प्रभात वृत्तसेवा वाल्हे – पिंगोरी (ता. पुरंदर) येथील एका शेतकऱ्यांला शुक्रवारी रात्री जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले. शेतामध्ये पिकांला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यांच्या समोर चक्क बिबट्या हजर झाला. शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले. समोर मृत्यू आहे असं वाटत असतानाच त्या शेतकऱ्याने हळूच शेतातून काढता पाय घेतला. बॅटरीच्या प्रकाशात बिबट्याने हल्ला केला नाही. मात्र, रात्रीच्या वेळी जीवावर बेतलेल्या एकट्या शेतकऱ्यांची माहिती ऐकून गावकऱ्यांच्या अंगावर शहारे आले. पिंगोरी हे गाव डोंगर परिसरात वसलेले आहे. अनेक वर्षांपासून बिबट्याचे वास्तव्य आहे. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता शेतकरी प्रवीण शिंदे मठाच्या विहिरीवर शेताला पाणी देण्यासाठी गेलो होतो. शिंदे पिकांना पाणी देत असतानाच बांधवरून अंधारात काहीतरी चाललेले शिंदे यांना जाणवले. त्यांनी बॅटरीच्या प्रकाश चाललेल्या प्राण्यांकडे केला असता तो बिबट्या चालत आल्याचे दिसले. तो काही वेळ जागेवरच थांबला व पुढे निघून गेला. दरम्यान, शिंदे यांच्यासमोर साक्षात ‘मृत्यू’ उभा असलेला मला जाणवल्याचे प्रवीण शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबतची माहिती मोबाइलद्वारे पोलीस पाटील राहुल शिंदे यांना दिली. पोलीस पाटील यांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला होता. “शुक्रवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मी मठाच्या विहिरीवर शेताला पाणी देण्यासाठी गेलो होतो. जमीन भिजवत असतानाच बांधवरून बिबट्या चालत आल्याचे दिसले. मी बॅटरीचा उजेड त्याच्याकडे पाडला. त्यानंतर तो काही काळ जागेवरच थांबला. त्यानंतर पुढे निघून गेला. माझ्यापुढे मृत्यू उभा असताना मी पोलीस पाटलांना फोन केला. वयाबाबतची माहिती दिली. त्यांनी मला तातडीने तिथून निघून जाण्यास सांगितले.” – प्रवीण शिंदे, शेतकरी, पिंगोरी सध्या रब्बीचा हंगाम सुरु आहे. पाऊसही थांबला आहे. शेतकऱ्यांना पिकांला पाणी द्यावं लागते. त्यात महावितरण कंपनीकडून चार दिवस रात्रीची वीज दिली जाते. पिंगोरी गाव डोंगर दऱ्यातील गाव आहे. त्यामुळे अनेक जंगली प्राणी या ठिकाणी आहेत. बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशावेळी शासनाने शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा. “महावितरणच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती दिली आहे. मात्र अद्याप तरी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत नाही. अशावेळी शेतकऱ्यांनी एकट्याने रात्रीच्या वेळेस शेतात जाऊ नये. गेलेच तर शेतात गेल्यावर फटाके वाजवावेत. त्यामुळे जंगली प्राणी निघून जातील.” – राहुल शिंदे, पोलीस पाटील, पिंगोरी.