काही इवलेसे पक्षी उगाचच अशुभाचा शिक्का माथी वागवत राहतात. टिटवी ही त्यातलीच एक… रात्रीच्या नीरव शांततेचे गूढ वाढवून उरात भयाण अशी धडकी भरविण्याचं सामर्थ्य असणारा “टिट्-टिट्-ट्युटिट्’ असा कर्कश्श नी टाहो फोडणारा आवाज निसर्गाने टिटवी या इवल्याशा पक्षाला बहाल केला आहे.
टिटवी सर्वांच्याच परिचयाचा असलेला नकोसा पक्षी. सुमारे 33 सें.मी. आकाराचा, लाल चोच, काळ्या रंगाचे डोळे, गळा अन् छाती, त्याखाली पोटाकडे पांढरा रंग तर पाठीकडून पंखापर्यंतचा भाग तपकिरी रंगाचा, पिवळ्या रंगाचे लांबट पाय आणि दोन्ही डोळ्याजवळ असणारे लाल रंगाचे कल्ले अशी ओळख असणारा, माणसाने “अशुभ’ म्हणून बदनाम केलेला एक पक्षी. टिटवीला हिंदीमध्ये टीटाई, टीटी, संस्कृतमध्ये कोथाष्टिक तर इंग्रजीमध्ये लॅपविंग म्हणतात. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही. झाडाची फांदी धरून ठेवता येत नाही. ती जमिनीवरून तुरूतुरू चालते. पक्षीविज्ञानानुसार हिमालयाच्या 1800 मीटर उंचीपर्यंत संपूर्ण भारतभर आढळणारा सर्वसामान्य पक्षी असून भारताशिवाय तो बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, इराण, इराक वगैरे देशांमध्येही आढळतो.
माळरानांच्या-पाणवठ्याच्या परिसरात, लागवडीखालच्या शेतात, कुरणात, तलाव, नद्या, ओढे यांच्या आसपास टिटवी हमखास आढळते. लहान-मोठे कीटक, शंख-शिंपल्यातील जीव हे या पक्ष्याचे प्रमुख खाद्य. हे पक्षी स्थानिक असून एकाच जागी कायम राहतात. त्यांना त्यांची हद्द अतिशय प्रिय असते आणि त्यासाठी ते इतर टिटव्या आणि मोठ्या पक्ष्यांनाही सहज हुसकावून लावतात. या पक्ष्याचा विणीचा काळ साधारणपणे मार्च ते ऑगस्ट असा असतो. नदीकाठच्या किंवा रानातल्या ओसाड जमिनीवर, निर्जन डोंगरमाथ्यावर आपल्या पावलांनी खोल खड्डा खणून टिटवी या खड्ड्यात अंडी घालते.
अंड्यांजवळचा भाग सहसा खोलगट असतो आणि तेथे गारगोटी सारखे दगड असतात. त्यामुळे अंडी आणि दगडातील फरक चटकन ओळखता येत नाही. या पक्ष्याचे आपल्या पिलांवरील अतोनात प्रेमच मानवी समजुतीत त्याच्या बदनामीचे कारण ठरले आहे. या पक्ष्याचे जोडपं आपल्या अंड्यांवर, त्यातून डोकावणाऱ्या लालचुटूक पिल्लांवर अगदी बारकाईनं लक्ष ठेवून असते. गळून पडणारे झाडाचे पानदेखील यांना अस्वस्थ करते. अन् तिथूनच सुरू होतो या जीवाचा कर्णभेदी आकांत… हाच आक्रोश, हाच टाहो, हाच जीवाचा आकांत माणसाच्या अंधश्रद्धांमुळे नाहक बदनाम होत गेला आहे. पिलांच्या रक्षणासाठीची आर्तता, करुणा मात्र माणूस आजतागायत नजरेआड करीत आला आहे.
अतिशय सावध अशी ही पक्षी प्रजाती! सदैव जागरुकता आणि अखंड सावधानता यामुळेच घरट्याजवळ धोकादायक जनावर किंवा मानवाचा वावर, त्यांची चाहुल लागताच टिटवी आकाश-पाताळ एक करते. जीवाच्या आकांताने आक्रोश करून आसमंत डोक्यावर घेते. नर-मादी मोठ्याने आवाज करून घरट्याच्या विरुद्ध दिशेने उडून लक्ष दुसरीकडे वेधून घेतात. प्रसंगी उरावर आकाश कोसळल्याचा अभिनय साकारत ती एक पाय दुमडून जमिनीवर मृतवत पडते. तेव्हा तिच्या घरट्याभोवती, पिलांभोवती फिरणारा शत्रू या टिटवीच्या दिशेने यायला लागतो. त्याला भुलवत-भुलवत ती घरट्यापासून दूर नेऊन त्याची दिशाभूल करते आणि पिलांचं-अंड्यांचं रक्षण करते.
