टाकळी हाजी -गेली पाच वर्षांत गैरसोयीने परतालुक्यात बदलीने गेलेले शिक्षक स्वगृही तालुक्यात पाठवले जातील व यापुढे सर्वांच्या सोयीच्याच बदल्या होतील. यासंबधीचा शासन निर्णय राज्य शिक्षक संघाच्या अलिबाग येथील नियोजित अधिवेशनात जाहीर करण्यात येईल, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली. अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी दिली.
शरद पवार म्हणाले, शिक्षकांचे आणि पुरोगामी पक्षांचे नाते खूप जुने आहे. त्यामुळे आम्ही सत्तेवर आल्यानंतर आमच्याकडून शिक्षकांच्या अपेक्षा असणे स्वाभाविकच आहे. दोन तीन आठवड्यांत ग्रामविकासमंत्री, शिक्षणमंत्री, महसूलमंत्री व नगरविकासमंत्री यांच्या समवेत शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन मंत्रालयात बैठक लावली जाईल. या बैठकीला मी स्वतः उपस्थित राहून शिक्षक हिताचे सर्व निर्णय घेतले जातील. घेतलेले निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य शिक्षक संघाच्या अधिवेशनात जाहीर करू.
शिक्षकांनी आता त्यांच्या प्रश्नांसंदर्भात चिंता करायचे काही कारण नाही. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाशी संबंधित प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असे आश्वासन दिले. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी परतालुक्यात विस्थापित झालेल्या व रॅंडम राउंडने गेलेल्या शिक्षकांना स्वगृही तालुक्यात आणले जाईल व बदली धोरणात आवश्यक ते बदल करू, असे जाहीर केले.
यावेळी संघाचे नेते संभाजीराव थोरात यांनी जुनी पेंशन योजना, बीएलओ कामातून मुक्ती, शिक्षकांतून पदोन्नती, संगणक प्रशिक्षण मुदतवाढ, वेतन आयोगातील त्रुटी, शिक्षण सेवक मानधनवाढ यासह अनेक मागण्या केल्या. राज्य संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी आभार मानले.