Bihar Politics : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या दणदणीत यशानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपने कठोर पावलं उचलली आहेत. पक्षाने माजी केंद्रीय मंत्री आर.के. सिंह यांच्यासह आमदार अशोक अग्रवाल आणि उषा अग्रवाल या तिघांना ६ वर्षांसाठी निलंबित केलं आहे. पक्षविरोधी भूमिका आणि शिस्तभंगाच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. आर.के. सिंह नुकतेच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. एका भाषणात त्यांनी जनता दलचे नेते नितीश कुमार यांच्यावर ६२ हजार कोटींच्या घोटाळ्याचा थेट आरोप केला होता. इतकंच नव्हे, तर बिहार भाजप नेते सम्राट चौधरी यांना ‘खुनी’ असं संबोधून त्यांनी पक्ष आणि मित्रपक्षाची प्रतिमा मलीन केली. याच कारणास्तव भाजपने तातडीने निलंबनाची कारवाई केली. आर.के. सिंह २०१३ मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने इतिहास घडवला आहे. पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला, तर मागील निवडणुकीत जेडीयूने भाजपला मागे टाकलं होतं. यावेळी नितीश कुमारांना ‘मोठा भाऊ’ म्हणून हिणवलं जायचं, पण आता समीकरण पूर्णपणे उलटं झालंय. भाजप आणि जेडीयूला प्रत्येकी १०१ जागांचं वाटप होतं, पण भाजपने ८९ जागा जिंकत जेडीयूच्या ८५ जागांना मागे टाकलं. विजयाच्या उत्साहातच भाजपने अंतर्गत शुद्धीकरणाला सुरुवात केली आहे. ही कारवाई पक्षाच्या एकजूट आणि शिस्तीचं प्रतीक मानली जातेय.