Manoj Jarange : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा माहोल आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सर्वच पक्षांकडून केला जात आहे. स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी महायुतीमधील पक्षांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचार सभांमध्ये ‘लाडकी बहीण’ योजनाचा उल्लेख करत नागरिकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. २ डिसेंबर रोजी येऊन ठेपलेल्या २४७ नगपरिषदा आणि ४२ नगरपंचायत निवडणुकाचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील राजकारण देखील चांगलेच तापले आहे. अशातच मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी एक मोठं विधान करत थेट इशारा दिला आहे. मनोज जरांगेंचा थेट इशारा “मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त इंट्रेस घेणार नाही. मात्र, ज्यांनी आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला त्यांना सोडणार नाही त्यांना आम्ही पाडणारच” असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे मनोज जरांगे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मराठा बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 च्या उद्घाटनासाठी मनोज जरांगे हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते विमानतळावर आले असता त्यांनी माध्यमांशी बोलताना वरील वक्तव्य केले. आरक्षणाची लढाई आम्ही जिंकली आहे पण आता आमचे उद्योजक ही झाले पाहिजेत, असे ते यावेळी बोलताना म्हणाले. मनोज जरांगे यांच्या हस्ते मराठा बिजनेस कॉन्क्लेव्ह 2025 उद्धाटन केले जाणार आहे. या उद्योजक कार्यक्रमातून मी त्यांना काही संदेश देणार नाही तर मी घडलेल्या उद्योजकाकडून संदेश घेवून जाणार आहे, असल्याचे जरांगेंनी सांगितले. मनोज जरांगेंनी व्यक्त केला विश्वास मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेत मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यांनी राज्य सरकारकडे मराठा आरक्षणासंदर्भात अनेक मागण्या केल्या होत्या. या मागण्यांमध्ये हैदराबाद गॅझिटिअरची प्रमुख मागणी राज्य सरकारने मान्य केली. परंतु इतर मागण्यांसाठी सरकारने समिती गठीत केले आहे. यावर बोलताना आमच्या काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत, ज्या कमीटमेंट दिल्या होत्या त्याही पूर्ण होतील, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे मुंडे जरांगे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या होत्या. मनोज जरांगे यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनानंतर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का दिला जात असल्याचा दावा करत अनेक ओबीसी नेत्यांनी आंदोलनाची हाक दिली होती. यामुळे सरकारची कोंडी झाली होती. हेही वाचा : Pune District : थोपटेंचे निकटवर्तीय, मांडेकरेंचे विश्वासू; रामचंद्र आवारे यांच्यामुळे भोरच्या राजकारणाची दिशा बदलणार!