मंचर -करोना व्हायरसचे संक्रमण व सरकारने घेतलेला लॉकडाऊनचा निर्णय यामुळे विक्रीस तयार असलेले टोमॅटोला बाजार मिळत नसल्याने आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक अर्थिक अडचणीत सापडला आहे.
तालुक्यात गतवर्षी चांगला पाऊस झाला. त्यात घोडनदी, डिंभे धरणातून डावा व उजव्या कालव्याला सोडण्यात येत असलेल्या आवर्तनामुळे विहिरी व तलाव तुडुंब भरले आहेत. उपलब्ध पाण्यामुळे लौकी, कळंब, चांडोली, पिंपळगाव, खडकी, अवसरी, पारगाव आदी गावातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे. शेतकऱ्यांनी नगदी पैशाचे पीक म्हणून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली.लौकी येथील शेतकरी प्रमोद थोरात यांचा एक एकर टोमॅटोचा बाग तोडणीस आलेला आहे.
लॉकडाऊनमुळे बाजार समित्या बंद आहेत. त्यात टोमॅटोची विक्री होत नसल्यामुळे टोमॅटो शेतातच गळून पडत आहेत.यामुळे हाता – तोंडाशी आलेला घास करोनाने हिरावला आहे. शेतकऱ्यांना अनेकदा अस्मानी संकटाचा सामना करावा लागतो. मुलां-बाळांचे शिक्षण, बॅंकेचे कर्ज फेडता येईल या आशेने टोमॅटोची लागवड केली.
पिकाला फळधारणा चांगली आहे. सध्या टोमॅटोच्या एका क्रेटला 50 ते 70 रुपये असा बाजारभाव आहे.त्यामुळे व्यापारी टोमॅटो उचलेनासे झाले आहेत. त्यात मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, रोपांची खरेदी, औषध फवारणी, खते आणि बाग बांधणी या सर्वाचा मिळून एकरी चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च होतो.त्यामुळे नफा मिळणे तर दूरच, झालेला खर्च पण भरून निघणार नाही.
पुढे टोमॅटोचे काय होणार? या प्रश्नाने शेतकरी संकटात सापडला आहे, असे श्रीकांत थोरात यांनी सांगितले. आगामी काळात टोमॅटोचे बाजारभाव वाढतील या आशेने शेतकरी रवींद्र थोरात व संतोष नंदाराम थोरात यांची टोमॅटो रोपांची लागवड सुरू आहे.