नवी दिल्ली – सध्या वार्षिक पातळीवर विविध महामार्गावरील टोल कलेक्शन 40 हजार कोटी रुपये आहे. त्यामध्ये वेगाने वाढ होत असून तीन वर्षांमध्ये प्रत्येक वर्षाला 1.40 लाख कोटी रुपयांचे कलेक्शन होईल असा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी केला आहे.
अर्थव्यवस्था विस्तारत असल्यामुळे भारतीय रस्त्यावरील प्रवासी आणि मालवाहतूक वेगाने वाढणार आहे. त्यामुळे रस्ते निर्मितीमध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीची चांगली संधी आहे असे त्यांनी या विषयावरील कार्यक्रमात बोलताना सांगितले. ते म्हणाले की, आतापर्यंत ज्या पायाभूत सेवा विकसित झाल्या आहेत, त्यातून योग्य परतावा मिळत आहे. त्यामुळे आगामी काळातही अशा सेवांवरील गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत राहील असे ते म्हणाले.
या अगोदर रस्ते निर्मितीसाठी जमीन अधिग्रहण करताना बऱ्याच अडचणी येत होत्या. मात्र आता सरकारने काही नाविन्यपूर्ण उपाययोजना केल्यामुळे जमीन अधिग्रहणासाठी फारशी अडचण येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
ज्या देशातील रस्ते चांगले असतात त्या देशाचा विकास वेगाने होतो असे अमेरिका आणि इतर विकसित देशाच्या इतिहासाकडे नजर टाकल्यानंतर दिसून येते. भारतातील रस्तेही चांगले होणार आहेत. त्यामुळे भारताचा विकासदर वाढत जाणार असल्याचे त्यांना वाटते.