कोल्हापूर: धर्मनिरपेक्ष मतांची वंचितमुळे विभागणी होत असल्याचा आरोप करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे बघावे, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही त्यांनी टीका केली आहे. या निवडणुकीत ईव्हीएम हॅकिंग होणार नाही, असा दावा देखील त्यांनी केला आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या सत्ता संपादन यात्रेची सांगता सभा आज कोल्हापूरात होत आहे. या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वंचितमुळे धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होत असल्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी स्वतःच दामन तपासून पाहावे. बेदाग असेल तरच टीका करण्याचा अधिकार असतो, असा टोला त्यांनी लागवला आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आमची झेप मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच त्यांनी आम्ही विरोधी पक्ष असू म्हटले आहे. पण आमची झेप सत्ता संपादन करण्यापर्यंत आहे आणि हे येणाऱ्या निवडणुकीत करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.