इस्लामपूर – उरूणवाडी येथील मासे विक्रेता अक्षय उर्फ तुकाराम अशोक भोसले याच्या खून प्रकरणातील मुख्य संशयितासह तिघांना पोलिसांनी अटक केली.
अर्जुन प्रल्हाद बाबर ( वय ४२ ) गोरख भिमराव बाबर ( वय-३८ वर्षे दोघे रा. तुजारपूर )व सूरज संपत गायकवाड (२२ वर्षे रा-गायकवाडगल्ली, करंजवडे ता-वाळवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
भावाच्या खुनाचा बदला म्हणून अक्षयचा निर्घृणपणे खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या खून प्रकरणी मृत अक्षयचा मित्र मदन संभाजी कदम ( वय ३५ रा. कि.म गड ता. वाळवा) याला शुक्रवारी पोलिसांनी अटक केली होती. तर उर्वरित तिघांना रविवारी अटक करण्यात आली.
गुरुवारी रात्री साडे आठ वाजता उरूणवाडी रस्त्यावर अक्षय भोसलेचा चाकू व धारधार कोयत्याने पाठलाग करत २९ वार करून निर्घृनपणे खून केला होता. आर्थिक देव-घेवीतून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. पण या प्रकरणी अक्षयचा मित्र मदन कदम याला अटक केल्यानंतर खुनाचे नेमके कारण पुढे आले.
दोन-तीन दिवस पोलिसांनी फरारी आरोपींना अटक करण्यासाठी स्वतंत्र पथके पाठवली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला संशयित तिघे आज मोटारसायकलवरुन सांगली रोडने इस्लामपुर कडे येत असल्याची माहीती मिळाली होती. त्यानुसार हे पथक गाताडवाडी फाटा येथे दबा धरुन बसले होते. तिन्ही आरोपी ( एम एच ११ एसी ९१०४ ) वरुन येत असल्याचे दिसल्याने त्यांना पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
मदन संभाजी कदम व त्याचे साथीदारांनी मच्छीचे उधारीचे पैसे मागीतल्याचे कारणावरुन व फुकट कोळंबी दिली नाही या कारणावरुन खुन केल्याबाबत मृत अक्षय याचा भाऊ विक्रम अशोक भोसले यांनी तक्रार दिल्याने इस्लामपुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्हयामध्ये आरोपी मदन कदम यास अटक करुन न्यायालयाने पोलीस कोठडी दिल्यानंतर विश्वासात घेवुन त्याचेकडे सखोलपणे चौकशी केली असता सदर गुन्हयामध्ये अर्जुन प्रल्हाद बाबर, गोरख भिमराव बाबर व सुरज संपत गायकवाड यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहा पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भरते, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक ठोंबरे, पोलीस नाईक शरद जाधव, अमोल चव्हाण, अरुण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल उमाजी राजगे, आलमगीर लतीफ, योगेश जाधव, गणेश शेळके, सुरज जगदाळे, कौस्तुभ पाटील, सचिन सुतार यांनी केली.