मंचर :आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांच्या सीमेवर वसलेले परंतु दळणवळणापासून दूर असलेले आंबेगाव तालुक्यातील खेतेपठार हे निसर्गरम्य असले, तरी मूलभूत सुविधांच्या अभावाने ग्रासलेले दुर्गम वास्तव आहे. रस्ता नसल्याने आणि रुग्णालयात जाण्यासाठी विलंब झाल्याने आदिवासी शेतकरी कुटुंबीयातील एका दोन वर्षीय बालकाचा हृदयद्रावक मृत्यू झाला. रस्त्याच्या अभावामुळे बालपण हरवले. खेतेपठारचा हा आक्रोश सर्वांना वेदनादायी ठरला आहे. इथल्या आदिवासी बांधवांचे जीवन आजही कठीण परिस्थितीत सुरू आहे.या संघर्षाने आता एका निष्पाप बालकाचा जीव घेतल्याने संपूर्ण परिसर हळहळला. झोपलेले प्रशासन आता तरी जागे होणार का?असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. खेतेपठार येथील आदित्य विकास घनकुटे या चिमुकल्याने रविवार, दि.१५ रोजी दोन वर्षे पूर्ण करून तिसऱ्या वर्षात पदार्पण केले होते. वाढदिवसाचा आनंद घरात दरवळत असतानाच नियतीने घाला घातला. सोमवार, दि.१६ रोजी दुपारी आदित्यला त्याची आई सुनिता वरण भात खाऊ घालत होत्या. त्यावेळी त्याला ठसका लागला आणि त्याची दातखिळी बसली. आदित्यची आई सुनिता घनकुटे,आजी शारदा घनकुटे आणि त्यांचे कुटुंबीय घाबरले. आदित्यला पाठीवर घेवून पायी चालत तातडीने उपचारासाठी घोडेगाव येथे निघण्याचा प्रयत्न केला. मात्र, रस्ता नसल्याने त्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. ऐन उन्हाच्या भरात घामाच्या धारा निथळत तीन ते चार किलोमीटर डोंगर दऱ्याची आणि उताराची वाट पाय-पाय चालत कसे बसे पोहचले. रामवाडी येथून दुचाकीवर त्यांचे नातेवाईक दत्तात्रय खमसे यांना घेवून घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी बाळाला आणले. त्यावेळी बाळाची आरोग्य परिस्थिती चिंताजनक बनली होती. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे रुग्णालयात पोहचण्यासाठी जवळपास चार तासाचा विलंब झाला आणि वेळेत दवाखान्यात पोहोचता न आल्याने त्या निरागस जीवाचा मृत्यू झाला. घोडेगाव ग्रामीण रुग्णालयातून बाळाला शवविच्छेदनासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉ.साहिल टाके यांनी शवविच्छेदन केले असता प्राथमिक अंदाजानुसार बाळाच्या अन्ननलिकेतील अन्नाचे कण श्वासनलिकेत अडकून श्वास रोखला गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष निघाला आहे. मुलगा आदित्य याचे निधन झाल्यामुळे त्याचा मानसिक धक्का आई सुनिता यांना बसला असून त्यांना घोडेगाव येथील खाजगी दवाखान्यात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा : Flower Market : झेंडू, मोगरा, गुलछडी अन् शेवंती फुलली; गुढीपाडव्यामुळे आवक वाढली विकासाचा दावा खरा की खोटा ? बाळाच्या मृत्यूची घटना केवळ एक दुर्दैवी प्रसंग नसून, रस्ता प्रशासनाच्या दुर्लक्षाचा जिवंत पुरावा ठरला आहे. आपटी मार्गे सुरू असलेले कामही वनविभागाच्या अडथळ्यामुळे अपूर्णच राहिले आहे.त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना वेळेत मदत मिळणे अशक्य बनले आहे.आदित्यच्या मृत्यूने एकच प्रश्न सर्वांसमोर उभा केला आहे. विकासाच्या दाव्यांमध्ये खेतेपठार नेमके कुठे आहे?असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. खेतेपठार परिसर तीन ग्रामपंचायतींमध्ये विभागलेला असला, तरी प्रत्यक्षात येथे जाण्यासाठी आजही ठोस रस्ता नाही.काही ठिकाणी फक्त पाऊलवाटा,तर काही ठिकाणी धोकादायक कच्चे मार्ग आहेत.पावसाळ्यात ही परिस्थिती अधिकच बिकट होते.जुन्नर तालुक्यातील वैष्णवधामकडील कच्चा रस्ता पूर्णपणे उध्वस्त झाला असून,चारचाकी वाहन जाणे अशक्य झाले आहे.रस्त्याचा प्रश्न अजून ही मार्गी लागलेला नाही. –अविनाश गवारी,सचिव, जनवादी युवा संघटना, आंबेगाव तालुका. कोणत्याही मार्गाने का होईना, पण सुरक्षित आणि कायमस्वरूपी रस्ता तात्काळ तयार करण्यात यावा.आज आदित्य नाही, पण त्याच्या जाण्याने उठलेला आक्रोश प्रशासनापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कारण आणखी एकही जीव अशा दुर्लक्षाचा बळी ठरू नये, हीच खरी त्याला श्रद्धांजली ठरेल. -शांताराम घनकुटे,ग्रामस्थ, खेतेपठार. आम्ही वर्षानुवर्षे रस्त्याची वाट पाहतोय, पण अजूनही काहीच बदल झाला नाही. आज आदित्य गेला, उद्या कोणाचा नंबर लागेल सांगता येत नाही.आम्हाला फक्त सुरक्षित रस्ता हवा आहे. -तुकाराम भांगरे,ग्रामस्थ, खेतेपठार. “कोणत्या मार्गाने रस्ता होतो याचा वाद नको, पण रस्ता झाला पाहिजे.आमच्यासाठी तोच जीवदान ठरेल. आजारी माणूस वेळेत पोहोचला नाही, तर जीव वाचवणे अशक्य होते, हे वास्तव आहे. -लहू गिजरे,ग्रामस्थ, खेते पठार. खेतेपठार येथे रस्त्याचा मोठा प्रश्न आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी लागणार असून रस्ता होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. -प्रमिला वाळुंज, गटविकास अधिकारी, आंबेगाव तालुका पंचायत समिती, घोडेगाव. हेही वाचा : Pune District : गुढीसाठी साखरेच्या गाठ्या महागल्या