मुंबई – महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या राज्यभरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विविध ठिकाणी भेटी देत आहेत. अशातच फडणवीस यांनी आज कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असलेल्या ठाण्याला भेट देत येथील परिस्थितीचा आढावा घेतला. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारला काही सूचना केल्या.
चाचण्या वाढविण्याची गरज फडणवीस म्हणाले, “पनवेल, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी, मिरा भाईंदर अशा सर्वच ठिकाणी संसर्ग प्रमाण अधिक आहे. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील रुग्णसंख्येत मुंबई आणि एमएमआर -मधील ७० टक्के रुग्ण, तर मृत्यू सुद्धा याच भागात अधिक आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत चाचण्या वाढविण्याची गरज आहे. तसेच त्याचे अहवाल तात्काळ आले पाहिजेत,”
खाजगी रुग्णालयांकडून लूट थांबविणे आवश्यक यावेळी बोलताना फणवीस यांनी खाजगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची लूट होत असल्याची बाब राज्य सरकारच्या निदर्शनास आणून देताना, “मृत्यूदर वाढणे ही बाब अधिक चिंताजनक आहे. राज्यातील महापालिकांना आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात मिळायला दिली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयांकडून लूट थांबविणे आवश्यक आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्यानं आयसीसीयू बेड कमी पडत आहेत. दुसरीकडे रुग्ण व्यवस्थापनही कमी पडत आहे.” असं वक्तव्य केलं.
प्रति १० लाख लोकसंख्येमागे चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर “आरोग्य सेवकांची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून येत असून, ठाण्यातून २ ते ३ रुग्ण बेपत्ता झाले आहेत. त्यांचे नातेवाईक मला आज भेटले. देशातील संसर्गापेक्षा महाराष्ट्रातील संसर्गाचे प्रमाण फारच अधिक आहे. प्रति १० लाख लोकसंख्येमागे चाचण्यांमध्ये महाराष्ट्र देशात नवव्या क्रमांकावर आहे. कमी चाचण्या हेच महाराष्ट्रातील कोरोना वाढ होण्यामागील मुख्य कारण असून, सातत्याने सांगतो आहे. अजूनही खरी मृत्यूसंख्या पुढे आलेली नाही. मुंबईतील ४०० मृत्यू आणखी पुढे आलेले नाहीत,” असा दावाही फडणवीस यांनी केला.