पुणे – बारावी परीक्षेमध्ये विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक परीक्षांचे अंतर्गत गुण मिळाले नसल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे. या तक्रारीची शहानिशा करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी राज्य शिक्षण मंडळाकडे केली आहे.
बारावीच्या परीक्षेमध्ये काही विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आदी विषयांमध्ये कमी गुण मिळाले आहेत. विद्यार्थ्यांना प्रात्याक्षिक परीक्षेचे 20 पैकी गुण मिळत असतात. त्यापैकी विद्यार्थ्यांना काही तरी गुण निश्चित मिळतात. मात्र, गुणपत्रिकेतील त्या विषयात मिळालेले गुण पाहिले असता प्रात्यक्षिक परीक्षांचे गुणच दिले नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. प्रात्यक्षिक गुण दिले नसल्याची शंका विद्यार्थ्यांनी उपस्थित केली आहे.
यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे म्हणाल्या, मराठवाडा मित्र मंडळ कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अर्ज प्राप्त झाला आहे. मंडळाकडून त्याची तपासणी करण्यात येत असून त्यानुसार योग्य ती कार्यवाही केली जाईल. दरम्यान, राज्य मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा व लेखी परीक्षेचे गुण भरल्याशिवाय सिस्टिमध्ये पुढे जाता येत नाही. त्यामुळे प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण दिले गेले नसल्याचा प्रकार घडण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे.