष्णन दोघांच्या लग्नाच्या अफवांनाही उधाण आलंय.