रेडा – उजनी जलाशय परिसरातील भीमा नदी पात्रालगत असणाऱ्या डझनभर गावांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध आहे. तरी देखील हजारो नागरिकांचे आरोग्य मांगूर माशांच्या तलावातील दुर्गंधी, त्यांच्या मांसाहारी खाद्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. मांगूर मासा हा मांसाहारी असल्यामुळे मेलेली जनावरे कत्तलखान्यातील वेस्टेज मोठ्या प्रमाणात भीमा नदी परिसरातील गावांमध्ये दाखल होत आहे. यातून बाहेर पडणारा उग्रवास, घाणीची दलदल यामुळे गावात राहायला नको रे बाबा अशी स्थिती नागरिकांची झालेली आहे. शासनाकडे यासंदर्भात विनंती अर्ज, तक्रारी करून देखील दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे मांगूर माशांचे तलाव लोकांचे आरोग्य बिघडवणारी ठरत आहेत.
मांगूर मासा धष्ठपुष्ठ करण्यासाठी बेकायदेशीर पालन करणारे माफिया, रोजचे – रोज या माशांना खाद्य पुरवण्यासाठी तालुक्यातील मांसाहारी हॉटेलमधील शिल्लक घाण, मेलेली जनावरे व कत्तलखान्यातील वेस्टेज टेम्पो भरून मांगूर तलावकडे रात्री अपरात्री आणले जातात.
कत्तलखान्यातील वेस्टेज एकदम मांगूर तलावाकडे आणले जाते.एकतर कत्तलखाना बंदी असल्यामुळे हे वेस्टेज चोरून आणले जाते. त्यामुळे जास्त प्रमाणात कत्तलखान्यातील वेस्टेज साठा करून ठेवला जातो. याचा उग्र वास परिसरातील नागरिकांना नकोसा करून सोडतो, त्यामुळे साथीचे आजार भीमा नदीपात्रालगतच्या नागरिकांना सातत्याने सोडत नाहीत, अनेक लहान बालके, वृद्ध नागरिकांना या घाणीचा मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कत्तलखान्यातील वेस्टेज खाद्य म्हणून मांगूर माशाला घातल्यामुळे मोठ्या वजनाचे मासे निर्माण होतात.
परिसरामध्ये कोणाचीही गाय बैल म्हैस व इतर पाळीव प्राणी मेले तर, हे प्राणी या मांगूर माशांच्या तलावाकडे ओढत आणत माशांना खाद्य म्हणून पुरवले जातात. बेकायदेशीर मांगूर पालक आहेत ते माफिया माशांची पूर्ण वाढ झाल्यावर या शेततळ्यातील पाणी शेजारी सोडून देतात. त्यामुळे शेजारी असणाऱ्या शेतजमीन नापीक झाल्या आहेत. उग्र वासाचा परिसर निर्माण झाला आहे. एवढेच नव्हे तर हाकेच्या अंतरावर उजनी जलाशयाचा पानथळ पट्टा असल्यामुळे, हे मांगूर मासे थेट उजनी जलाशयात घुसले जातात.त्यामुळे आगामी काळात हे धरण मांगूर माशांचे म्हणून प्रसिद्ध होईल अशी भीती निर्माण झाली आहे.
या भागातील भादलवाडी, भिगवण, पळसदेव, आगोती, कळाशी, कालठण नं 1, पडस्थळ या गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सार्वजनिक विहिरी याच भीमा नदीपात्रालगत आहेत. याच परिसरात विषारी मांगूर माशांचे तलाव जास्त असल्याने या तलावांचे पाणी सातत्याने बदल करावे लागत असते. त्यामुळे हे विषारी माशांचे पाणी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतकडे जात आहेत. त्यामुळे लोकांना स्वच्छ पाण्याच्या पिण्याचा पुरवठा होत नाही. दूषित पाणी पिल्यामुळे अनेक पोटाच्या आजाराने पडस्थळ, कळाशी, आगोती या भागातील लोक त्रस्त आहेत.
मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला
मांगूर माशांचे खाद्य म्हणून आणली जाणारी कत्तलखान्यातील घाण, वेस्टेज तसेच मेलेली जनावरे या तलावामध्ये सोडली जातात. यामुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. येथे मोठ्या प्रमाणात कुत्र्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे, शाळकरी मुले तसेच शेळ्या-मेंढ्यांना मुठीत जीव घेऊन आपले जीवन जगावे लागते आहे. या भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असल्यामुळे एकट्या माणसाला या भागात फिरणे देखील मुश्कील झाले आहे.
कुंपणाने शेत खाल्ले तर करायच काय?
जे तालुकास्तरावर व गावातील गावनेते म्हणून मिरवतात, त्यांनीच मत्स्य विभागाला हाताशी धरून विषारी मांगूर माशांचे पालन सुरू ठेवले आहे. कोणी कितीही तक्रारी केल्या तरी देखील मत्स्य विभागाचे काही अधिकारी तक्रारी दाखल होताच, थेट मांगूर माफियांना कळवतात, त्यामुळे कुंपणाने शेत खाल्ले तर तक्रार करायची कुणाकडे असा सवाल भीमा नदी परिसरातील नागरिक करीत आहेत.