जागतिक मंदीमुळे आर्थिक स्थिती बिकट
– तुटीचा अर्थसंकल्प असण्याची शक्यता
– कठोर आर्थिक शिस्तीचे धडे देणारा असल्याचे संकेत
मुंबई : जागतिक मंदी, महसुलातील घट, खर्चाचा व कर्जाचा वाढता बोजा यामुळे महाराष्ट्राची आर्थिक घसरण सुरूच असून राज्याची परिस्थिती बिकट आहे. गुरुवारी सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालातून राज्याची पिछेहाट झाली असून शुक्रवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पातून राज्याची बिकट स्थिती समोर येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री अजित पवार हे उद्या, दुपारी उद्धव ठाकरे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. बिकट परिस्थितीवर मात करून आघाडी सरकार राज्याची आर्थिक घडी कशी बसवणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र विकास आघाडीचा उद्या पहिला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. वित्तमंत्री अजित पवार हे विधानसभेत, तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडतील.
जागतिक आर्थिक मंदीचे काळे सावट, नोटाबंदीचे गंभीर परिणाम, जीएसटीमुळे घटलेले राज्याचे उत्पन्न तसेच केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या उत्पन्नाचे कमी झालेले प्रमाण यामुळे राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प कठोर आर्थिक शिस्तीचे धडे देणारा असल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत.
राज्याला तब्बल 40 हजार कोटींची महसूली तूट असून त्यामुळे हा तुटीचा अर्थसंकल्प असेल अशी शक्यता आहे.
ठाकरे सरकारचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज्याची बिघडलेली आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही कठोर उपाययोजना या अर्थसंकल्पात मांडण्याची शक्यता आहे.
राज्यातील मागील पाच वर्षे सत्ते असलेल्या भाजपप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारने मोठ्या प्रमाणावर योजनेत्तर खर्च केले असून त्याचा मोठा बोजा राज्याच्या अर्थव्यवस्थेवर पडला आहे.
त्यामुळे फडणवीस सरकारच्या काही अवाजवी योजना तसेच प्रकल्पांना याचा फटका बसण्याची भिती व्यक्त होत आहे.