Maratha Reservation – मराठी बाण्याबद्दल जे बोलत आहेत त्यांना मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना मराठा समाजाबद्दल किती सहानुभूती आहे याची समाजालाही कल्पना आहे. आम्हालाही याची सगळी माहिती आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. मात्र त्याला न्यायालयात आव्हान दिले गेले. आता ते आरक्षण टिकवण्याचे काम फडणवीस आणि आम्ही केले आहे असेही शिंदे म्हणाले.
आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते असा सवाल उपस्थित करतानाच त्या मुख्यमंत्र्यांना, उपसमितीच्या अध्यक्षांना आरक्षण टिकवता आले नाही.
त्यामुळे मराठा आरक्षणावर आता काही बोलण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे. मराठा मोर्चाला मुका मोर्चा असे संबोधून माता-भगिनींचा अवमान करणाऱ्यांनी आता याबाबत काही बोलूच नये आणि त्यांची समाजालाही सगळी माहिती असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.
शिंदे पुढे म्हणाले की आम्ही आरक्षणासाठी क्युरेटीव्ह पीटीशन दाखल करतो आहे. त्यासाठी न्या. भोसले, गायकवाड आणि शिंदे समिती स्थापन केली आहे. इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरता आमचे सरकार प्रामाणिकपणे प्रयत्नशील असून यासाठी कटीबध्द आहे. हे जे अगोदर झाले आहे त्याला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींनी मात्र आता या विषयावर काही बोलू नये असेही त्यांनी ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना बजावले.