श्रेष्ठ निसर्गकवी, बालकवी म्हणून प्रसिद्ध असलेले त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचा आज जन्मदिन (जन्म 13 ऑगस्ट 1890). त्यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला. एरंडोल, यावल, जामनेर अशा निरनिराळ्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले.
धुळे येथील प्रिपरेटरी स्कूल आणि अहमदनगर येथील अमेरिकन मिशन हायस्कूल या शाळांत त्यांचे इंग्रजी शिक्षण झाले. तसेच महाबळेश्वर येथील ख्रिस्ती मिशनरींच्या एका शाळेत काही काळ अध्यापन केले होते. देशभक्तीच्या तत्कालीन कल्पनांच्या प्रभावामुळे बालकवींना तसेच त्यांच्या वडिलांना इंग्रजी शिक्षणाबाबत उत्साह नव्हता. त्यांचा बराचसा अभ्यास घरीच झाला.
बालकवींची वडील बहीण जिजी यांनी त्यांना संस्कृतचे आरंभीचे पाठ दिले तसेच कवितेची गोडीही त्यांच्या या बहिणीमुळेच लागली. संस्कृत भाषेवर पुढे त्यांनी प्रभुत्व मिळविले. त्यांच्या कवितेतील शब्दयोजनेमुळे याची साक्ष पटते. पंडिती कविता आणि शाहिरी कविता यांचा सुंदर संगम त्यांनी घडविला. इंग्रजी कवितेचे त्यांचे वाचन मर्यादित असले, तरी इंग्रजी कवितेची त्यांची समज उत्तम होती.
वयाच्या तेराव्या वर्षी नवापूर येथे असताना त्यांनी आपली पहिली कविता लिहिली. या कवितेला त्यांनी शीर्षक दिलेले नव्हते. मात्र, बालकवींच्या समग्र कवितेचे संपादक प्रा. भा. ल. पाटणकर यांनी तिला “वनमुकुंद’ असे नाव दिलेले आहे. कवितेच्या लयीची जाणीव, निसर्गप्रेम, श्रद्धा ही बालकवींच्या कवितेची काही लक्षणीय वैशिष्ट्ये होती.
तीन-चार वर्षांत त्यांची कविता अधिकाधिक फुलत गेली आणि जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (1907) त्यांनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्यांना “बालकवी’ हे नाव देऊन त्यांचा गौरव केला. त्यानंतर लवकरच मराठीतील श्रेष्ठ कवी म्हणून त्यांचा लौकिक झाला. “बालकवी’ हे नावही रूढ झाले. बालकवींची काव्यकारकीर्द उणीपुरी दहा वर्षांची होती.
लेखक आणि कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक यांच्याबरोबर त्यांनी बालपणातील काही काळ घालवला. ना. वा. टिळक यांनी त्यांच्यामधील प्रतिभा ओळखून त्यांना आपल्या घरी आणले. लक्ष्मीबाई टिळक यांनी त्यांच्यावर पुत्रवत प्रेम केले. बालकवी जेव्हा टायफॉइडने आजारी होते तेव्हा ना. वा. टिळकांनी व लक्ष्मीबाईंनी चाळीस दिवस त्यांची काळजी घेतली. लक्ष्मीबाईंनी त्यांच्या “स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रात बालकवींच्या काही आठवणींचा उल्लेख केला आहे.
त्यांच्या कवितांची शीर्षके पाहिली तर निसर्गासंबंधी दिसतात व त्यातील शब्दरचनाही निसर्गाधिष्ठित दिसून येते म्हणून त्यांना “निसर्ग कवी’ म्हणूनही ओळखले जाते. योगायोगाने त्यांचा जन्म श्रावण महिन्यात झाला व “श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे’ ही कविता लोकप्रिय झाली. “निर्झरास’, “फुलराणी’, “संध्या-रजनी’, “अरुण’ या कविता त्यांचे निसर्गप्रेम दाखवितात. त्यांनी बालगीतेही लिहिली त्यातील पक्ष्यांविषयीची गीते विशेष सुंदर आहेत. त्यांच्या कविता शाळेमधून ठेक्यात गायल्या जातात.
“आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे’ या कवितेतून निसर्गाचे सुरेख दर्शन होते. त्यांच्या “आनंदी आनंद गडे’, “औदुंबर’, “फुलराणी’, “श्रावणमासी’ या कविता विशेष लोकप्रिय आहेत. मात्र ते अल्पायुषी ठरले. 5 मे 1918 रोजी त्यांचे अपघातात निधन झाले.