बीड – कांदा उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती अधिक विदारक होताना दिसत आहे. त्यावर राज्य सरकारने मदतीचे आश्वासन दिले असले तरी अद्याप कारवाई होत असल्याचे चित्र नाही. बीड तालुक्यातल्या “बोरखेड’ येथे कांद्याला भाव मिळत नसल्याने खाजगी सावकाराचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून एका तरुण शेतकऱ्यांने आत्महत्या केली असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. संभाजी अर्जुन अष्टेकर (वय वर्ष 25) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
आत्महत्या केलेल्या या तरुण शेतकऱ्याने तीन एकरावर कांद्याची लागवड केली होती. मात्र कांद्याला भाव मिळत नसल्याने त्याच्यावर असलेले साडेतीन लाख रुपयांच कर्ज कसे फेडायचे हा प्रश्न त्याच्यासमोर उभा होता आणि याच विवंचनेतून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. त्याच्या पाश्चात आई, वडील आणि एक भाऊ असून आधारच गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाफेडच्या कांदा खरेदीचा कुणाला फायदा?
गेल्या वर्षी कांद्याला जो भाव मिळत होता त्याच्या अर्ध्यावर यंदा भाव आल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अवकाळी झालेल्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
#MahaBudget2023 : आठ जिल्ह्यांतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार
नाफेड कांदा खरेदी करत असल्याचे चित्र सध्या कुठेही दिसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. नाफेडने कांदा खरेदी करुन गेल्या पाच वर्षात किती निर्यात केला असा सवाल शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. नाफेडकडून बाजार समितीमध्ये येऊन कांदा खरेदी केला पाहिजे अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.