प्रभात वृत्तसेवा पुणे – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्प येथील आठ वाघांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण केले. यात तीन नर आणि पाच मादी आहेत. महाराष्ट्र वन विभागाने ऑपरेशन तारा या राज्यातील दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन उपक्रमांतर्गत हे स्थानांतरण केले आहे. हा कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. सुमारे तीन वर्षांची ही वाघीण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) च्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांनुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरीत्या पकडून, योग्य पशुवैद्यकीय उपचार देऊन तिला स्थलांतरित करण्यात आले.सध्या तिला सोनारळी येथील एनक्लोजरमध्ये ‘सॉफ्ट रिलीज’ पद्धतीने सोडले असून, पुढील टप्प्यांत ती या हवामानाशी मिळतेजुळते घेते का, याचे निरीक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान वाघिणीची प्रकृती चांगली राखण्यासाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर येथील वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. खोब्रागडे यांनी नेतृत्व केले.हे यशस्वी स्थानांतरण महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. ताडोबा आणि सह्याद्री येथील पथकांनी केलेल्या जबाबदार कार्यामुळे हा प्रयत्न यशस्वी झाला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सक्षम व्याघ्र अधिवास निर्माण करण्यासाठी वन विभाग सातत्यपूर्ण निरीक्षण, अधिवास सुधारणा आणि वैज्ञानिक पद्धतीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. “या वाघिणीच्या सॉफ्ट रीलिजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. आमच्या पथकाने ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत जबाबदारीने पार पाडली. वन्यजीव संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्यपूर्ण निरीक्षण करून सह्याद्रीला पुन्हा सक्षम व्याघ्र अधिवास बनवू.” – तुषार चव्हाण, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प “सह्याद्रीतील व्याघ्र पुनर्स्थापनेसाठी हे स्थानांतरण हा एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहे. ताडोबा आणि सह्याद्रीच्या पथकांचे समन्वित, वैज्ञानिक आणि व्यावसायिक कार्य अभिनंदनास पात्र आहे.” – एम. एस. रेड्डी, प्रमुख मुख्य संरक्षक, महाराष्ट्र