इंदापूर -आम्ही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही. खऱ्या अर्थाने महापुरुषांचे विचाराने आम्ही पुढे चाललो आहोत, आणि हे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, महापुरुषांनी भीक मागून शाळा काढल्या सांगतात. तुम्हाला कोणी सांगितले त्यांनी भीक मागून शाळा काढल्या? या सरकारला जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिला आहे.
इंदापूर येथे आयोजित केलेल्या शरद कृषी महोत्सवाची सांगता अजित पवार यांच्या उपस्थितीत (दि. 10) करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, आमदार अमोल मेटकरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अद्यावत माहिती मिळते आहे. कोणत्या वानाचा ऊस लावायचा, इतर पिकांतून शेतकऱ्याला कसे पैसे मिळतील हे देखील कृषी प्रदर्शनात माहिती मिळते. इंदापूर तालुक्यात कर्तुत्ववान सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांच्यासारखे आहेत म्हणूनच सोनाईच्या ओसाड माळरानावर दुधाचा प्लांट उभारून नंदनवन फुलवले आहे.
माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अडीच वर्षांत इंदापूर तालुक्यासाठी अधिकचा निधी आणला; मात्र आताचे जे सरकार आहे; परंतु आता जे सरकार आहे त्यांच्या नाकर्तेपणामुळे, राज्यातील महत्त्वाचे प्रकल्प राज्य सोडून का दुसरीकडे चालले, हे प्रकल्प इतरत्र जाण्यासाठी कोण जबाबदार आहे?
माझ्या लाखो तरुण-तरुणींचा रोजगार हिरावून घेण्याचा, अधिकार या राज्य सरकारला कोणी दिला.या सरकारमधील मंत्री वाचाळ वीरासारखे बोलतात महापुरुषांबद्दल अपमानस्पद वक्तव्य करतात.तुमचं आमचं दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, इतिहासाची तोडफोड करायला यांना कोणी अधिकार दिला.
लहान मुलाला जरी विचारले शिवाजी राजांचा जन्म कुठे झाला.तरी ते मुल शिवनेरीला जन्म झाला असे सांगते. आणि भाजपचा आमदार शिवरायांचा जन्म कोकणात झाला असे बोलतो.अरे किती फसवाल? किती खोटे बोलाल हे कुठे फेडाल असा घाणाघात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सरकारवर केला.
निधी अडवण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही
दिलेला निधी अडवण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही संस्कार नाही; मात्र सत्तेवरील सरकार वेगळी परंपरा जपते आहे. मी पुणे जिल्ह्याचा 12 वर्षे पालकमंत्री होतो. मी कधीही कुठल्या तालुक्याला निधी देताना भेदभाव केलेला नाही. आमदार भरणे यांना विचारा आमदार राहुल कुल देखील विचारा, अजित पवार पालकमंत्री असताना दौंड तालुक्याला कधी निधी देण्यात कमतरता केली का? आपण जरी वेगवेगळ्या पक्षाचे असलो तरी, जनता आपली आहे याचे भान ठेवले पाहिजे, असा सल्ला राज्य सरकारला अजित पवार यांनी दिला.