पेठ – लॉकडाऊनच्या काळामध्ये तंटामुक्त समितीने पेठ (ता. आंबेगाव) येथील तीस वर्षांचा जमिनीचा वाद मिटवण्यात यश मिळविले आहे. तीस वर्षे प्रलंबित असलेल्या जमिनीचा वाद आणि त्या वादामुळे तीन भावांना जमीन कसण्यास अनंत अडचणी येत होत्या. नेहमीच आपापसात हे भाऊ भांडत होते.
वर्षानुवर्षे हा वाद चिघळतच चालला होता; पण महात्मा गांधी तंटामुक्ती समितीने तीन भाऊ आणि एक बहीण अशा सर्वांना एकत्रित बसून त्यावर यशस्वीपणे तोडगा काढला आणि अठरा एकर जमिनीबाबत असलेला वाद सुटल्यामुळे या तीन कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
यामध्ये एकुलत्या एक बहिणीने कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता आपला हक्क तीन भावांसाठी सोडून दिलेला आहे. येथील बाळासाहेब भिमाजी शिंदे, पोपट शिंदे, मुरलीधर शिंदे आणि एक बहीण यांचा जमीन वाटप वाद मिटवण्यात तंटामुक्ती समितीला यश आलेले आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रवींद्र धुमाळ, मोहन काळे, तुकाराम गुंजाळ, उपसरपंच अनिल सणस, सातगाव पठार पोलीस बीट अंमलदार कैलास कड, ग्रामपंचायत सदस्य हरिश्चंद्र रागमहाले, अशोक राक्षे, ग्रामसेवक चौगुले तसेच सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी पुढाकार घेतला.
समितीने आत्तापर्यंत अनेक प्रकरणांचा वाद गावपातळीवरच मिटविला आहे. अनेक वाद गावपातळीवरच मिटवल्यामुळे पोलीस यंत्रणेचा ताण कमी होऊन गावात शांतता नांदण्यास मदत होते आहे.
रवींद्र धुमाळ,
अध्यक्ष तंटामुक्ती समिती, पेठ, (ता. आंबेगाव).