मुंबई : राज्यात सध्या कोकणातल्या चिपी विमानतळाबाबत सुरु असणाऱ्या श्रेयावरून राजकारण सुरु झाले आहे. यावरून शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात दावे-प्रतिदावे होऊ लागले आहेत. विमानतळासाठी शिवसेनेकडून कोकणात जोरदार पोस्टरबाजी करण्यात आली असताना दुसरीकडे नारायण राणेंनी चिपी विमानतळाचे पूर्ण श्रेय भाजपाचे असल्याचा दावा केला आहे. त्यातच आता शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नारायण राणेंनी शिवसेनेकडून आणि विशेषत: विनायक राऊत यांनी केलेल्या पोस्टरबाजीवर निशाणा साधला होता. त्यावर विनायक राऊत म्हणाले, “प्रामाणिकपणे लोकप्रतिनिधीची भूमिका बजावणाऱ्या आमच्यासारख्या सर्वांनाच आजचा दिवस आनंदाचा आहे. शिवसेनेला पोस्टरबाजी करण्याची गरज नाही. १९९९ साली विमानतळाची सुरूवात झाली. २००३ साली पहिलं आणि २००९ साली दुसरं भूमिपूजन झालं. त्यांनी भूमिपूजन करण्याचं काम अनेकदा केलं. पण खऱ्या अर्थाने विमानतळाच्या कामाला सुरुवात २०१६पासून झाली”, असं विनायक राऊत म्हणाले.
तसेच नारायण राणेंना खोचक टोला लगावत राऊत यांनी, “स्वत: काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, भ्रष्टाचाराच्या चिखलात बुडालेल्यांनी इतरांवर आरोप करण्याचं धाडसच करू नये. शिवसेनेनं गेल्या दोन वर्षांत ज्या पद्धतीने सिंधुदुर्गात काम केलंय, ते पाहाता आम्ही केव्हाही पंचनामा करायला तयार आहोत. आम्हाला घाबरण्याचं कारण नाही”, असे म्हटले आहे.
शिवसेनेने चिपी विमानतळासाठी काहीही केलं नसून त्यासाठीची परवानगी देखील आपणच आणल्याचा दावा नारायण राणेंनी केला आहे. त्यावर बोलताना विनायक राऊत म्हणाले, “राज्यसभा खासदारकीची ४ वर्ष काढली, त्यात परवानगी घेण्यासाठी काय केलं? टीका करायची की आनद घ्यायचा हे त्यांचे त्यांना कळलं पाहिजे”. दरम्यान, नारायण राणेंनी चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचा भांडाफोड करणार असल्याचा इशारा दिला आहे.