Akot Nagar Panchayat | भाजपने सत्तेसाठी आपली तत्व बाजूला ठेवून एक मोठा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळत आहे. अकोटच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपने एक अनोखा राजकीय प्रयोग केला आहे. एमआयएमसह इतर सर्व प्रमुख पक्षांना सोबत घेत अकोट विकास मंच स्थापन केला आहे. अकोटमध्ये सत्तेसाठी चक्क एमआयएमसोबत आघाडी केल्याने राज्यभरात जोरदार चर्चा सुरु झाली. याआधी अंबरनाथमध्येही भाजपने स्थानिक समीकरणे जुळवत काँग्रेससोबत अशाच प्रकारची हातमिळवणी केली आहे. भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करु शकते, या विरोधकांच्या टिकेचा प्रत्यय अकोला जिल्ह्यात आला आहे. अकोट विकास मंच आघाडी अकोट नगरपालिकेत ३५ पैकी ३३ जागांवर निवडणुका पार पडल्या. यात भाजपला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या असून, भाजपच्या माया धुळे यांनी नगराध्यक्षपदही पटकावले आहे. मात्र, सभागृहात स्पष्ट बहुमत मिळाले नाही. त्यानंतर आता भाजपने सर्वसमावेशक अकोट विकास मंच आघाडी तयार केली आहे. यात भाजपसोबत एमआयएमच्या ५, प्रहारच्या ३, ठाकरे गटाच्या २ शिंदे गटाच्या १, अजित पवार गटाच्या २ शरद पवार गटाच्या २ सदस्यांचा समावेश आहे. तर काँग्रेसचे ६ आणि वंचित बहुजन आघाडीचे २ सदस्य आता विरोधी बाकावर बसणार आहेत. या सर्व पक्षांना एकत्र आणल्यामुळे सत्ताधारी गटाची सदस्य संख्या आता २५ वर पोहोचली आहे. या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, भाजपचे आमदार रवी ठाकूर यांची या आघाडीचे गटनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. या आघाडीतील सर्वच पक्षाच्या नगरसेवकांना आता भाजपचा ‘व्हिप’ पाळावा लागणार आहे. 13 जानेवारीला होत असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्विकृत सदस्यांच्या निवडीत ही आघाडी एकत्रितपणे मतदान करणार आहे. या आघाडीचे आता सध्याच्या 33 सदस्य संख्येत 25 सदस्य झाले आहेत. तर नगराध्यक्षा माया धुळे या 26 व्या सदस्य आहेत. दरम्यान, अकोट नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवार फिरोजाबी सिकंदर राणा यांना भाजपच्या माया घुळे यांनी 5271 मतांनी पराभूत केले होते. अकोट नगरपालिकेत भाजपनंतर एमआयएमचे सर्वाधिक 5 नगरसेवक विजयी झाले. मात्र सध्या अकोटमध्ये सर्वच वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकाच छताखाली आल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. हेही वाचा: काँग्रेस नेत्यावर मशिदीबाहेर धारदार शस्त्रांनी वार; उपचारादरम्यान मृत्यू, हल्लेखोर ताब्यात