नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू समोर येत आहे. सुरूवातीला तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने आघाडी घेतली होती. मात्र, नंतरच्या फेऱ्यांमध्ये हे चित्र बदलत गेले. सध्या एनडीएने मुसंडी मारली आहे. तर महाआघाडीची घसरण होताना दिसत आहे. एनडीए सत्तेत येण्याचे कल समोर येत असतानाच भाजपाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे.
@RahulGandhi यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले. @yadavakhilesh सोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली तेव्हा सपा पराभूत. डाव्यासोबत पश्चिम बंगाल मध्ये गेले डावे सपाटून @MamataOfficial समोर हारले. आणि आता @yadavtejashwi सोबत @INCIndia गेले आणि तिथेही आता पराभव
— Keshav Upadhye (@keshavupadhye) November 10, 2020
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सुरूवातीच्या कलांमध्ये महाआघाडीला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत होते. मात्र, मतमोजणीच्या फेऱ्या वाढताना महाआघाडीची घसरगुंडी उडाली. तर एनडीएने जोरदार मुसंडी मारली आहे. एनडीएने बहुमताच्या आकड्यांपेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. “राहुल गांधी यांनी ज्यांच्या सोबत हात मिळवले ते डुबले.
अखिलेश यादव यांच्यासोबत उत्तर प्रदेशात आघाडी केली. तेव्हा सपा पराभूत, डाव्यांसोबत पश्चिम बंगालमध्ये गेले, डावे सपाटून ममता बॅनर्जींसमोर हारले. आणि आता तेजस्वी सोबत काँग्रेस गेली आणि तिथेही आता पराभव,” असं म्हणत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राहुल गांधी व काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
सध्या २४३ मतदारसंघातील चित्र स्पष्ट होताना दिसत आहे. सध्या एनडीए १२७ जागांवर आघाडीवर आहे. यात भाजपा ७३, जदयू ४७, तर व्हीआयपी पक्षाचे ७ उमेदवार आघाडीवर आहेत. दुसरीकडे महाआघाडी १०० ठिकाणी आघाडीवर आहे. यात राजद ६१, काँग्रेस २०, डावे १९ जागांवर आघाडीवर आहेत.