मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधू अखेर एकत्र; उद्या दुपारी १२ वाजता युतीची घोषणा – मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठी बातमी समोर आलीय. शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात युती निश्चित झाली असून, उद्या बुधवारी दुपारी १२ वाजता याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिलीय. या ऐतिहासिक युतीसाठी जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युलाही समोर आला आलाय. ठाकरे गट १४५-१५०, मनसे ६५-७०, तर शरद पवार गट १०-१२ जागा लढवण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, ठाकरे गटाने आपल्या हक्काच्या १५ जागा मनसेसाठी सोडल्या असल्याचे बोलले जातेय. भाजपने मुंबईसाठी लावलेल्या जोरदार फिल्डिंगच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बंधू एकत्र आलेत. पुणे मनपा निवडणूकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? राजकीय हालचालींना वेग – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शरद पवार आणि अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये पुण्यात महत्त्वाची गुप्त बैठक पार पडली असून, भाजपविरोधात महाविकास आघाडीसोबत मिळून निवडणूक लढवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. बैठकीत अंकुश काकडे, वंदना चव्हाण, सुनील टिंगरे आणि चेतन तुपे यांसारख्या प्रमुख नेत्यांनी सहभाग घेतला. मात्र, या संभाव्य युतीमुळे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, युती झाल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिलाय. दुसरीकडे, पिंपरी-चिंचवडमध्ये माजी नगरसेवक अंबरनाथ कांबळे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्याने शरद पवार गटाला धक्का बसलाय. या घडामोडींमुळे पुण्याचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत. महापालिका निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज; ४० स्टार प्रचारकांची फौज मैदानात – राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा धुरळा शांत होताच आता २९ महापालिकांच्या रणधुमाळीला सुरुवात झालीय. या निवडणुकांसाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची तगडी यादी जाहीर केली असून, यात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि तेलंगणाचे मंत्री मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश आहे. पक्षाने जाहीर केलेल्या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांसारख्या दिग्गजांसह कन्हैया कुमार व जिग्नेश मेवाणी या युवा नेत्यांचाही समावेश आहे. तसेच रेवंत रेड्डी, सचिन पायलट आणि राज बब्बर या राष्ट्रीय चेहऱ्यांमुळे प्रचाराला अधिक धार मिळणार आहे. स्थानिक प्रश्न आणि महागाईच्या मुद्द्यांवर काँग्रेस आक्रमक प्रचार करून महापालिका काबीज करण्याच्या तयारीत आहे. वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित ; संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुनावणी 8 जानेवारीला – बहुचर्चित सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष मकोका न्यायालयाने मोठा निर्णय घेत वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर अधिकृतपणे आरोप निश्चित केले आहेत. खंडणीच्या व्यवहारात अडथळा ठरल्यामुळेच ही निर्घृण हत्या झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने आरोपांचे वाचन केले असता, वाल्मिक कराडने प्रथमच न्यायालयात बोलताना सर्व आरोप फेटाळून लावले. विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी आरोप केला की, बचाव पक्ष खटला लांबवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु न्यायालय आता फास्टट्रॅक पद्धतीने सुनावणी घेणार आहे. या प्रकरणात राजकारणही तापले असून, यापूर्वीच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जानेवारी रोजी होणार असून पुराव्यांचे सादरीकरण सुरू होईल. संविधान वाचवण्यासाठी आमचा लढा; राहुल गांधींचा जर्मनीतून भाजपवर निशाणा – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जर्मनी दौऱ्यात भाजप आणि आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केला. “भाजप देशातील संविधानाची मूळ भावना संपवण्याचा प्रयत्न करत असून, ईडी आणि सीबीआयसारख्या संस्थांचा वापर केवळ विरोधी नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी केला जात आहे,” असा आरोप त्यांनी बर्लिनमधील हर्टी स्कूलमध्ये केला. राहुल गांधी म्हणाले की, निवडणूक आयोग आणि इतर स्वायत्त संस्थांवर भाजपने ताबा मिळवला असून हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणुकांच्या निष्पक्षतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “भारतात केवळ मूठभर उद्योगपतींना झुकते माप दिले जात असल्याने बेरोजगारी वाढली आहे,” असेही ते म्हणाले. आरएसएससाठी सत्यापेक्षा सत्ता महत्त्वाची असल्याचा टोला त्यांनी लगावला. या दौऱ्यात त्यांनी बीएमडब्ल्यू मुख्यालयाला भेट देऊन भारतीय अभियांत्रिकीचे कौतुकही केले. हिंदू तरुणाच्या हत्येचे दिल्लीत पडसाद; बांगलादेश दूतावासाबाहेर ‘विहिंप’चे आंदोलन – बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यात दीपू चंद्र या हिंदू तरुणाच्या जमावाकडून झालेल्या हत्येच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेने दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर तीव्र निदर्शने केली. