मुंबई – भारतीय अंतराळ संस्था (इस्रो) ची बहुप्रतिक्षित चांद्रयान-3 मोहीम 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरली. भारतीय शास्त्रज्ञांसाठी हे एक मोठे यश मानले जाते. या पार्श्वभूमीवर आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा 11 वैज्ञानिकांबद्दल माहिती देणार आहोत, ज्यांना संपूर्ण जग सलाम करते. चला, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.
1. डॉ. विक्रम साराभाई
विक्रम अंबालाल साराभाई हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी अहमदाबाद येथे झाला. भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. विक्रम साराभाई यांनी जागतिक कीर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरुवात केली.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट (IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डॉ. साराभाई यांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळादेखील (PRL) डॉ. साराभाई यांनीच सुरू केली. अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन (ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली.
पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखील त्यांनी उभारली. विक्रम साराभाई यांना 1966 साली पद्मभूषण आणि 1972 साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले.
2. सतीश धवन
सतीश धवन यांचा जन्म 25 सप्टेंबर 1920 रोजी श्रीनगर, जम्मू-काश्मीर येथे झाला. सतीश धवन हे भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे प्रणेते होते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सशी 20 वर्षे संबंधित होते. सतीश धवन यांना त्यांच्या विज्ञानातील योगदानाबद्दल पद्म पुरस्कार (1971) देखील देण्यात आला आहे.
3. डॉ. एपीजे अब्दुल कलाम
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे ‘मिसाईल मॅन’ म्हणून ओळखले जाते. कलाम यांना 1997 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला. 1962 मध्ये ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) शी संबंधित होते.
ते सुमारे चार दशके संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्थेशी संबंधित होते. 1998 मध्ये दुसऱ्यांदा भारताच्या पोखरण-II अणुचाचणीत कलाम यांची निर्णायक, संघटनात्मक, तांत्रिक आणि राजकीय भूमिका होती.
4. सीएनआर राव
चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म 30 जून 1934 रोजी कर्नाटकची सध्याची राजधानी बेंगळुरू येथे झाला. त्यांनी प्रामुख्याने संरचनात्मक रसायनशास्त्रावर काम केले आहे. ते भारतीय अंतराळ संशोधन संस्था, आयआयटी कानपूर, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, ऑक्सफर्ड विद्यापीठ, केंब्रिज विद्यापीठ, कॅलिफोर्निया विद्यापीठ इत्यादींशी संबंधित होते. त्यांना पद्म पुरस्कार आणि भारतरत्ननेही गौरविण्यात आले आहे. 45 वैज्ञानिक पुस्तके आणि 1500 शोधनिबंधांचे लेखक असलेल्या राव यांना 60 विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट प्रदान केली आहे.
5. जी. माधवन नायर
इस्रोचे माजी प्रमुख जी. माधवन नायर यांचे नाव भारतीय शास्त्रज्ञांमध्ये ठळकपणे घेतले जाते. केरळमधील तिरुअनंतपुरम येथे 31 ऑक्टोबर 1943 रोजी जन्मलेले नायर सहा वर्षे इस्रोशी संबंधित होते. त्यांच्या कार्यकाळात भारताने चांद्रयान-1 सह 25 यशस्वी मोहिमा पूर्ण केल्या आहेत. ते इंटरनॅशनल अकॅडमी ऑफ अॅस्ट्रोनॉटिक्सचे अध्यक्षही राहिले आहेत. त्यांना पद्मभूषण (1998), पद्मविभूषण (2009), लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, मॅन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
6. राकेश के. जैन
राकेश के. जैन हे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ आहेत. जैन हे ट्यूमर बायोलॉजीमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त आहेत. त्यांनी 600 हून अधिक संशोधनांमध्ये योगदान दिले आहे. राकेश के. जैन यांना केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी, निओप्लास्टिक रक्तवाहिन्यांमधील संबंधांवरील कार्यासाठी 2016 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी राष्ट्रीय विज्ञान पदक पुरस्काराने सन्मानित केले होते. हा पुरस्कार अमेरिकेचा सर्वोच्च विज्ञान सन्मान आहे.
7. डॉ. के.राधाकृष्णन
केरळमध्ये 29 ऑगस्ट 1949 रोजी जन्मलेले डॉ. के. राधाकृष्णन हे भारतातील महान शास्त्रज्ञांपैकी एक आहेत. ते मुळात अवकाश शास्त्रज्ञ आहे. 1970 मध्ये त्यांनी केरळ विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. यानंतर त्यांनी 1971 मध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटरमधून करिअरला सुरुवात केली.
डॉ. के. राधाकृष्णन यांनी ISRO चे अध्यक्ष असताना GSLV आणि मार्स ऑर्बिटरसाठी स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन यशस्वीरित्या पूर्ण केले. अंतराळ विज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना पद्मभूषण (2014) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. डॉ. के. राधाकृष्णन यांच्या देखरेखीखाली भारताने चांद्रयान आणि मंगळयान अवकाशात पाठवले होते.
8. ए. एस. किरण कुमार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी आंतरराष्ट्रीय हवामानशास्त्र, जमीन, महासागर, वातावरण आणि ग्रह संशोधनात विशेष योगदान दिले आहे. किरण कुमार यांनीच मंगळाच्या दिशेने पाठवलेले मार्श ऑर्बिटर मंगळाच्या कक्षेत ठेवण्याची रणनीती आखली. किरण कुमार यांना पद्मश्री पुरस्कार (2014) प्रदान करण्यात आला आहे.
9. डॉ. के. कस्तुरी रंगन
इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ.कृष्णस्वामी कस्तुरीरंगन यांचा जन्म केरळमध्ये झाला. त्यांनी मुळात खगोलशास्त्राच्या क्षेत्रात आपले महत्त्वाचे योगदान दिले आहे. विज्ञानातील योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी वैश्विक क्ष-किरण आणि गॅमा-किरण स्त्रोतांचा अभ्यास आणि खालच्या वातावरणातील वैश्विक क्ष-किरणांच्या परिणामांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
10. उडुपी रामचंद्र राव
उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म 10 मार्च 1932 रोजी कर्नाटकात झाला. अंतराळ विज्ञानात त्यांनी विशेष योगदान दिले आहे. त्यांनी दीर्घकाळ भारतीय विज्ञानाची सेवा केली आहे. त्यामुळे भारत सरकारनेही त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केले आहे. मद्रास विद्यापीठाशी त्यांचा संबंध आहे.
11. व्यंकटरमण रामकृष्णन
1952 मध्ये तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यात जन्मलेल्या व्यंकटरमण रामकृष्णन यांना 2009 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते. रामकृष्णन यांना इतर दोन शास्त्रज्ञांसह पेशीच्या आत प्रथिने तयार करणाऱ्या रायबोसोमच्या संरचनेचा सखोल अभ्यास केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला. शास्त्रज्ञांच्या पुढील पिढीला त्यांच्या कार्याच्या मदतीने प्रभावी प्रतिजैविक विकसित करण्यात मदत मिळू शकेल.