परवेश वर्मा यांच्यावरही निवडणूक आयोगाची कारवाई
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर आणि खासदार परवेश वर्मा या भाजप नेत्यांना दिल्लीत प्रचारावेळी वादग्रस्त बोलणे भोवले आहे. निवडणूक आयोगाने ठाकूर यांच्यावर तीन दिवसांची तर वर्मा यांच्यावर चार दिवसांची प्रचारबंदी घातली आहे.
दिल्लीत सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या निवडणुकीच्या प्रचाराची पातळी घसल्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे. ठाकूर यांनी भाजपच्या एका प्रचारसभेत वादग्रस्त घोषणा दिली. त्या सभेत त्यांनी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात निदर्शने करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवली.
त्यानंतर त्यांनी देश के गद्दारों को…अशी अपूर्ण घोषणा दिली. सभेला उपस्थित असणाऱ्यांनी गोली मारो…को अशा शब्दांत ती पूर्ण केली. तर वर्मा यांनी एका मुलाखतीवेळी आक्षेपार्ह वक्तव्ये केली. त्यात त्यांनी दिल्लीतील शाहीन बाग परिसरात सुरू असलेल्या काविरोधी निदर्शनांचा संदर्भ दिला.
निदर्शक घरांमध्ये घुसून महिलांवर अत्याचार करतील आणि त्यांची हत्या करतील, असा इशारा वर्मा यांनी दिल्लीकरांना दिला. त्या घडामोडींनंतर निवडणूक आयोगाने ठाकूर आणि वर्मा यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या. त्यावर दोन्ही नेत्यांनी दिलेल्या उत्तरांमुळे समाधान न झाल्याने आयोगाने कारवाईचा बडगा उगारला. याआधी दिल्लीतील भाजपचे उमेदवार कपिल मिश्रा यांच्यावर वादग्रस्त ट्विटबद्दल दोन दिवसांची प्रचारबंदी घालण्यात आली होती.