BMC निवडणुकीत घराणेशाहीचा वरचष्मा, कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत ‘घराणेशाही’चे स्पष्ट दर्शन घडतेय. शिवसेना (ठाकरे गट), भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांनी सामान्य कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या नातेवाईकांना झुकते माप दिलेय. ठाकरे गटाने ६, भाजपने ४, राष्ट्रवादीने ३ तर काँग्रेसने २ नातेवाईकांना मैदानात उतरवले आहे. यामध्ये सुनील प्रभू, विनायक राऊत, नवाब मलिक, अस्लम शेख, राहुल नार्वेकर, किरिट सोमय्या यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या मुला-मुलींना, भावंडांना व सुनेला उमेदवारी मिळालीय. लोकसभा व विधानसभेत पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये यामुळे तीव्र असंतोष पसरला असून, “आम्ही आयुष्यभर फक्त सतरंज्याच उचलायच्या का?” असा संतप्त सवाल निष्ठावान कार्यकर्त्यांकडून विचारला जातोय. अभिनेत्री निशा परुळेकर निवडणुकीच्या रिंगणात, मुंबई मनपासाठी भाजपची पहिली यादी जाहीर आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून ६६ उमेदवारांची पहिली अनौपचारिक यादी समोर आलीय. यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री निशा परुळेकर यांना प्रभाग क्रमांक २५ मधून उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्यात. निशा परुळेकर यांनी ‘सही रे सही’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांसह ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्यात. सध्या त्या भाजप सांस्कृतिक आघाडीच्या सहसंयोजक म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी नगरसेवकांच्या ताफ्यात एका ग्लॅमरस चेहऱ्याला संधी देऊन भाजपने नवीन डावपेच आखल्याची चर्चा आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, नव्या आणि जुन्या चेहऱ्यांच्या बळावर मुंबईवर कमळ फुलवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी वेगवान केलीये. ‘धनुष्यबाणाला मतदान करणारे स्वर्गात जाणार’, शहाजीबापू पाटलांचे अजब विधान आपल्या खास शैलीसाठी प्रसिद्ध असलेले शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजीबापू पाटील यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेय. सांगोला येथील सभेत बोलताना त्यांनी चक्क ‘स्वर्गाचा रस्ता’ सांगितला. “ज्यांनी धनुष्यबाणाचे बटण दाबले, त्यांना स्वर्गातच जागा मिळेल, देव त्यांना नरकात जाऊ देणार नाही,” असे अजब वक्तव्य त्यांनी केले. विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले की, ज्यांनी विरोधकांना मतदान केले त्यांच्यात ‘राम’ उरलेला नाही. याचवेळी त्यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांचा उल्लेख ‘पांढऱ्या पायांचे’ असा करत, ते जिथे जातील तिथे पराभव निश्चित असल्याची जहरी टीका केली. तसेच, भाजपने शिवसेनेचा सन्मान राखला नाही, तर आम्ही स्वबळावर जाण्यास मागे-पुढे पाहणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अरावली उत्खननावर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, 21 जानेवारीपर्यंत ‘जैसे थे’ स्थिती अरावली पर्वतरांगेतील टेकड्यांच्या व्याख्येवरून निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी महत्त्वाचा निर्णय दिला. