बेल्हे -उन्हाळी कांद्याची जुन्नर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी कांदा चाळींमध्ये मोठ्या प्रमाणात साठवणूक केली आहे. दीड ते दोन हजार रुपये क्विंटल भाव मिळेल अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपला कांदा मार्केटला न आणता साठवून ठेवला; मात्र सध्या पावसाळी वातावरणामुळे आरणीतील कांदा खराब होण्यास सुरुवात झाल्याने तो मार्केटला आणणे शेतकऱ्यांना भाग पडत आहे. शिवाय कांद्याच्या वजनातही घट झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सध्या 10 किलोला 50 ते 90 व किरकोळ बाजारात 15 रुपये किलो भाव मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. जुन्नर तालुक्यात ऊस पिकानंतर सर्वावधिक पीक घेतले जाते ते कांदा पिकाचे गेल्या वर्षी कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली होती. साधारणपणे या वर्षी जानेवारी ते मार्च महिन्यामध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघाले. कांदा मार्केटमध्ये यायची वेळ झाली आणि करोनामुळे लॉकडाऊन झाले. त्यामुळे बाजारपेठाच बंद झाल्या होत्या. दोन महिने बाजारपेठा बंद राहिल्यानंतर गेल्या महिन्यात बाजारपेठा सुरू झाल्या आहेत.
कांद्याला योग्य असा बाजारभाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी आपला कांदा आरणीतच साठवून ठेवला होता; परंतु करोनामुळे कांदा निर्यात झाला नाही तसेच या रोगामुळे बाजारपेठा बंद असल्याने व्यापाऱ्यांनी कांदा देखील खरेदी केला नाही. त्यातच वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे कांदा आरणीतच सडू लागला असल्याने शेतकरी तो बाजारात आणण्यासाठी धावपळ करीत असल्याने आवक वाढत आहे, त्यामुळे आणखी भाव पडण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
आरणीत ठेवलेल्या कांद्यावर निसर्ग चक्रीवादळामुळे पाण्याचे शिंतोडे लागले असल्याने तो मोठया प्रमाणात खराब झाला आहे. सद्यस्थितीत या बाजारभावाने उत्पादन खर्चही निघत नसल्याने आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने अनुदान द्यावे अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.
– पोपट बढे, कांदा उत्पादक शेतकरी, वडगाव कांदळी