मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जोरदार राजकीय हालचाली सुरु आहेत. अश्यातच मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नुकतंच मुंबईतील गोरेगावमधील नेस्को मैदानावर पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या सभेत बोलताना राज ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तसेच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह अनेकांवर जोरदार हल्लाबोल केला. या सभेमधून त्यांनी चौफेर टोलेबाजी करत, मनसेच्या आंदोलनावरून पक्षावर निशाणा साधणाऱ्यांना राज ठाकरेंनी चांगलेच फैलावर घेतले.
दरम्यान, राज ठाकरेंच्या सभेनंतर महाराष्ट्रातील अनेक मोठ्या नेत्यांनी यावर आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, नुकत्याच शिवसेनेत पदार्पण केलेल्या सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. काल मुंबईतील मुलुंड पूर्व येथे सायंकाळी 6 वाजता त्यांची जाहीर सभा पार पडली यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
यावेळी सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे एक असा माणूस आहे पठ्ठ्या.. उठ दुपारी अन् घे सुपारी असा त्यांचा कार्यक्रम असतो. याला थोडं बोलेन, त्याला थोडं बोलेन, काही वेळासाठी विचारवंत होईल, मध्येच मिमिक्री कलाकार होईल असा त्यांचा कार्यक्रम असतो.” अशी टीका त्यांनी केली आहे.