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी तज्ज्ञ समितीच्या वादग्रस्त शिफारशींना तूर्तास स्थगिती दिली असून, २१ जानेवारी २०२६ पर्यंत अरावली क्षेत्रात कोणतेही नवीन खोदकाम किंवा खाणकाम होणार नाही, असे स्पष्ट केले. १०० मीटरपेक्षा कमी उंचीच्या टेकड्यांना अरावलीच्या व्याख्येतून वगळल्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होईल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आता एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. ही समिती खाणकाम आणि पारिस्थितिक सातत्य यावर निष्पक्ष मूल्यमापन करेल. तोपर्यंत केंद्र सरकारनेही नवीन खाणपट्ट्यांच्या वाटपावर बंदी कायम ठेवलीय. सिगरेटच्या किमतीत ४ पट वाढ होणार, एका स्टिकसाठी मोजावे लागणार ७२ रुपये देशातील तंबाखू शौकिनांना केंद्र सरकारने मोठा धक्का दिलाय. संसदेने ‘सेंट्रल एक्साइज (संशोधन) विधेयक, २०२५’ मंजूर केले असून, यामुळे सिगरेट, सिगार, हुक्का आणि खैनीवरील उत्पादन शुल्कात प्रचंड वाढ करण्यात आलीय. या निर्णयामुळे तंबाखूजन्य पदार्थांच्या किमती आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. नवीन दुरुस्तीनुसार, सिगरेटवरील उत्पादन शुल्क प्रति १,००० स्टिकमागे २००-७३५ रुपयांवरून थेट २,७०० ते ११,००० रुपयांपर्यंत वाढवण्यात आलेय. ही वाढ सिगरेटच्या प्रकारावर आणि लांबीवर अवलंबून असेल. खैनीवरील शुल्क २५% वरून १००% पर्यंत, तर हुक्का तंबाखूवर २५% ऐवजी ४०% कर आकारला जाईल. सरकारी अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार, सध्या बाजारात १८ रुपयांना मिळणारी एक सिगरेट लवकरच ७२ रुपयांना मिळण्याची शक्यता आहे. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी हे विधेयक सादर केले होते. 2026मध्ये AI घडवणार मोठी क्रांती, टेक जगताचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार – २०२६ हे वर्ष तंत्रज्ञान क्षेत्रासाठी एक मैलाचा दगड ठरणार असून, मानवी जीवनशैलीत आमूलाग्र बदल होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवलीय. २०२६ मध्ये AI डिजिटल जगातून बाहेर पडून भौतिक जगात प्रवेश करेल. स्मार्ट रोबोट्सचा वापर वाढेल. गोदामे, मॅन्युफॅक्चरिंग आणि अगदी घरांमध्येही मानवाप्रमाणे कौशल्य दाखवणारे रोबोट्स दिसू लागतील. मोठ्या शहरांमध्ये ड्रोन डिलिव्हरी आणि रोबोटिक टॅक्सी सामान्य होतील. AI मॉडेल्स मराठी, हिंदी यांसारख्या प्रादेशिक भाषांमध्ये अचूक होतील. स्मार्ट चष्म्यांमधील AI अधिक प्रगत होईल. AI केवळ ईमेल लिहिण्यापुरते मर्यादित न राहता, जटिल वैज्ञानिक संशोधनातही मदत करेल. ज्या औषधांच्या शोधासाठी वर्षानुवर्षे लागायची, ती प्रक्रिया AI मुळे काही आठवड्यांवर येईल. तुमच्या हातातील स्मार्ट रिंग किंवा घड्याळातील डेटावरून, आजारी पडण्यापूर्वीच AI तुम्हाला पूर्वसूचना देईल. थोडक्यात, २०२६ मध्ये AI हे केवळ एक ‘टूल’ न राहता मानवाचा एक ‘डिजिटल पार्टनर’ बनेल, जो शिक्षण, आरोग्य आणि कामाच्या पद्धतींमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणेल. मुलांना चहा-कॉफी देणे ठरू शकते घातक, मेंदूच्या विकासावर होतोय परिणाम आपल्याकडे चहा-कॉफीचे सेवन सर्रास केले जाते, परंतु लहान मुलांना याचे एक-दोन घोट देणेही त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केलेय. बालरोगतज्ज्ञांच्या मते, चहा-कॉफीमधील कॅफिन मुलांच्या विकसित होणाऱ्या मज्जासंस्थेवर नकारात्मक परिणाम करते. कॅफिनमुळे मेंदूतील ‘एडेनोसिन रिसेप्टर्स’ ब्लॉक होतात, ज्यामुळे मुलांची झोप उडते, चिडचिडेपणा वाढतो आणि एकाग्रतेत अडथळा येतो. तसेच, यातील साखरेमुळे लठ्ठपणाचा धोका वाढतो, तर टॅनिनमुळे हाडांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियमच्या