४ तहसीलदार, ४ मंडळ अधिकारी, २ तलाठी निलंबित – ९० हजार ब्रास गौण खनिज गैरव्यवहार प्रकरण – मावळ तालुक्यातील वनीकरणासाठी राखीव क्षेत्रात ९० हजार ब्रास अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर कारवाई केली आहे. या गैरव्यवहारात दोषी आढळलेल्या चार तहसीलदार, चार मंडळ अधिकारी आणि दोन तलाठी यांना निलंबित करण्यात आले आहे. आमदार सुनील शेळके यांनी मावळ येथील उत्खनन गैरव्यवहाराबाबत विधानसभेत लक्षवेधी मांडली होती. ३ लाख ६३ हजार ब्रासच्या परवानगीऐवजी तब्बल ४ लाख ५४ हजार ब्रास उत्खनन झाल्याचे ईटीएस मोजणीत निष्पन्न झाले. या ९० हजार ब्रास जादा उत्खननासाठी दोषींवर फौजदारी व महसूली कायद्यानुसार दंड आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबित अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. अवैध उत्खननाला आळा घालण्यासाठी राज्यभर ईटीएस सर्वे सुरू असल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांसाठी शासनाकडून महाविस्तार अॅप – फार्मर आयडी किंवा मोबाइल क्रमांक टाकून लॉगिन – राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेतीशी जोडण्यासाठी शासनाकडून महाविस्तार ॲप विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या ॲपचा वापर करावा म्हणून कृषी विभागाकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खरिप पेरणीपासून हवामान अंदाज, पिकांना वेळोवेळी द्यावे लागणारे खताचे डोस, फवारणी, हवामान बदल, बाजारभाव, पीक व्यवस्थापन, खतांचा वापर, पीकसल्ला, मृदा आरोग्य, गोदाम व्यवस्था, शेतमाल विक्रीबाबत सल्ला आणि डीबीटीवरील योजनांची माहिती मिळणार आहे. हे ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून यात शेतकऱ्यांसाठी मराठी भाषेतील चॅटबॉट सुविधा आहे. शेतीविषय कोणतेही समस्या तसेच प्रश्न शेतकरी चॅटबॉटला विचारू शकतात. प्लेस्टोरवरून ॲप डाउनलोड केल्यावर फार्मर आयडी किंवा मोबाइल क्रमांक टाकून वापरकर्त्यांना लॉगिन करता येईल. ‘शिंदेसेना’ म्हटल्यावरून शिवसेना – ठाकरे गट समोरासमोर आम्ही शिंदेसेना नाही शिवसेना – देसाई विधानसभेत आज सत्ताधारी शिवसेना व विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा असा उल्लेख केला. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी तीव्र आक्षेप घेतला. आम्हाला आयोगाने शिवसेना हे नाव दिले आहे. त्यामुळे आमचा उल्लेख शिवसेना असाच व्हावा, असे ते म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीच्या अनिल पाटलांनीही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच ओळखले जावे, अशी मागणी केली. सत्ताधारी पक्षांना स्वतःच्या ओळखीसाठी असा संघर्ष करावा लागत असल्याने या प्रकाराची विधानभवन परिसरात चर्चा रंगली होती. बेपत्ता मुलांच्या शोधासाठी विशेष मोहीम – मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय- योगेश कदम – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी राज्यातील लहान मुले पळवण्याच्या टोळ्यांबाबत आणि लहान मुले बेपत्ता होण्याच्या वाढत्या प्रमाणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले. तसेच या प्रकरणी विधिमंडळात चर्चा करण्याची गरज व्यक्त केली. राज ठाकरे यांच्या या पत्राला आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले आहे. योगेश कदम म्हणाले की, राज ठाकरे यांनी काय पत्र लिहिले मला माहिती नाही. पण लहान मुले अचानक हरवण्याच्या काही बातम्या आम्ही देखील पाहिल्या आहेत. मी या ठिकाणी एक आवर्जून सांगतो की जेव्हा लहान मुले हरवतात. तेव्हा त्यांचा तपास करण्यासाठी आपण विशेष तपास योजना राबवतो. या विशेष मोहिमांच्या दरम्यान हे लक्षात येते की अनेकांच्या मिसिंग तक्रारी दाखल नसतानाही त्यांना आपण शोधून काढले आहे. या विषयाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने लक्ष दिलेले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत बेपत्ता मुलांचा शोध घ्यावा असे निर्देश दिले आहेत. 1 लाखांची लाच घेताना पोलिस उपनिरीक्षकाला अटक – त्यांच्याच पोलिस ठाण्यात सापळा अन् गुन्हा – यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली. एका तक्रारदाराला उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात रणधीर यांनी ५ लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने अमरावती एसीबीकडे धाव घेतल्यानंतर, पडताळणीत रणधीर यांनी ३ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे उघड झाले. त्यानुसार, दुपारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील त्यांच्याच दालनात लाचेचा पहिला हप्ता १ लाख रुपये घेताना एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, रणधीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. RTO खात्यात बदलीसाठी प्रत्येकी 50 लाख मागितले – काय कारवाई करणार? अनिल परबांचा प्रश्न – ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी परिवहन विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत कळसकर यांच्याविरोधात विधान परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. कळसकर यांनी 331 अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा परब यांनी केला. यापैकी २४५ अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहितीही त्यांनी दिली. “माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे, मला कोणी रोखू शकत नाही,” असे म्हणत कळसकर अधिकाऱ्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप परब यांनी केला. कळसकर यांनी शेल कंपन्यांमध्ये काळे पैसे गुंतवल्याचा आरोप करत, परब यांनी या भ्रष्ट अधिकाऱ्यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच, कळसकर यांचे ‘ब्रह्मास्त्र’ कोण आहे, याचाही खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली. इंस्टाग्रामवर फक्त आवडीचे व्हिडिओ पाहू शकणार – ॲपमध्ये नवीन AI टूल ‘युवर अल्गोरिदम’ लाँच – टेक कंपनी मेटाने इंस्टाग्राममधील रील्स फीड अधिक पर्सनलाइज्ड करण्यासाठी नवीन युवर अल्गोरिदम’ हे फीचर लॉन्च केले आहे. हे सध्या अमेरिकेत लॉन्च करण्यात आले आहे, लवकरच इतर देशांमध्येही ते रोलआउट केले जाईल. नवीन फीचर वापरकर्त्यांना त्यांच्या रील्स फीडवर पूर्ण नियंत्रण देते. एआयच्या मदतीने वापरकर्ते पाहू शकतील की इंस्टाग्रामचा अल्गोरिदम त्यांच्यासाठी कोणते विषय निवडत आहे. हे तुमच्या आवडीनुसार व्हिडिओ दाखवेल, तसेच तुम्ही स्वतःच विषय जोडू किंवा काढू शकाल. कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे शिफारसी अधिक वैयक्तिक होतील, विशेषतः जेव्हा तुमची आवड बदलत राहते. यापूर्वी इंस्टाग्रामवर ‘नॉट इंटरेस्टेड’ किंवा ‘स्नूझ’ सारखे पर्याय होते, परंतु ते मर्यादित होते. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज स्वस्त- आता घराचं आणि इतर कर्ज घेणं होणार सोपं- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केल्यानंतर, देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियानेही ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने आपल्या कर्जाच्या मुख्य दरात EBLRमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. यामुळे कर्जावरील व्याज आता 7.90% झाले आहे. याचा अर्थ, आता गृह कर्ज आणि इतर कर्जे घेणे थोडे स्वस्त होईल. हे कमी झालेले दर 15 डिसेंबर 2025 पासून लागू होतील. बँकेने 1 वर्षाच्या कर्जाच्या दरात देखील 5 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. त्यामुळे ज्यांचे कर्ज या दराशी जोडलेले आहे, त्यांनाही फायदा होईल. दरम्यान, SBI ने 2 ते 3 वर्षांच्या FD दरात 5 बेसिस पॉईंटची कपात करत तो 6.40% केला आहे. तसेच, 444 दिवसांच्या ‘अमृत वृष्टी’ स्पेशल FD चा दरही 6.45% करण्यात आला आहे. पाकिस्तानात ‘धुरंधर’विरोधात याचिका दाखल – अक्षय खन्नासह कलाकारांवर FIRची मागणी – पाकिस्तानमधील कराची येथील न्यायालयात भारतीय चित्रपट ‘धुरंधर’ विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. यात आरोप करण्यात आला आहे की, चित्रपटात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्या छायाचित्रांचा, पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या झेंड्याचा आणि पक्षाच्या रॅलींच्या फुटेजचा परवानगीशिवाय वापर करण्यात आला आहे. यासोबतच, चित्रपटात पीपीपीला दहशतवादाचे समर्थन करणारा पक्ष म्हणून दाखवल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ही याचिका पीपीपी कार्यकर्ते मोहम्मद आमिर यांनी कराचीच्या डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्टमध्ये दाखल केली आहे. याचिकेत मागणी करण्यात आली आहे की, चित्रपटाचे दिग्दर्शक, निर्माते, कलाकार आणि चित्रपटाच्या प्रचार व निर्मितीशी संबंधित इतर लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात यावा. मेस्सी लवकर निघून गेले, चाहत्यांनी केली तोडफोड – मुख्य आयोजकाला अटक – अर्जेंटिनाचे फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी १४ वर्षांनी भारतात आले आहेत. त्यांच्यासोबत उरुग्वेचा स्टार फुटबॉलपटू लुईस सुआरेझ आणि अर्जेंटिनाचा मिडफिल्डर रॉड्रिगो डी पॉल हे देखील आले आहेत. हे तिन्ही खेळाडू रात्री उशिरा २.३० वाजता कोलकाता विमानतळावर पोहोचले. त्यांनी आज सकाळी ११ वाजता कोलकाता येथे ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. यावेळी शाहरुख खान देखील उपस्थित होता. त्यानंतर हे तिघेही सॉल्ट लेक स्टेडियमवर पोहोचले, पण लवकर निघून गेले. संतप्त चाहत्यांनी स्टँडवरून बाटल्या आणि खुर्च्या फेकण्यास सुरुवात केली. कार्यक्रमस्थळी तोडफोड केली. व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे हा गोंधळ झाला. या गोंधळानंतर मुख्य आयोजकाला अटक केली असून चाहत्यांच्या तिकीटांचे पैसे परत केले जाणार आहेत.