अरुण गोखले
प्रत्येक गोष्ट ही केवळ शब्दांनीच सांगता येते असे नाही. सांगायचे, शिकवण्याचे आणखीही काही मार्ग आणि माध्यमेही आहेतच. फक्त त्यांचा आपल्याला अचूक आणि तितका प्रभावीपणे वापर करता यायला हवा. उदा., बोलू नका गप्प राहा, शांतता पाळा, हे शब्दांनी सांगायच्या ऐवजी केवळ ते आपण आपल्या तोंडावर बोट ठेवून तोच संदेश इतरांपर्यंत सहजपणे पोहोचवतो. जे सांगायचं, शिकवायचं ते कृतीतूनही कसे साध्य होते किंवा साधू, संत, सत्पुरूष ते आपल्या बोलक्या कृतीतून सहजतेने कसं साध्य करतात त्याची ही गोष्ट.
एकदा गुरू नानक हे प्रवास करत हरिद्वार येथे पोहोचले. नेमकी त्या वेळी सूर्यग्रहणाची पर्वणी होती.
त्या निमित्याने नदीच्या पात्रात उभी राहून अनेक मंडळी ओंजळीत पाणी घेऊन, सूर्याला वंदन करून त्याला अर्घ्यदान देत होती. ते समोरचे दृश्य पाहिले आणि कसलासा विचार करून नानक स्वत: नदी पात्रात उतरले. त्यांनी गंगास्नान केले. आपल्या हातात पाणी घेऊन ते आपल्या दोन्ही हातांनी पश्चिम दिशेकडे उडवू लागले. इतरांपेक्षा वेगळी दिसणारी नानकांची ती कृती पाहून सभोवतालची मंडळी त्यांना हसू लागली.
नानकांचे मात्र कुणाकडेच लक्ष नव्हते. ते आपल्याच कृतीत मग्न होते. शेवटी न राहवून एक माणूस त्यांना म्हणाला, “”नानकजी! आपण हे असं काय करता आहात? अहो सूर्य तर पूर्व दिशेला आहे. आम्हाला वाटतं की तुम्हाला सूर्याला पाणी द्यायचं आहे? पण तुम्ही तर काय ही भलतीच कृती करत आहात, याचा अर्थ काय? तुम्ही पश्चिमेला का पाणी उडवता आहात?”
त्यावर नानक शांतपणे म्हणाले, “”बाबांनो, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही समजता तसा मी नाही. आंधळा पण नाही. दुुसरं म्हणजे मी काही त्या सूर्याला पाणी देत नाही. तर मी माझ्या गावातल्या शेताला पाणी देतो आहे.” “”काय गावातल्या शेताला पाणी? आणि तेही इथून? कुठे आहे तुमचं गाव? कुठ आहे तुमचं शेत?” लोकांनी विचारले.
त्यावर नानक म्हणाले, “”अरे बाबांनो, माझं गाव इथून 50-60 मैलांवर आहे. तिथे माझं मोठं शेत आहे. शेतात पीक आहे. त्याला मी पाणी देतो आहे.” एका माणसाने त्यांना थोडे स्पष्टच विचारले, “”नानकजी! अहो काय हे. तुमचं शेत, तुमचं गाव किती दूर आणि त्याला तुम्ही इथून दिलेलं पाणी कसं पोहचणार?” त्यावर नानकजी त्या सर्व लोकांना म्हणाले, “”का रे बाबांनो, तुम्ही इथून दिलेलं पाणी जर लक्षावधी मैल दूर असलेल्या सूर्याला पोहचू शकते तर मग मी दिलेलं पाणी 50-60 मैलांवरच्या माझ्या गावातील शेतीला का पोहचणार नाही? सांगा ना?”
नानकांनी आपल्या कृतीतून दिलेला खुलासा इतका योग्य होता की, आपलं नेमकं कुठे आणि काय चुकतेय, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पुढे होऊन नानकांना नमस्कार केला. कारण नानकांची ती बोलकीकृती त्यांना बरचं काही सांगून आणि शिकवून गेली होती.