शोषणात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे १२ वर्षांखालील मुलांना कॅफिन पूर्णपणे टाळावे. दिल्यास निद्रानाश, हृदयाचे ठोके वाढणे आणि शिकण्याच्या क्षमतेत घट होऊ शकते. मुलांना चहाऐवजी दूध, ताक, नारळ पाणी किंवा ताज्या फळांचा रस द्यावा. पालकांनी केवळ मुलांचा हट्ट पुरवण्यासाठी त्यांच्या भविष्यातील आरोग्याशी तडजोड करू नये, असे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केलेय. EPFO चा मोठा निर्णय, कोणत्याही कार्यालयातून होणार कामे नोकरदार वर्गासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने एक मोठा दिलासादायक निर्णय घेतलाय. आता पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्याशी संबंधित कामांसाठी विशिष्ट प्रादेशिक कार्यालयावर अवलंबून राहावे लागणार नाही. ‘पासपोर्ट सेवा केंद्रां’च्या धर्तीवर आता देशभरातील सर्व EPFO कार्यालये ‘सिंगल विंडो सर्व्हिस सेंटर’ म्हणून कार्यरत होतील. केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नवीन सुविधेमुळे कर्मचारी कोणत्याही शहरात किंवा कोणत्याही कार्यालयात जाऊन आपला क्लेम, तक्रार किंवा केवायसी अपडेट करू शकतील. याशिवाय, वर्षानुवर्षे पडून असलेल्या ‘इनऑपरेटिव्ह’ खात्यांमधील पैसे मिळवून देण्यासाठी सरकार विशेष डिजिटल मोहीम राबवणार आहे. तसेच मार्च २०२६ पर्यंत १०० कोटी नागरिकांना सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. अभिनेता विजय थलापती पडले, चेन्नई विमानतळावर चाहत्यांची झुंबड – तामिळ सुपरस्टार आणि ‘टीव्हीके’ पक्षाचे अध्यक्ष थलापती विजय रविवारी रात्री चेन्नई विमानतळावर गर्दीमुळे घसरून पडले. मलेशियाहून परतल्यानंतर चाहत्यांनी त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. या गोंधळात विजय यांचा पाय घसरला, मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने सावरून सुखरूप गाडीत बसवले. सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. विजय त्यांच्या आगामी ‘जननायकन’ चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चसाठी मलेशियाला गेले होते. क्वालालंपूर येथील कार्यक्रमाला १ लाख चाहत्यांनी हजेरी लावली होती, ज्याची नोंद ‘मलेशियन बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झालीय. याच सोहळ्यात विजय यांनी चित्रपटातून निवृत्ती घेऊन पूर्णवेळ समाजकारणात उतरण्याचे संकेत दिले. “माझ्यासाठी किल्ला उभारणाऱ्या चाहत्यांसाठी मी सिनेमा सोडत आहे,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. हा चित्रपट पोंगल २०२६ ला प्रदर्शित होणार आहे. भूतानच्या सोनम येशेचा जागतिक विक्रम, टी-२० मध्ये ८ विकेट्स घेणारी पहिली खेळाडू भूतानची २२ वर्षीय फिरकीपटू सोनम येशे हिने म्यानमारविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात नवा इतिहास रचलाय. सोनमने अवघ्या ७ धावा देऊन ८ फलंदाजांना बाद करत पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांतील क्रिकेटचे सर्व विक्रम मोडीत काढले. आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये ८ विकेट्स घेणारी ती जगातील पहिलीच खेळाडू ठरलीय. प्रथम फलंदाजी करताना भूतानने नामगे चेजेच्या अर्धशतकाच्या (५० धावा) जोरावर १२७ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात सोनमच्या भेदक गोलंदाजीसमोर म्यानमारचा डाव अवघ्या ४५ धावांत आटोपला. भूतानने हा सामना ८२ धावांनी जिंकला. या ऐतिहासिक कामगिरीमुळे सोनमने मलेशियाच्या स्याजरुल इद्रुसचा (७ विकेट्स) विक्रम मागे टाकलाय.