टी-टीव-टी-टीव-टी असा तिचा कंठशोष आजूबाजूच्या पशु-पक्ष्यांना सावध करतो. टिटवीच्या आवाजावरून अनेक पक्षी आपली सुरक्षा करून घेतात. धोकादायक जनावर किंवा मानवाचा वावर याची सूचना देणारी “बिनतारी यंत्रणाच’ असे टिटवीला म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रात्री-अपरात्री टिट्-टिट्-ट्युटिव असा उच्चरवातील आक्रोश आपसूकच आपल्या परंपरागत समजुतीप्रमाणे काहीतरी विपरीत घडण्याची चाहुल करून देतो. टिटवी घरावरून ओरडत जाणे अशुभ, अपशकुन अशी वेडी व भाबडी अंधश्रद्धा जनमानसात आहे. टिटवीला पण हे माहिती नसावे की तिच्या ओरड्याने मनुष्य किती धास्तावतो, किती विचलित होतो ते! टिटवी संदर्भातील लोकसमजूत ही अतिशय जुनी असल्याचा दाखला ग्रंथराज ज्ञानेश्वरीत मिळतो. टिटवीचा संदर्भ देताना माऊली पंचतंत्रातील टिटवी आणि समुद्राच्या कथेचा संदर्भ देतात-
की टिटिभ् चांचूवरी ।
माय सुये सागरी ।
मी नेएतु त्यापरी ।
प्रण्ते येथ ।।388।। अ.1
समुद्राच्या काठी सुरक्षित ठेवलेली टिटवीची अंडी एक समुद्राची लाट गिळंकृत करते. ती समुद्राची विनवणी करते. परंतु या शुद्र जीवाला अहंकारी समुद्र उद्धटपणे नकार देतो. टिटवीही अंडी परत मिळविण्याचा निर्धार करते. सागराला रिता करण्याच्या ध्यासाने आपल्या इवल्याशा चोचीने पाणी जरा दूर नेऊन टाकू लागते. “माझ्या अंड्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत मी तुला रिकामा करण्याचं काम चालूच ठेवणार’, असे मोठ्या निश्चयाने सागराला सांगते. तिचे हे प्रयत्न पाहून सर्व पशु-पक्षी, माणसे, देवादिक तिच्या मदतीला धावतात. “सागर हटाव’ मोहीम चालू होते. अखेर सागर नमतो आणि तिची अंडी तिला परत देतो. शेवट गोड होतो. माऊलीही तिच्यापासून जीवन रहस्य शिकले असे स्वतः म्हणतात. जसे सर्व संत आणि भगवंताच्या कृपेने तिचे अशक्य उद्दिष्ट गाठण्यात टिटवी यशस्वी झाली तसेच सद्कृपेने मी ही गीतार्थ सांगण्याचे अशक्यप्राय काम सहज पार पाडीन, असा आत्मविश्वास टिटवीच्या कथेच्या रूपकाद्वारे माऊलींच्या लेखणीतून प्रकटतो. लोकसमजुतीचा त्रास करून घेण्याऐवजी तिच्यातून स्फूर्तिदायक तेवढंच घ्यावं, असं माऊली सांगतात.
माऊलीच्या पाठोपाठ नाथांच्या भारुडांमध्येही टिटवी दर्शन देऊन जाते. संत एकनाथ महाराजांनाही “टिटवी’वर भारूड लिहिण्याचा मोह आवरला नाही.
एका ग्रामावरी जाऊन ।
एक नदीतीर पाहून ।
तेथे टिटवी करी शयन ।
दोन्ही पायात खडा धरून गा ।।
टिटवी यमाची तराळीण ।
टिटाव टिटाव टिटाव ।।
तीड तीड तीड ।
जाण गा ।।
हे भारूड पशु-पक्षीविषयक भारूडांमध्ये वर्गीकृत होते. या लोकसमजुतीचा आधार नाथांसारख्या सत्पुरुषांनी आध्यात्मबोधासाठी अतिशय समर्पकपणे वापरला आहे. टिटवीचे तत्कालीन अस्तित्व सांगताना ते तिला “यमाची तराळीण’ असे संबोधतात. त्या काळातील समाजरचनेनुसार “तराळ’ हा रात्रीच्या समयाला गस्त घालणारा- प्रसंगी सावध करणारा- एक बलुतेदार. त्याचेच कार्य टिटवी ही तराळीण करते असा तो संदर्भ आहे.
गावातल्या एकेका घरावरून जसजशी ही टिटवी ओरडत जाते तसतसे टिटवीचे नाव घेत नाथ महाराज इशारा देतात, अखेरीस सर्व जण देह त्याग करून यमघटास जाणार आहेत. तेव्हा टिटवीचा इशारा वेळीच ओळखा अन् अंत्यसमयाला उपयुक्त अशी भगवंताच्या नामाची शिदोरी आतापासूनच पाठीशी बांधायला सुरुवात करा. असा मार्मिक संदेश नाथ महाराज टिटवीच्या रूपकातून देतात.
मानवी जगतात घृणास्पद ठरलेली ही टिटवी भगवान दत्तात्रेयांच्या 24 गुरूंपैकी 18 वी गुरू म्हणूनही अध्यात्मात उच्चस्थानी प्रविष्ट झाली आहे. त्याचा संदर्भ असा- एक टिटवी मांसाचा सापडलेला तुकडा घेऊन घरट्याकडे परतत असते. तोच तिचे आप्त त्या तुकड्यासाठी एकी विसरून तिच्यावर तुटून पडतात. अखेरीस ती त्या नाशवंत तुकड्याचा त्याग करून, दूरच्या एका फांदीवर बसून आत्मशांती अनुभवते. या प्रसंगातून तिला झालेली त्यागाची प्रेरणा आणि यातून शहाणपणाचा आत्मबोध होत अपरिग्रहाचा केलेला निश्चय तिला साक्षात परमगुरू दत्तात्रेयांच्या गुरूस्थानी बसवून गेला. साधकानेही टिटवीपासून अपरिग्रहाचा (संचय न करण्याचा) आदर्श घ्यावा असा भगवान दत्तात्रेयांचा बोध आहे.
याचीच प्रचिती आल्याने बा. सी. मर्ढेकरही टिटवीला शब्दबद्ध करीत म्हणतात-
सुरात भरली टिटवीच्या कोणी
मृत्युंजयता भोळी भगवी
चला तर मग, अखंड सावध, सदैव जागरूक, कुटुंबवत्सल अशी टिटवी शोधण्याचा आपणही प्रयत्न करूयात!
– शैलजा गोडांबे