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केलीये. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, बांगलादेश सरकारने भारतीय उच्चायुक्त प्रणय वर्मा यांना पाचारण करून दिल्ली आणि सिलीगुडी येथील त्यांच्या दूतावासांवरील निदर्शनांबाबत चिंता व्यक्त केली. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने दिल्ली आणि सिलीगुडी येथील आपली व्हिसा सेवा तात्पुरती निलंबित केली आहे. भारताने राजनैतिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी युनूस सरकारने केली आहे. यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध अधिक ताणले गेलेत. मध्य प्रदेशात ४२ लाख नावे वगळली; भोपाळमध्ये सर्वाधिक फटका – मध्य प्रदेशात ‘एसआयआर’ अंतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये तब्बल ४२ लाख ७४ हजार १६० मतदारांची नावे वगळल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. मुख्य निवडणूक अधिकारी संजीव कुमार झा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. वगळण्यात आलेल्या नावांमध्ये ३१.५१ लाख मतदार स्थलांतरित किंवा अनुपस्थित आहेत, ८.४६ लाख मतदारांचा मृत्यू, तर २.७७ लाख नावे दुबार आढळलीत. राजधानी भोपाळमध्ये सर्वाधिक ४.३८ लाख मतदारांची नावे कापली गेली असून, यात गोविंदपुरा आणि नरेला विधानसभा मतदारसंघांचा मोठा वाटा आहे. या यादीवर दावे आणि हरकती नोंदवण्यासाठी २२ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत देण्यात आलीये. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन २१ फेब्रुवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर केली जाईल. चांदीची ऐतिहासिक झेप; वर्षभरात १३७% परतावा; सोन्यासह शेअर बाजार पडला फिका – जागतिक अनिश्चितता आणि औद्योगिक मागणीमुळे यंदा चांदीने गुंतवणुकीचे सर्व विक्रम मोडीत काढलेत. १ जानेवारी रोजी ९०,५०० रुपये प्रति किलो असलेली चांदी २२ डिसेंबरपर्यंत २,१४,५०० रुपयांवर पोहोचली असून, वर्षभरात गुंतवणूकदारांना तब्बल १३७% परतावा मिळाला आहे. त्या तुलनेत सोन्याने ७२% तर निफ्टी-५० ने केवळ ७% परतावा दिलाय. तज्ज्ञांच्या मते, सौर ऊर्जा, ईव्ही आणि एआय क्षेत्रात चांदीची मागणी वाढल्याने आणि पुरवठ्यात सलग पाच वर्षे घट झाल्याने ही तेजी आलीय. २०२६ मध्येही चांदी १५ ते २० टक्क्यांनी वधारण्याची शक्यता असून, टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा सल्ला विश्लेषकांनी दिलाय. टी-२० वर्ल्ड कप ७ फेब्रुवारीपासून; भारताच्या संभाव्य प्लेइंग-११ मध्ये सॅमसनला पसंती? ७ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंकेत रंगणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा झाली असून, संघ संयोजनाची चर्चा सुरू आहे. यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा सलामीला येण्याची दाट शक्यता आहे, तर ईशान किशनला राखीव खेळाडू म्हणून संधी मिळू शकते. मध्यक्रमात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांची जागा निश्चित आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, शिवम दुबे आणि अक्षर पटेल फिनिशरची भूमिका बजावतील. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह मुख्य वेगवान गोलंदाज असेल, तर खेळपट्टीनुसार अर्शदीप सिंग किंवा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादव यांच्यात निवड होईल. भारताचा पहिला सामना मुंबईत अमेरिकेविरुद्ध, तर पाकिस्तानविरुद्धचा हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये होईल. अमिताभ बच्चन यांच्याकडून कौतुकाची थाप; ‘केसरी २’ मधील अभिनयाने अनन्या पांडे भावूक- ‘कोण बनेगा करोडपती’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी केलेल्या स्तुतीने अभिनेत्री अनन्या पांडे भारावून गेली. आगामी ‘तू मेरा मैं तेरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या आणि कार्तिक आर्यन यांनी या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी बिग बींनी अनन्याच्या ‘केसरी चॅप्टर २’ मधील भूमिकेचे विशेष कौतुक केले. बच्चन म्हणाले, “मोठ्या कलाकारांच्या गर्दीतही अनन्याने आपल्या डोळ्यांतील भाव आणि लूकच्या माध्यमातून अप्रतिम काम केले आहे.” आपल्या अभिनयाचे असे कौतुक ऐकून अनन्याला अश्रू अनावर झाले. तिने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करत याला आयुष्यातील सर्वात मोठा क्षण म्हटले आहे. अनन्या आणि कार्तिकचा नवा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत असून, ‘केसरी २’ हा रघु आणि पुष्पा पालट यांच्या कादंबरीवर आधारित होता.