मुंबई – करोनामुळे ठप्प झालेल्या मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे. तो धारावी पुनर्विकासाचा असेल, असे मत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना धारावीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्याबाबत पत्र लिहिल्याची माहिती आव्हाड यांनी दिली.धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, आर्थिक उलाढालीला सुरुवात होईल, व्हेंटिलेटरवर असलेल्या बांधकाम उद्योगाला जीवनदान मिळेल. मुंबईला एका बुस्टर डोसची गरज आहे. तो धारावी पुनर्विकासाचा असेल, मी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे, असे ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केले.
धारावीसारख्या सर्व जाती-धर्माच्या वस्तीच्या भागाचा विकास केल्यास तो महाविकास आघाडी सरकारसाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या हितावह ठरणार आहे. याबाबतची संपूर्ण प्रक्रिया झाली असून आपण आपल्या स्तरावर बैठक आयोजित करुन धारावी पुनर्विकास प्रकल्प लवकरात लवकर सुरु करण्याचे आदेश द्यावेत, अशी विनंती आव्हाड यांनी केली आहे.
करोनामुळे धारावीसारख्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही दर्जाच्या आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे उपचार यंत्रणा पूर्णतः कोलमडून पडलेली दिसली. लोकांच्या मनात धारावीबद्दल नकारात्मक भावना निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता धारावीच्या पुनर्विकासाएवढी सुंदर, सामाजिक, आर्थिक संधी महाविकास आघाडीला मिळणार नाही, अशा आशयाचे पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.