Politics News : देशात मोठी राजकीय घडामोड; 17 खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार, तयारीही पूर्ण ?
Politics News : TMC मधून NCPIमध्ये गेलेल्या 20 बंडखोर खासदारांपैकी 17 जण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी केला आहे.

Politics News : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसमधून बंड करून नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI)मध्ये गेलेल्या 20 खासदारांच्या गटातही फूट पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या गटातील 17 खासदार ऑक्टोबरमध्ये दुर्गापूजेच्या आधी किंवा नंतर भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र बर्मा बसुनिया यांनी केला आहे.
बसुनिया यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना हा दावा केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 17 खासदारांनी एकत्रितपणे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असून त्याची तयारीही पूर्ण झाली आहे.
17 खासदार एकत्र भाजपमध्ये जाणार –
बसुनिया म्हणाले की, 20 पैकी 17 खासदार एकाच वेळी भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन तृतीयांशपेक्षा जास्त खासदार एकत्र पक्ष बदलत असल्याने त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रतेची कारवाई होणार नाही.
यापूर्वी 14 जून रोजी तृणमूल काँग्रेसच्या 20 असंतुष्ट खासदारांनी NCPIमध्ये विलीन झाल्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. पक्षांतरबंदी कायद्यातून वाचण्यासाठी 20 पैकी किमान 14 खासदारांचे एकत्र पक्षांतर आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
तीन खासदार भाजपमध्ये जाणार नाहीत –
दरम्यान, या 20 खासदारांपैकी तीन मुस्लिम खासदार भाजपमध्ये औपचारिक प्रवेश करणार नसल्याचे बसुनिया यांनी सांगितले. त्यांच्या मतदारसंघातील राजकीय आणि प्रशासकीय परिस्थिती भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी अनुकूल नसल्याचे त्यांनी म्हटले.
खासदार अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण हे भाजपमध्ये प्रवेश न करता बाहेरून NDAला पाठिंबा देतील, असा दावा बसुनिया यांनी केला. त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या किंवा विभाग दिले जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले.
बसुनियांच्या घराजवळ आंदोलन –
बसुनिया यांच्या या दाव्याच्या काही दिवस आधी कूचबिहारमधील सिताई येथे त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी व तृणमूलच्या आमदार संगीता रॉय यांच्या घराबाहेर आंदोलन झाले होते. बसुनिया यांनी तृणमूलपासून संबंध तोडून NDAला पाठिंबा दिल्याच्या भूमिकेवरून त्यांच्यावर टीका करण्यात आली.
या आंदोलनादरम्यान त्यांच्या घराजवळील तृणमूलच्या एका कार्यालयाला कथितरीत्या आग लावण्यात आल्याचेही समोर आले होते. मात्र, बसुनिया यांनी आपण आता तृणमूलसोबत नसून NDAसोबत असल्याची भूमिका कायम ठेवली आहे.





